२०२३-०२-२३

आरव गोळेने आज ८ तास ४० मिनिटांत ३९ किमी पोहून धरमतरची खाडी पार केली!

कळविण्यास खूप आनंद होतो की, २२-०२-२०२३ रोजी, कुमार आरव अद्वैत गोळे राहणार डोंबिवली, याने ३९ किमी धरमतरची खाडी ८ तास ४० मिनिटांत पोहून पार केली. त्यानिमित्त आरव, त्याचे कुटुंबिय, त्याचे शिक्षक, त्याचे मदतनीस या सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन! आज त्याचे वय केवळ दहा वर्षे आहे!. त्याने अथक परिश्रम घेतले आहेत आणि यशश्री खेचून आणली आहे. यापुढेही अशीच उत्तुंग वाटचाल करण्यासाठी त्याला सर्व गोळे कुळातील मंडळींचे शुभार्शीवाद. श्री. सोमेश्वर देव आणि श्री. करंजेश्वरी देवीचे लाख लाख शुभाशीर्वाद आहेतच. पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन.

निर्धार स्वाध्याय तपेन प्राप्य, पोहून केलेस स्वतःच साध्य ।
हे आरवा कौतुक ते तुझेही, मातापिता आणि गुरू कृपाही ॥ 

अल्पवयातच परिश्रमपूर्वक थोर यश प्राप्त केले आहेस, हे गोळे कुळास अत्यंत भूषणावह आहे! प्राप्त केलेल्या सर्व सामर्थ्यांचा तुला तुझ्या भावी संकल्पांत खूप उपयोग तर होईलच. त्या सर्व शुभसंकल्पांना सुयश लाभो हीच प्रार्थना!

२०२३-०१-२७

निखिल यास विवाहाप्रसंगी त्रिमिती हार्दिक शुभेच्छा!



हे चित्र, कलेचा एक आविष्कार आहे. एक त्रिमितीय-एकचित्र-यदृच्छय-ठसा-बहुशिक्का-रेखन. एका चौकटीत अनेक वार, प्रतलातील दोन्हीही दिशांना, एकाच पुनरावर्ती चित्राचे, अनेक ठसे उमटवले जातात. पुनरावर्ती चित्राच्या प्रत्येक आवृत्तीत किंचितसा बदल करून, त्यांतील फरकाद्वारे पार्श्वभूमीत एक त्रिमितीय चित्र साकारले जाते. पुनरावर्ती ठशाची व आत दडवलेल्या मूळ चित्राची निवड केल्यावर, त्यांपासून असे त्रिमिती चित्र तयार करणार्‍या संगणकीय प्रणाली उपलब्ध आहेत. अशांपैकीच एक वापरून हे चित्रही तयार केलेले आहे.

चित्र कसे वाचाचे हे सांगणारे पद्य मागील बाजूस आहे. चित्रातील सुसंगती शोधण्यास ते उपयुक्त ठरेल, जीवनातील सुसंगतीही शोधण्यासही उपयुक्त ठरू शकेल. पद्यातील दुसरा अंतरा, वधुवरांस अशा प्रकारे सुसंगती साधण्याकरता शुभेच्छा व्यक्त करणारा आहे.

हे चित्र कुणीही सामान्य दृष्टी असलेली व्यक्ती वाचू शकते. त्याकरता, चित्र निर्मितीची पद्धत आणि वाचनाचे निर्देश यांवर थोड्याशा प्रत्यक्ष स्वाध्यायाची आवश्यकता असते.

चित्राच्या प्रतलास सरळ, ताठ, दृष्टीस लंब अशा रीतीने सुस्पष्ट दृश्यमानतेच्या अंतरावर धरावे. मग केंद्रबिंदू पृष्ठभागाच्या सहा इंच खाली (अथवा वर) आहे, असे समजून दृश्य पुन्हा नीट पाहावे. चित्राचा पृष्ठभाग पाण्यासारखा अथवा काचेसारखा नितळ, पारदर्शी दिसू लागतो. आरपार पाहतांना खोलवर (किंवा प्रतलावर उंच उठून) ते साकारलेले चित्र प्रकट होऊ लागते. पूर्णपणे दिसू लागते तेव्हा त्याचे त्रिमितीय अस्तित्व अचंबित करते!

This image, is a piece of art. A three-dimensional-single-image-random-textured patterns stereogram. A single image is repetitively placed one-after another in either of the two dimensions, in a frame of the paper, many times. Small changes are made in each repetitive pattern, so that these differences, create a three dimensional picture in the background. Once the repetitive pattern and the picture are selected, computer programs are available to create the three dimensional picture. This picture is also created using one of such programs.

A poem overleaf, tells how to read this picture. It would be useful for searching the co-relation in the picture, it may also help in co-relating the facts in real life. Second stanza gives the bride and the groom best wishes  in doing so.

This picture can be read by any person with normal vision. It needs an effort to understand the process of its creation and the directions to read it.

Hold the picture straight, upright, directly visible to the eyes, at the distance of distinct vision. Then see it, assuming the focus to be located six inches below (or above) the plane of paper. Plane of the paper may start looking glossy like water or glass surface. Seeing deep through (or elevated above the paper) it, the original picture starts appearing. When it is fully visible, it’s three dimensional existence gives us a surprise.


२०२२-१२-१५

व्रतस्थ शक्ती

व्रतात शक्ती असते! ती अपार असते. ती दुर्बळ, असहाय्य लोकांनाही, कमालीची उपयुक्त ठरते. ह्या गोष्टी, मला पुराणातील वानगी वाटत असत. कसलं व्रत आणि काय ती त्याची शक्ती! अशा पूर्णतः नास्तिक भावनेने मी संपूर्णतः पछाडलेलो होतो. मग आज असा अचानकच काय फरक पडला? आज मला साक्षात्कार झाला. ती शक्ती प्रत्यक्षात दिसून आली. प्रत्येक माणसास, ती प्रत्यही उजागर करता येते, हे उमजून आले. कालांतरापासूनचा माझा भ्रम निरस्त झाला.

ह्यापूर्वी, मनुष्य अन्नावाचून अमूक एक काळपर्यंत जिवंत राहू शकतो, पाण्यावाचून तमूक काळपर्यंत जिवंत राहू शकतो, हवेवाचूनही काही काळ गुदमरत राहू शकतो, आणि मुंडीविहीन धडाने दोन्हीही हातात पट्टे घेऊन शत्रुचे शिरकाणही करू शकतो (आठवा बाजीप्रभू देशपांडेंची अमर सत्यकथा!) एवढीच काय ती माहिती, मनावर कोरली गेलेली होती. प्रत्यक्षात कुणी असा जगतांना पाहण्याचे भाग्य मला लाभलेले नव्हते. अलीकडेच अण्णा हजारेंनी उपोषण[१] केले तेव्हा, अन्नाविना अण्णा तेरा दिवस खुशाल जगले होते. एवढेच नव्हे तर, तेराव्या दिवशी त्यांनी उपोषण सोडले, तेव्हा आता ते आडव्या हाताने जेवण हापसतील, असे वाटलेला मी, त्यांनी उद्या जेवणार असल्याचे जाहीर केल्यावर विस्मयचकीत झालो होतो. त्यावर ताण म्हणजे, तेरा दिवसांचे उपोषण केलेला माणूस उभा राहून, इतरांनाच धन्यवाद देणारे मोठे प्रोत्साहनपर भाषण, ताठ मानेने करता झाला तेव्हा, मला मानवी शक्तीच्या जागराचा अनोखा आविष्कार अनुभवायला मिळालेला होता.

मात्र, मी सर्वांना सांगून माझे आश्चर्य जाहीर करायचाच अवकाश होता, मला लोक अशा अशा अद्‌भूत कहाण्या सांगू लागले की, मी त्यांच्या कथानायकांप्रतीच्या आदराने अधिकाधिक विनम्र होत गेलो. इंटरनेटवर मला संत फतेहसिंग ह्यांच्या[२] २१ दिवसांच्या आमरण उपोषणाची माहितीही  मिळाली. म्हणजे अन्नाविना मनुष्य निदान २१ दिवस जिवंत राहत असल्याचा पुरावाच मिळालेला होता. एकाने तर मला, आश्चर्यकारक  अशा एका व्रताची गोष्ट सांगितली. छठ पूजेच्या वेळेस बिहारी स्त्रिया म्हणे, अनेक दिवसपर्यंत कठोर उपोषण अंमलात आणूनही, घरातील सर्वांना, पै-पाहुण्यांना पंच-पक्वांन्नांचे जेवण करून वाढतात. रमझान महिन्यांत उपवास करणारे अनेक मुसलमान मलाही माहीत होते, मात्र ते सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत, इफ्तार पार्ट्यांत खाद्यपदार्थांची रेलचेल उडवून देत असल्याने त्यांचे विशेष अपरूप मला वाटे ना.

गणेश चतुर्थी, ऋषीपंचमी, महालक्ष्म्यांच्या दिवसांत अनेक स्त्रिया परंपरेने उपास करत आलेल्या आहेत. माझ्या लहानपणापासूनच, आमच्या घरी मात्र अशा व्रतांकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नव्हते. म्हणून मला त्यातल्या “व्रत” संकल्पनेची फारशी सखोल माहिती नव्हती. व्रताबाबत मला फारसे कौतुकही नव्हते. लहानपणी कहाणीसंग्रहातील व्रतांच्या कथा मात्र मी पूर्ण तपशीलाने आणि अत्यंत उत्सुकतेने वाचलेल्या मला आठवतात. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही अशी शपथ घेऊन लोक जे व्रत पत्करत असत, ते ईप्सित आराध्य दैवत प्रसन्न होऊन समोर प्रकट होईपर्यंत अत्यंत कर्मठपणे पाळत असत. असेच त्यात ठसवलेले असे. माझ्या पुर्‍या बालवयात, मी मात्र कुणा दैवतास साक्षात प्रकटतांना पाहिलेले नसल्याने, कहाणीसंग्रहातील कथा मला भाकड वाटू लागल्या ह्यात नवल ते काय?

पुढे मी कामाला लागलो. नियमितपणे चहा, नास्ता, जेवण, पुन्हा चहा, पुन्हा नास्ता, रात्रीचे जेवण असा भरगच्च खानपान कार्यक्रमच माझी दिनचर्या झाला. माझीच काय माझ्या आजूबाजूच्या सगळ्यांची, थोड्या-अधिक प्रमाणात हीच कहाणी असे. एकदा आम्ही सगळे असेच चहा-नास्त्याला गेलो, तेव्हा सोबतचे एक सहकारी नास्ता घेतांना दिसले नाहीत. मी त्यांना विचारले का हो? आज उपवास का? ते हो म्हणाले. त्यांनी केवळ चहाच घेतला. मग समजले की ते दरच गुरूवारी उपवास करत असत. त्या दिवसांत आम्ही जवळजवळ दिवसभरच प्रचलित प्रकल्पाच्या संदर्भात एकत्र काम करत असायचो. मात्र, कुठल्याही गुरूवारी त्यांचा चेहरा दुर्मुखलेला, थकलेला, किमान कोमेजलेलाही दिसत नसे. मला आश्चर्य वाटायचे. त्या काळात क्वचित एखादा नास्ता चुकला, अगदी जेवायला उशीर झाला तरीही, मला मरगळ जाणवत असायची. मग हे उपवास करूनही कसे काय राहू शकतात. म्हणून एक-दोनदा मीही एखादे जेवण वगळून टाकायचे प्रयत्न केले. पण मला हे कबूल करावेच लागेल की, त्या वेळी मला कमालीचा थकवा जाणवत असे. त्यामुळे मग मी ते प्रयत्न सोडून दिले.

गेल्या वर्षी नवरात्र सुरू झाले. तेव्हा आमच्या घरी मोलकरणीचे काम करणार्‍या बाई, चपला न घालताच कामाला आलेल्या मी बघितल्या. थोडी आणखी चौकशी केली तेव्हा समजले की, त्या नवरात्रीचे नऊही दिवस उपवास करतात. गेली जवळपास दहा वर्षे त्या आमच्याकडे काम करत आहेत. मात्र, त्या सर्व काळात मला हे कधी समजलेही नव्हते. म्हणजे त्या उपवास करतच होत्या. सणासुदीला सगळ्यांकडे जास्तीची कामेही त्यांच्याकडून करवून घेत असतच. तरीही ह्या बाई, बापाविना पोरक्या असलेल्या आपल्या चारही मुलांचे स्वयंपाकपाणी करून, इतर दहा घरची नेहमीची कामे, तसेच सणासुदीला वाढलेली कामे करून, उपवासही करत होत्या. चपलाही घालत नव्हत्या. व्रताच्या नियमांनुसार आणखी न जाणे काय काय करत होत्या! मनातल्या मनात मी व्रतस्थ शक्तीपुढे नतमस्तक झालो.

यंदाच्या नवरात्रींच्या दिवसांत तर, रस्त्यांवर फिरतांना मी काळजीपूर्वक पाहत असे. मला अनेक लोक अनवाणी चालतांना दिसून येत होते. डोंबिवलीत तसेही अनेक जैन लोक मंदिरात जातांना अनवाणी चालत असलेले मी रोजच पाहतो. मात्र हे आताचे अनवाणी चालणे निराळे होते. एवढी वर्षे हे सगळे लोक नवरात्रींच्या दिवसांत असेच अनवाणी चालत असणार. पण मलाच तेव्हा जगाकडे पाहण्याची सुयोग्य दृष्टी नव्हती. असे आता जाणवत आहे. अशाच व्रतस्थ लोकांच्या निर्धारांवर, सामाजिक शक्तीचे स्त्रोत विसंबून असतात. ऋषीमुनींना सुटेना असा भुकेचा उखाणा त्यांनी यशस्वीरीत्या सोडविलेला आहे. आपणही अशाप्रकारच्या निर्धाराचे, निश्चयाचे असे बळ अंगी बाणवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशी प्रेरणा आज माझ्यात निर्माण झालेली आहे.

अमेरिकेत गेलेले भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी, मॅडिसन-स्क्वेअर-गार्डन प्रेक्षागृहात, अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीयांना संबोधित करत होते. भाषण जोशपूर्ण झाले. तिथल्या लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देणारे काही निर्णयही, त्यांनी तिथे जाहीर केले. सगळे प्रेक्षक खूश होते. अखेरीस भाषण संपता संपता त्यांनी सगळ्या प्रेक्षकांकडून भारत माता की जय अशी घोषणा करवून घेतली. त्यावर ते म्हणाले की, आणखी जरा जोरात म्हणा, भारत माता की जय. कारण माझे जरी उपवास सुरू असले, तरी तुमचे नाहीत. मग पुन्हा त्रिवार घोषणा झाल्या, भारत माता की जय. अतिशय जोशात. मला मग समजले की, आपले पंतप्रधान गेल्या पस्तीस वर्षांपासून, दरच वर्षी नवरात्रांत उपवास करत आहेत. मी आश्चर्यात बुडून गेलो.

उपवासाच्या आदल्या दिवशी भरपेट खाऊन घेणारे लोक मी पाहिले आहेत. उपवासाच्या दिवसांत घरच्यांकरवी आपली जास्तीची बडदास्त ठेवून घेणारे लोक मी पाहिले आहेत. उपवासाच्या दिवसांत उपवासाचे पदार्थ, ह्या नावाखाली उत्तमोत्तम पदार्थांची चंगळ करून घेणारे लोकही, मी पाहिलेले आहेत. ’उपाशी आणि दुप्पट खाशी’, ही म्हणही अशा लोकांच्या चिरंतन अस्तित्वाचे ऐतिहासिक पुरावेच सादर करत नाही काय?

मात्र उपाशी असतांना आपला नियमित कार्यक्रम कुठल्याही तक्रारीविना पार पाडणारे, देशाकरता स्वतःहून अंगावर घेतलेल्या लक्षावधी अपेक्षांच्या जबाबदार्‍या विना-तक्रार सांभाळणारे, आणि उपवास काळात लिंबू सरबतही नाकारणारे, आपले पंतप्रधान अभूतपूर्व आहेत. एकमेवाद्वितीय आहेत. दृढनिश्चयी आहेत. देशभक्तीची ज्योत अंतरात तेवती राखून, तिच्या प्रकाशात, देशाच्या उजळलेल्या भवितव्याप्रती असणारी आस्था, त्यांनी जपून ठेवली आहे. हे बंधन त्यांनी स्वतःच स्वतःस घालून घेतलेले बंधन आहे. स्वयं स्वीकृतं नः सुगं कारयेत्‌ । क्रांतिकारक कवी विनायक दामोदर सावरकर “माझे मृत्यूपत्र” ह्या आपल्या अजरामर काव्याचा समारोप करत असतांना असे म्हणतात कीः

की घेतले व्रत न हे, अम्हि अंधतेने । लब्धप्रकाश इतिहास निसर्गमाने ॥
जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे । बुद्ध्याच वाण धरिले करि हे सतीचे ॥ 

म्हणजे, आम्ही (राष्ट्रसेवेचे) हे व्रत काही आंधळेपणाने पत्करलेले नाही. प्रसिद्धीच्या लोभाने, किंवा सहजच स्वीकारलेले नाही. आम्हाला ते दिव्य आहे, अद्‍भूत आहे हे माहीत आहे. तरीही आम्ही हे अवघड कर्तव्य (सतीचे वाण) जाणीवपूर्वक हाती घेतले आहे.

त्याप्रमाणेच, नरेंद्र मोदींनी घेतलेले राष्ट्रसेवेचे व्रत हे डोळसपणे, समजून, उमजून, जाणीवपूर्वक पत्करलेले व्रत आहे. त्यांचे नवरात्रींच्या उपवासाचे व्रत ते ज्या कर्मठपणे पाळत आहेत, तसेच कर्मठपणे ते राष्ट्रसेवेचे व्रतही पाळत आहेत.

अशी व्रते, अशी बंधने, हे रेशमाचे बंध असतात. मानले तर आहेत. न मानले तर नाहीत. विख्यात कवियित्री शांता शेळके म्हणतातः

हे बंध रेशमाचे, ठेवी जपून जीवा । धागा अतूट हाच, प्राणांत गुंतवावा ॥
बळ हेच दुर्बळांना, देती पराक्रमांचे । तुटतील ना कधीही, हे बंध रेशमाचे ॥ 

गरीब, दुबळ्या, वंचितांना, जेव्हा उपजीविकेची साधने उपलब्ध नसतील; तेव्हाही त्यांना आपल्या पंतप्रधानांच्या व्रताची हकिकत समजल्यावर, आणि त्यांच्या कर्मठतेने केलेल्या व्रताचरणाची माहिती समजल्यावर; प्राप्त परिस्थितीशी झुंजण्याकरता त्यांच्यात हजार हत्तींचे बळ निर्माण होईल. नरेंद्र मोदींच्याच म्हणण्याप्रमाणे, जर सव्वाशे कोटी भारतीयांनी, राष्ट्रसेवेच्या अशाच शक्तीशाली व्रताचा स्वीकार केला तर, अशक्यप्राय उद्दिष्टेही आपण सहजच गाठू शकू. निदान मला तरी आता अशा व्रतस्थ शक्तीची ओळख पटली आहे. स्वतःमध्ये ती उजागर करण्याचा मी भरकस प्रयत्न करेन. मान्यवर, आपण काय म्हणता?

पूर्वप्रसिद्धीः व्रतस्थ शक्ती, ठाण्यातील विद्याप्रसारक मंडळाच्या ’दिशा’ मासिकाचा २०१४ सालच्या डिसेंबरचा अंक.


[१]  १५ ऑगस्ट २०११ ते २८ ऑगस्ट २०११ असे सलग १३ दिवस अण्णा हजारे ह्यांनी लोकपाल विधेयक संसदेत मंजूर व्हावे म्हणून उपोषण केलेले होते. http://www.annahazare.org/

[२] १८ डिसेंबर १९६० ते ९ जानेवारी १९६१ असे सलग २१ दिवस संत फतेहसिंग ह्यांनी पंजाबी भाषक राज्याच्या निर्मितीकरता उपोषण केले होते. http://en.wikipedia.org/wiki/Fateh_Singh_(Sikh_leader)

२०२२-१२-११

रैवतक पर्वताची पदयात्रा

गिरिनारायण किंवा गिरनार पर्वतास रैवतक पर्वत असेही म्हणतात. पर्वतावर पाच निरनिराळ्या शिखरांवर, पाच महत्त्वाची तीर्थस्थाने वसलेली आहेत. पर्वताच्या पायथ्यास ’गिरनार तलेटी’ म्हणतात. इथे ’दामोदर कुंड’ आहे. हे ’अस्थी-विलयकारी’ कुंड मानले जाते. इथून सर्वात वरच्या दत्तात्रेय शिखरापर्यंत १०,००० चिरेबंद पायर्‍यांचा सुघटित सोपान आहे. येथील एकूण यात्रेकरूंपैकी केवळ १५% यात्रेकरूच वरपर्यंत जात असतात [१].



पाच शिखरांच्या (टुंक, महत्त्वाचे तीर्थक्षेत्र) आसपासच्या परिसरात विखुरलेल्या ८६६ हिंदू व जैन मंदिरांमुळे रैवतक (गिरनार) पर्वत हा शतकानुशतके पश्चिम भारतातील यात्रेकरूंचे महत्त्वाचे तीर्थस्थान राहिलेला आहे. गुजराथमधील तो सर्वोच्च उंचीचा पर्वत आहे. पर्वताचा गिरनार तलेटीहा तळ, जुनागढ शहराच्या केंद्रभागापासून सुमारे ४ किलोमीटर पूर्वेस आहे. यात्रेच्या उद्देशाने पर्वतारोहणास पहाटेसच सुरूवात करणे चांगले समजतात. यात्रेचे प्रत्येक पाऊल संपूर्ण तीर्थाटनाचा उद्देश कायम ठेवूनच उचलले जाते. 

सोनरेखा नदीकिनारी वसलेल्या राधा-दामोदर आणि बलदेव-रेवती कुंडांपासून दगडी सोपानाची सुरूवात होते. इसवीसनाच्या १५ व्या शतकात इथेच संत नरसी मेहता स्नान करत असत. त्यांनी त्यांच्या प्रभातीयरचना इथेच तयार केल्या होत्या. पाच शिखरांपासून जाणारा हा सोपान मग तुम्हाला हिंदू धर्माच्या अनेक पंथांच्या मंदिरांप्रत घेऊन जातो. सुरूवातीच्या भवनाथ मंदिरातशिवरात्र साजरी करण्यासाठी नागा साधूयेत असतात. ४,००० पायर्‍यांवरील विस्तीर्ण पठारावर जैन मंदिरांचे पहिले शिखर आहे. ही मंदिरे इसवीसनाच्या १२ ते १६ शतकांदरम्यान निर्मिली गेली होती. ७०० वर्षे तपश्चर्या केल्यानंतर, जैनांचे २२ वे तीर्थंकर नेमिनाथइथेच निवर्तले होते. पुढे आणखी ८०० पायर्‍यांनंतर असलेल्या अंबाजी मंदिरात हिंदू, जैन आणि नवपरिणत वधू-वर सुखी जीवनाचा आशीर्वाद घेण्याकरता येत असतात. नंतरच्या पायर्‍या दमछाक करणार्‍या आहेत. मात्र शिखरांवरून दिसणार्‍या विहंगम प्रेक्षणीय दृश्यांकरता त्याही सुसह्य भासतात. शिखरांच्या उंचीवरील जोराचे थंडगार वारे परिश्रमही हलके करत असतात. गोरक्षनाथ शिखरापासून दगडी सोपान १,००० पायर्‍या उतरत जुळ्या कमानीपर्यंत जातो. त्यानंतर उतार चढावाच्या ३,००० पायर्‍या आपल्याला दत्तपादुकाशिखराप्रत घेऊन जातात. सोबतच खाली उतरणारा एक जिना २१० पायर्‍या उतरून कमंडलकुंडाप्रत घेऊन जातो. रेणुकाशिखर, अनसूया शिखर आणि कालिकाशिखरापर्यंतही वाटा आहेत. कालिकाशिखरावर अघोरपंथी चिताभस्माचे लेपन करून घेत असतात.

सोबत पुरेसे पाणी घेऊन पहाटेसच पदयात्रा सुरू करणे हा पर्याय तर आहेच. शिवाय पुरा मेहनताना घेऊन या शिखरांवर घेऊन जाणारे डोलीवालेही उपलब्ध आहेत. आपापल्या देवांचा आशीर्वाद घेऊ पाहणारे वृद्ध, अपंग लोक त्यांचीच मदत घेतात.

डोलीवाल्यांचे दरपत्रक












एकीकडे, भारतभरच्या पदभ्रमरांना आणि गिर्यारोहकांनाही हे स्थान त्यामुळेच सदोदित आकर्षित करत राहिले. तर दुसरीकडे, धड चालताही येत नाही, अशा वृद्धांना आणि अपंगांनाही तेथवर जाण्याचे कायमच अपार आकर्षण राहिले. आयुष्यभर स्वकष्टाने अर्जिलेले धन त्यावर खर्च करण्यास ते तयार असतात. त्यामुळे ’डोली’च्या संकल्पनेचाही सर्वाधिक विकास येथेच झाला. १०,००० पायर्‍यांच्या सोपानावर डोलीने वरपर्यंत नेऊन सुखरूप परत आणू शकतील अशा सशक्त, समर्थ भोई लोकांची परंपराच येथे निर्माण झाली. हा व्यवसाय इथल्याएवढा विकसित झालेला क्वचितच आढळून येईल. त्यांची साधने म्हणजे डोलीचा नवारीने विणलेला २ x २ फुटांचा पाट, दोर्‍या व त्यांच्या गाठी, आधाराचा वरचा बांबू/ वासा/ खांब, हाती धरावयाच्या आणि विश्रामांदरम्यान मूळ डोलखांबास आधार म्हणून जमिनीवर रोवल्या जाणार्‍या काठ्या यांच्या रंगरूपाचाही अपरिमित विकास झाला. ती सारीच साधने सुटसुटित, सशक्त आणि वापरास सोपी झाली. सशक्त आणि डोलीवाहनकुशल युवकांना या व्यवसायात कायमच सहज उपजीविका लाभत आली. त्यामुळे समर्थ, कुशल डोलीवाहकांची फौज येथे कायमच तैनात राहिली. उपलब्ध राहिली. पूर्वघोषित, सुनिश्चित आणि वाजवी दरांमुळे डोलीने जाणारे आश्वस्त झाले. सशक्त आणि समर्थ भोई सतत उपलब्ध राहत असल्याने डोलीचा प्रवास, कल्पनाही करता येणार नाही एवढा स्वस्त, सुरक्षित आणि शाश्वत झाला. तलेटीशी डोलीवाल्यांच्या वाहून नेण्याच्या वजनावारी दिलेल्या दरपत्रकाचा फलकही आहे. डोली कुठून कुठवर घेतली यानेही दर बदलतात. मात्र यातील पारदर्शिता वाखाणण्यासारखीच आहे.

अंतरा अंतरांवर भोई लोक विश्रांतीकरता थांबतात. त्यावेळी डोलीचा भार काठ्यांवर लादून काठ्यांना सरळ राखण्यापुरताच आधार ते देत असतात. त्यामुळे विश्रांतीकाळात त्यांना डोलीचा भार सोसावा लागत नाही. तो काठ्याद्वारे जमिनीवर टाकला जातो. विश्रांती झाल्यावर भोई डोलखांब उचलून खांद्यांवर घेतात, काठी हाती धरतात आणि मार्ग आक्रमू लागतात. मात्र आता रज्जूमार्ग झाल्याने परिस्थिती आमूलाग्र बदललेली आहे.

रज्जूमार्ग

रज्जूमार्गाचे खालचे स्थानक ’उडनखटोला’, सुदर्शन तलावापाशी, भवनाथ तलेटी, जुनागढ येथे आहे. या रज्जूमार्गाची लांबी भारतात सर्वात जास्त म्हणजे २,१२६.४ मीटर इतकी आहे. तो तळापासून ९०० मीटर उंचीवरील अंबामाता मंदिरापर्यंत पोहोचवत असतो. मार्गावर अद्ययावत असे ८ माणसे क्षमतेचे एकूण २५ रज्जूकक्ष वर-खाली अशी प्रवाशांची ने-आण करत असतात. दररोज ते एकूण ८,००० माणसांची ने-आण करतात. रज्जूमार्ग वर्षभर सतत सकाळी ७:०० वाजल्यापासून तर संध्याकाळी ६:०० वाजेपर्यंत सुरू असतो. जुलैमध्ये त्यास वार्षिक दुरुस्तीकरता काही दिवस कार्यविराम दिला जात असतो. तळापासून वरपर्यंत जायला ७.४३ मिनिटे लागतात. तळापासूनच्या एकूण १०,००० पायर्‍यांपैकी ५,००० पायर्‍यांपर्यंत म्हणजे अंबामाता मंदिरापर्यंत तो आपल्याला घेऊन जात असतो. तिकीट रु.७००/- आहे. सवलतीच्या तिकिटाचा दर रु.४००/- आहे. १९८३ साली प्रस्तावित झालेल्या या रज्जूमार्गाचे, २४ ऑक्टोंबर २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते उद्घाटन झाले.

सोपानाची निर्मिती

जुनागढ राज्याचे दिवाण राय बहादूर हरिदास विहारीदास देसाई (१८४०-१८९५) यांच्या नेतृत्वाखालील समितीने ’गिरनार लॉटरी’ काढली आणि त्यातून मिळालेल्या उत्पन्नातून गिरनार तलेटीपासून दत्तपादुकाशिखरापर्यंत १०,००० पायर्‍यांचा सोपान तयार केलेला आहे. १८८३ साली ते दिवाण झाले होते. सोपानाच्या सुरूवातीस चढावाव हनुमानाचे मंदिर लागते. इथूनच त्यास वंदन करून चढाईस सुरूवात केली जाते. इथून पुढील उल्लेखनीय स्थाने, त्यांची मीटरमधील उंची आणि तेथवर चढाव्या / उतराव्या लागणार्‍या अनुमानित पायर्‍या पुढील कोष्टकात दिलेल्या आहेत [२].

 

अक्र

टुंक

तीर्थस्थान

उंची मीटर

उंची फूट

पायर्‍या

 

भवनाथ तलेटी

-

-

 

रज्जूमार्ग पायथा

१६८

५५१

-

 

सेसावन

-

-

३,१००

नेमिनाथ मंदिर

९४५

३,१००

३,८००

जटाशंकर मंदिर

-

-

४,१००

 

रज्जूमार्ग माथा

१,०६६

३,४९८

-

अंबा माता मंदिर

१,०८०

३,५३०

४,८४०

गोरक्षनाथ मंदिर

१,११७

३,६६६

५,२८०

 

जुळी कमान

-

-

६,१३०

दत्तपादुका मंदिर

१,००४

३,२९५

९,९९९

१०

 

कमंडल कुंड

९५४

३,१३१

६,३४०

गिरनार सोपानाची महती त्यावरील एका संकेतस्थळावर पुढीलप्रमाणे वर्णिली आहे [३]. एवढा प्रचंड आणि लांबलचक दगडी सोपान जगात दुसरा नाही. सबंध गुजराथ राज्यातील सर्वोच्च शिखर असलेल्या, समुद्रसपाटीपासुन १,११७ मीटर (३,६६६ फूट) उंच असलेल्या, गोरक्षनाथ शिखराप्रत नेणार्‍या या सोपानावर पाच शिखरे (टुंक, महत्त्वाची तीर्थक्षेत्रे) वसलेली आहेत असे मानले जाते. नेमिनाथ मंदिर, जटाशंकर मंदिर, अंबाजी मंदिर, गोरक्षनाथ मंदिर आणि दत्तपादुका मंदिर ही ती तीर्थस्थाने आहेत. इसवीसनाच्या तेराव्या शतकापासुन जैन मंदिरांची निर्मिती आणि त्यांच्याप्रतचे आवागमन इथे सुरू आहे. यथावकाश तीर्थांची संख्या, पसारा आणि सोपानाची सर्वव्यापकता वाढतच गेली. दत्तात्रेयांनी दत्तपादुकाशिखरावर १२,००० वर्षे तपश्चर्या केली, अजूनही ते तेथे तप करत असतात, योगशास्त्राचा विकास आणि अभ्यास यातून घडत गेला, नवनाथांपैकी गोरक्षनाथांचा येथे निवास राहिला, इत्यादी धारणांमुळे योगाभ्यासाची परंपराच येथे निर्माण झाली. नितांत सुंदर, भव्य, दिव्य जैन मंदिरांची निर्मिती येथे सर्वकाळ होतच राहिली. त्यांना भेट देणार्‍यांची संख्याही वर्धमान राहिली. त्यामुळे कलाकारी, पर्यटन, अनुषंगिक व्यवसाय आणि राजाश्रय यांचेही हे जणुकाही माहेरघरच झाले. या सार्‍यांचे पर्यवसान होऊन परिसरातील सर्वोच्च शिखराप्रत सर्वसामान्य माणसालाही सहज चालत जाता यावे, उंचच उंच सुळक्यांच्या निसर्गवैभवाचा आस्वाद घेता यावा, याकरता जगातील एकमेवाद्वितीय, सर्वात प्रदीर्घ अशा या पत्थरी सोपानाची निर्मिती झाली. सोपानावरील पुढील प्रकारच्या फलकांतून त्याची माहितीही दिली गेलेली आहे.


 

हा फोटो श्री. अमोघ डोंगरे यांनी भवनाथ तलेटीपासून चढाई सुरू केल्यावर, ४ डिसेंबर २०२२ रोजी पहाटे ०१:०७ वाजताचे सुमारास कुठेतरी काढलेला आहे. हे स्थान नेमिनाथ मंदिराच्या ९०० पायर्‍या खालच्या बाजूला आहे अशी माहितीही यावरूनच कळते. यावरून हे स्थान जैनांचे ’सेसावन’ तीर्थक्षेत्र असावे असे अनुमान करता येते.

धार्मिक, पर्यटनाचे दृष्टीने, पदभ्रमणाचे दृष्टीने आणि विविध कला, उद्यमांचे माहेरघर म्हणून लोक रैवतकाची वाट धरत असतांना, मी मात्र जगभरातील महदाश्चर्य असलेल्या पत्थरी सोपानाच्या अनिवार आकर्षणाने तिथे जाण्याचे ईप्सित धरून होतो. चरन्‌ वै मधु विन्दन्ति या फुलपाखरी वृत्तीने मला पुन्हा एकदा पर्वत कड्यांच्या निसर्गवैभवाकडे ओढून आणले होते. या वेळेला ईप्सित रैवतक पर्वतशिखराचे होते. यावर्षी संधी मिळताच मी, पहिल्या ५,००० पायर्‍यांसाठी रज्जूमार्गाचा वापर करून, या सोपानाच्या वरच्या ५,००० पायर्‍या चढण्याचे आणि उतरण्याचे उद्दिष्ट माझ्याकरता ठेवले होते. ३ डिसेंबर २०२२ रोजी ते साध्य झाले. २७ जणांच्या मोठ्या गटाचा मी हिस्सा होतो. सारेच्या सारे जण यशस्विरीत्या आपापल्या मार्गांनी गिरनारचे गुरूशिखर सर करून आले! ज्या १३ जणांनी रज्जूमार्गाने जाऊन येऊन ५,००० पायर्‍या चढल्या-उतरल्या त्यांत मी एक होतो. अंबाजीपासून सुमारे ०९३० वाजता चढाईस सुरूवात केल्यावर, दत्तपादुकाशिखर आम्ही सुमारे दीड तासांतच गाठले होते. मग जुळ्या कमानीपासून खाली उतरून कमंडलकुंडावर प्रसाद घेऊन १२३० चे सुमारास रज्जुमार्गाच्या पायथ्याशीही पोहोचलो होतो. शिखरांवरील शीतल प्रसन्न वारे, दूरवरचा प्रदेश नजरेत आणणारी उंची आणि आकर्षक सोपानाची सोबत अनुभवत माझी रैवतकाची पदयात्रा सफल संपूर्ण झाली.



  


उडनखटोल्यातून भवनाथ तलेटीचे दर्शन असे घडते. नेमिनाथ मंदिरसमूहाचे नयनमनोहर दृश्य दिसते.



मग गोरखशिखर, दत्तशिखर आणि रेणुकाशिखराचे विहंगम दृश्य पुढे येते. दुसरा फोटो, पुढे दत्तशिखराच्या दिशेने गोरखशिखर उतरतांना पूर्वेला तोंड करून काढलेला आहे. यात, दत्तशिखर सुळक्याच्या तीव्र उताराच्या सोंडाही नजरेत भरत आहेत. 



गोरखशिखर पार करून आपण खाली उतरू लागतो तेव्हा मग एक जुळी कमान समोर येते! डावीकडची कमान दत्तपादुकाशिखराप्रत नेते तर उजवीकडची कमान कमंडलकुंडाकडे.

पुढील क्षणचित्रे तेथील परिस्थितीची पुरेशी कल्पना देतील.







दत्तपादुका मंदिरात ’फोटो पाडवायला’ सख्त मनाई आहे. त्यामुळे तेथील फोटो काढता आले नाहीत.

परततांना गोरखशिखराजवळून अंबामाता मंदिर सुरेख दिसते. थोडेसे उतरून मग आपण रज्जूमार्गाच्या वरच्या स्थानकापाशी पोहोचतो. इथून गोरखशिखर, त्याच्यामागे दत्तपादुकाशिखर आणि सर्वात मागे रेणुकाशिखर अशी शिखरे ओळीने दिसू लागतात.

उडनखटोल्यातून परततांना दिसणारे भवनाथ तलेटीचे दृश्य मग सारीच चढाई पुन्हा आठवण्यास कारण ठरते. रैवतकाची पदयात्रा तर सफल संपूर्ण झालेली असते. निरोपाची लगबग सुरू असते. मात्र का कोणास ठाऊक, असे वाटत राहते की हे सारे ’केवळ पुनरागमनाय’च आहे. आपण पुन्हा इथे नक्की येणार! तथास्तु!!

रैवतकाची पदयात्रा

आहे रैवतकात थोर इथला सोपान तो पत्थरी
नेई दत्तगुरूपदास क्रमता वाटा इथे पायिही ।
नाही झेपत ज्या प्रवास, करते डोली तयाचे भले
भोई नेत तयास दूर अवघा लंघून सोपानही ॥ 

यात्रा देत सुखे, प्रवास करता दावी स्थळे कौतुके
वारे वाहत गारगार करते सार्‍यांस आनंदित ।
होते दर्शन, भाव येत जुळुनी, वाटे खरे सार्थक
आलो येथवरी, कृपाच सगळी, दत्ताचि ही केवळ ॥   

संदर्भ

१. गिरनार उडनखटोला https://udankhatola.com/news-detail/all-about-the-girnar-hill
२. गिरनार महात्म्य, चंपकलाल ए. दोशी, बजरंग प्रेस, १४-०६-२०१४, रु.३०/-
३. गिरनार सोपान https://junagadhgirnar.com/stairs-at-girnar/