२०२३-०९-२८

भारतीय हरितक्रांतीचे जनक आणि वनस्पतीवंशतज्ञ एम.एस.स्वामिनाथन यांचे निधन!

भारतीय हरितक्रांतीचे जनक आणि वनस्पतीवंशतज्ञ एम.एस.स्वामिनाथन  
(जन्मः ०७-०८-१९२५, कुंभकोणम;
मृत्यूः २८-०९-२०२३, चेन्नई)

यांचे आज वयाच्या ९८ व्या वर्षी, चेन्नई येथे निधन झाले! त्यानिमित्ताने हरितक्रांतीबाबत लिहिलेल्या या लेखाचे पुनःप्रसारण!!

 हरितक्रांती

भारतातील शेतीत, सुधारित शेतकी तंत्रज्ञान आल्यामुळे खूप अधिक उत्पन्न मिळू लागले. भारतासारख्या विकसनशील राष्ट्रास त्यामुळे बद्धमूल अन्न तुटवड्यावर मात करणे शक्य झाले होते. उच्च-उत्पन्न-वाणांच्या लागवडीद्वारे आणि आधुनिक शेतीतंत्रांमुळे १९६० च्या सुमारास ह्या क्रांतीची सुरूवात झाली. भारतात विशेषतः पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात ह्या काळात, उच्च-उत्पन्न-वाणांच्या गव्हाचे विकसन झाले. त्या कार्यात अमेरिकन शेतीतज्ञ डॉ.नॉर्मन बोरलॉग आणि भारतीय वनस्पतीवंशतज्ञ एम.एस.स्वामिनाथन ह्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले. भारतीय कृषी संशोधन संस्थेने गव्हाच्या जाती विकसित करून ह्या कामात मोलाची भर घातली. उच्च-उत्पन्न-बियाण्याच्या -संकरित बियाण्यांच्या- वापराने, रासायनिक खतांमुळे आणि सुधारित सिंचनपद्धतींमुळे अन्नधान्य उत्पादनाच्या क्षेत्रात देश स्वावलंबी झाला. ह्या घटनेस ’हरित क्रांती’ संबोधले जाऊ लागले. देशातील ओलिताखालील तसेच कोरडवाहू क्षेत्रांत, अधिक उत्पन्न देणार्‍या, संकरित आणि बुटक्या पिकांच्या बियांण्यांचा उपयोग करून उत्पादनात वाढ घडवून आणणे हेच ह्या क्रांतीचे उद्दिष्ट होते. आजही ह्या दृष्टीने सतत संशोधन होत असते.








१९६० नंतर पारंपारिक शेतीचे आधुनिकीकरण करण्यासाठी जे विकासकार्यक्रम हाती घेण्यात आले, त्यांच्या फलस्वरूप ही क्रांती घडून आली. हिचे सकारात्मक परिणाम एवढे सत्वर, झपाट्याने आणि आश्चर्यकारकरीत्या घडून आले होते की; नियोजनकार, कृषीतज्ञ व राजकारणी लोकही ह्या बदलास ’हरित क्रांती’ असेच संबोधू लागले. ह्या क्रांतीमुळे भारतीय शेती, अन्नधान्याच्या तुटवड्यापासून, तर पुरून उरणार्‍या, शिलकी उत्पादन-स्तरावर जाऊन पोहोचली होती.

हरित क्रांतीचा पहिला टप्पा (१९६६-६७ ते १९८०-८१) आणि दुसरा टप्पा (१९८०-८१ ते १९९६-९७) संपून, आता तर तिसरा टप्पाही संपत आला आहे. केंद्र सरकारचे ’नवे राष्ट्रीय कृषी धोरण’ २८ जुलै २००० रोजी घोषित केले गेले आहे. ह्या धोरणात २०२० पर्यंत, दरसाल ४% वाढीचे लक्ष्य समोर ठेवण्यात आलेले आहे. नव्या धोरणाचे वर्णन ’इंद्रधनुषी क्रांती’ च्या रूपात केले गेले आहे. ह्यात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या ’हरित क्रांती (खाद्यान्न उत्पादन)’, ’धवल क्रांती (दुग्धोत्पादन)’, ’पीत क्रांती (तीळ उत्पादन)’, ’नील क्रांती (मत्स्योत्पादन)’, ’रक्त क्रांती (मांस उत्पादन), ’सुवर्ण क्रांती (सफरचंद उत्पादन), ’शामल क्रांती (उर्वरक उत्पादन), ’करडी क्रांती (अपारंपारिक ऊर्जा उत्पादन), ’रजत क्रांती (अंडी/ कुक्कुट उत्पादन)’ इत्यादींच्या समावेशाने एकसाथ ’इंद्रधनुषी क्रांती (सर्वंकष)’ घडवून आणण्याचे निश्चित केले गेले आहे. 

आजवर हरित क्रांतीने मुख्यतः १. पंजाब, २. हरियाणा, ३. उत्तर प्रदेश, ४. मध्य प्रदेश, ५. बिहार, ६. हिमाचल प्रदेश, ७. आंध्र प्रदेश आणि ८. तामिलनाडू ही राज्ये प्रभावित झालेली आहेत. सर्व देशभर ह्या क्रांतीची बीजे रुजावीत म्हणून; हरित क्रांतीची पुढील वैशिष्ट्ये जपावी लागणार आहेत. १. अधिक उत्पादक जाती, सुधारित बियाणे, २. रासायनिक खते, ३. सूक्ष्मसिंचन, ४. कृषिशिक्षण, ५. पीकसंरक्षण, ६. पीकचक्रात्मक बदल, ७. भूसंरक्षण आणि ८. शेतकर्‍यांना लागणारा पतपुरवठा. त्याकरताच देशाच्या नियोजनात, समन्वित कृषी धोरण आखण्यात आलेले आहे. हरित क्रांती यशस्वी होण्यासाठी; शेतीतंत्र व आय-साधनांच्या उचित मूल्यांबाबत; उन्नत बियाणे, खते, कीटनाशके, यंत्रे व उपकरणे ह्यांच्या उचित मूल्यांबाबत; तसेच हे सर्व इष्ट वेळेस उपलब्ध होण्याबाबत; योग्य धोरण घडवावे लागणार आहे. उचित मूल्यावर शेतमालाच्या विक्रीची तसेच तशा हमीची व्यवस्था करावी लागणार आहे.

खते आणि ऊर्वरकेः मूळचा नैसर्गिक अथवा कृत्रिम असा कुठलाही पदार्थ जो माती अथवा वनस्पतीस, तिच्या वाढीस आवश्यक असलेली एक वा अधिक पोषक द्रव्ये पुरवण्यासाठी दिला जातो; त्यास खत म्हणतात. खते वनस्पतींची वाढ गतीमान करतात. मातीची जलसंधारणक्षमता (वॉटर रिटेन्शन, पाणी धारण करण्याची पात्रता) आणि वायूवीजन (एईरेशन, हवा खेळण्यासाठी जमिनीतील रंध्रे मोकळी असणे) वाढवल्यानेही वनस्पतींची वाढ जोमाने होते. स्थूलमानाने नत्र (नायट्रोजन; पर्णवृद्धीसाठी), स्फुरद (फॉस्फरस; मूलवृद्धी; फुले, फळे व बिया यांची वाढ ह्यांकरता) आणि पलाश (पोटॅशियम; खोडाच्या वाढीसाठी आणि वनस्पतीअंतर्गत जल प्रवाह व फुले व फळे ह्यांच्या वाढीसाठी); ही तीन पोषक द्रव्ये वनस्पतीच्या वाढीस आवश्यक असतात. चुना (कॅल्शिअम), मग्न (मॅग्नेशिअम) आणि गंधक (सल्फर) ही दुय्यम पोषक द्रव्येही वनस्पतींच्या वाढीस आवश्यक असतात. तसेच तांबे, लोह, मँगनीज, मॉलिब्डेनम, जस्त (झिंक), बोरॉन आणि क्वचित वालुका (सिलिकॉन), कोबाल्ट व व्हॅनॅडिअम ही सूक्ष्म पोषकद्रव्ये आणि उत्प्रेरके म्हणून विरल खनिजेही आवश्यक असतात.

वनस्पती मुख्यत्वे करून कर्ब, उद्‍जन, प्राण आणि नत्र वायूंपासून तयार होत असतात. पाणी आणि कर्ब-द्वि-प्राणिल वायूंच्या स्वरूपात कर्ब, उद्‍जन आणि प्राण हे घटक सामान्यतः उपलब्ध असतातच. मात्र, नत्र जरी वातावरणात सर्वत्र भरून राहिलेला असला तरीही, त्या स्वरूपात तो वनस्पतींना उपलब्ध असत नाही. त्यामुळे नत्र हा खत म्हणून सर्वात महत्त्वाचा घटक असतो. वनस्पतींना उपलब्ध अशा स्वरूपात तो आणावा लागतो. केवळ काही जीवाणू आणि त्यांना धारण करणार्‍या वनस्पतीच हे काम करू शकतात. वातावरणीय नत्राचे अमोनियात परिवर्तन करून ते हे घडवून आणतात. ऍडेनोसाईन ट्राय फॉस्फेट म्हणजे वनस्पतीच्या पेशीद्रव्यांकरताचे ऊर्जाघर असते. ते असायलाच हवे. त्याकरता स्फुरद लागते. म्हणून स्फुरद हे पोषकद्रव्य आवश्यक ठरते. सूक्ष्म पोषकद्रव्ये, सुक्या अवस्थेतील दशलक्षांश एकक परिमाणांत लागत असतात. मात्र त्यांचे परिणाम त्यांच्या वजनातील प्रमाणाच्या मानाने कितीतरी अधिक असतात.

ऊर्वरके म्हणजे खत म्हणून शेतीत वापरले जाणारे, सेंद्रिय पदार्थ. ते सेंद्रिय पदार्थांची भर घालून, तसेच मातीतील जीवाणूंद्वारे (बॅक्टेरियां द्वारे) साठवल्या जाणार्‍या नत्रासारख्या पोषक द्रव्यांची भर घालून जमिनीचा कस वाढवतात. उच्च स्तरीय सजीव, मग जैवचक्रात त्या बुरशी (फंगी) आणि जीवाणूंवर पोसले जातात.

मृद (माती)-व्यवस्थापनात ऊर्वरकांचे दोन प्रकार असतात. हिरवी (वनस्पतीजन्य) ऊर्वरके आणि प्राणीज ऊर्वरके. हिरवी ऊर्वरके म्हणजे केवळ मातीत मिसळून टाकण्याकरताच पिकवली गेलेली पिके होत. असे करण्याने मातीत पोषक द्रव्ये व सेंद्रिय पदार्थ मिसळले गेल्यामुळे तिचा कस वाढत असतो. विघटित पालापाचोळ्यापासून उद्भवणारे सेंद्रिय पदार्थ (कंपोस्ट) म्हणजे ऊर्वरके नव्हेत (मात्र त्यात ऊर्वरकेही असू शकतात). बव्हंशी प्राणीज ऊर्वरके, ही तृणभक्षी (शाकाहारी), सस्तन प्राण्यांच्या उत्सर्गांच्या किंवा प्राण्यांच्या वावरासाठी पसरलेल्या वनस्पतीज पदार्थांच्या (बहुधा गवताच्या) स्वरूपात असतात; जे त्या प्राण्यांच्या मलमूत्रादींनी अतिलिप्त झालेले असतात (आणि ज्यांना शेण, शेण्या, लीद, पो, पोयटा इत्यादी शब्दांनी संबोधले जात असते).

ऊर्वरके, शतकानुशतके शेतीकरता खते म्हणून वापरली जात आहेत. कारण ती नत्र व इतर पोषक द्रव्यांनी समृद्ध असतात, ज्यामुळे वनस्पतींची वाढ सुलभ होते. वराह (डुक्कर) पालनातील मूत्र जमिनींत थेट खोलवर शिरवले जाते ज्यामुळे दुर्गंध कमी होऊ शकतो. वराह आणि इतर पशुपालनादरम्यानची ऊर्वरके प्रसारकाच्या साहाय्याने जमिनीवर विखुरली जातात. तृणभक्षी प्राणी खात असलेल्या गवतांतील तुलनेत कमी असलेल्या प्रथिनांच्या पातळीमुळे, मांसभक्षी प्राण्यांच्या ऊर्वरकांपेक्षा; त्यांच्या ऊर्वरकांना तुलनेत कमी दुर्गंध येत असतो. उदाहरणार्थ हत्तीची लीद तर जवळपास गंधहीनच असते. मात्र शेतात विखुरलेल्या विपूल प्रमाणातील ऊर्वरकांमुळे काही शेतांत दुर्गंधाची समस्या उद्भवू शकते. ताजी कुक्कुट (कोंबड्यांची) विष्ठा वनस्पतींना हानीकारक असते. मात्र काही काळ पद्धतशीर कुजविल्यास तिचे मूल्यवान खत होऊ शकते.

सुकवलेली प्राणीज ऊर्वरके, संपूर्ण इतिहासकालात इंधन म्हणूनही वापरली गेली आहेत. गायीच्या शेण्या भारतासारख्या देशात आजही महत्त्वाचा इंधनस्त्रोत ठरतो. तर, उंटाच्या शेण्या वाळवंटासारख्या वृक्षहीन प्रदेशांत वापरल्या जाऊ शकतात. त्यांचा वापर अनेकविध उद्देशांनी होत असतो. स्वयंपाकास इंधन म्हणून आणि वाळवंटातील थंड रात्रींत ऊब निर्माण करणारे इंधन म्हणूनही. ऊर्वरकांचा आणखी एक उपयोग म्हणजे त्यांपासून कागद तयार केला जाऊ शकतो. हत्तीच्या लीदीपासून हे केले जाते. आफ्रिका आणि आशियात हे लघु-उद्योगाच्या स्वरूपात केले जाते. घोडे, लामा आणि कांगारूंच्या लीदीपासूनही कागद तयार केला जात असतो. ह्यातील लामा वगळता इतर प्राणी रवंथ करणारे प्राणी नाहीत. त्यामुळे त्यांच्या लीदीत, न पचलेल्या वनस्पतीज तंतूंचे प्रमाण बरेच राहते.

सिंचनः शेतीकरता नियमितपणे वनस्पतींना पाणी पुरवणे म्हणजे सिंचन. शेतीतील पिकांच्या वाढीकरता ते उपयुक्त ठरते. भूमीच्या अलंकरणास आणि अपुर्‍या पावसाने विस्कळित व शुष्क झालेल्या प्रदेशांना पुन्हा शस्य-शामल करण्यासाठीही ते गरजेचे असते. दवापासून, तणापासून आणि जमीन घट्ट होण्यापासून वाचविण्यासाठी सिंचनाची आवश्यकता असते. ह्यामुळेच मानवी इतिहासातील सर्व संस्कृतींचा उदय आणि विकास झरे, निर्झर, नाले, ओढे, नद्या, तलाव, पाणवठे, सरोवरे इत्यादी जलाशयांच्या काठीच झालेला दिसून येतो.






















अशाप्रकारे संचित पाण्यातून सिंचित शेतीस ओलिताखालील शेती म्हणतात. मात्र ज्यावेळी शेती केवळ पावसाच्या पाण्यावर विसंबून केली जात असते, तेव्हा तिला कोरडवाहू शेती म्हणतात. ऊस, द्राक्षे आदी नकदी पिकांना इतर पिकांच्या मानाने, सिंचनाद्वारे खूप जास्त पाणी द्यावे लागत असते. एवढे की, सततच्या ह्या पिकांमुळे भूजलपातळीही लक्षणीयरीत्या खाली जाते. म्हणूनच उपलब्ध पाण्याच्या अवस्थेवर भूमीवरील पिकांचे नियोजन करणे क्रमप्राप्त ठरते. दुष्काळी कोरड्या भूमीवर साखरकारखाने उभारणे, ह्या कारणानेच योग्य ठरत नाही.  

क्रिकेटच्या सामन्यांकरता मैदाने तयार करतांना धूळ बसावी म्हणून सिंचन करावे लागते. शहरभागातून घाण पाणी, सांडपाणी, तसेच निरनिराळे नागरी उत्सर्ग समुद्राप्रत गतीमान व्हावेत म्हणूनही पाण्याची आवश्यकता असते. वेगवेगळ्या खनिकर्मांसाठीही पाणी आवश्यक असते.

जेव्हा वरीलप्रमाणे शेतीबाह्य किंवा अगदी शेतकीतीलही ऊस, द्राक्षांसारख्या अतिजलव्ययी गरजा निर्माण झाल्या; तेव्हा पाण्याची कमतरता जाणवू लागली. जागोजाग बांधलेल्या धरणांमुळे नैसर्गिक जलप्रवाहवाहिन्यांतून पाणी नाहीसे होऊ लागले. त्याच्या आसपास वसलेल्या लोकांना त्यामुळे धरणातून सोडल्या जाणार्‍या पाण्यावर एक प्रकारचे कृत्रिम अवलंबित्व निर्माण झाले. भंडारदरा धरणातून पाच टी.एम.सी.[१] पाणी सोडावे तेव्हा जायकवाडीस केवळ तीनच टी.एम.सी. पाणी पोहोचते. उर्वरित पाणी दरम्यानच्या जमिनीस ओले करण्यातच खर्ची पडते. हीच गोष्ट जर जानेवारीत न करता मे महिन्यात केली तर खालावलेल्या भूजलपातळीमुळे, ह्याच उलाढालीत जायकवाडीस पोहोचणारे पाणी एक टी.एम.सी.ही राहत नाही. धरणालगतच्या लोकांना सारे पाणी आपलेच आहे असे वाटू लागते आणि त्यांचा कल सढळतेने जलवापर करण्याचा होत जातो. दूरवरच्या लोकांना पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागते. ह्यामुळे शासकीय हस्तक्षेपाची गरज पडते. जलनियोजन, भूजलपातळीचे नियोजन, वर्षाकाळात जलपुनर्भरणाचे नियोजन करणे इत्यादी गोष्टींची निकड निर्माण होते.

पूर्वी शेतीस मोटेने पाणी दिले जाई. नदीच्या पाटाने पाणी पुरवले जाई. भाताच्या शेत्यांतून नैसर्गिक उतारांवाटे जल-उत्सर्ग करून पाणी दिले जात असे. ह्यात दरम्यानच्या जमिनीस ओले करण्यात, तेथील भूजलपातळी वाढविण्यात आणि दरम्यानच्या भूपृष्ठावरून वाफ होऊन उडून जाण्यामुळे खूपशा पाण्याचा र्‍हास होत असे. मर्यादित जलस्त्रोतांचा नेमकेपणाने, मोजकाच वापर करायचा म्हणून मग सिंचनाच्या नवनवीन पद्धती विकसित करण्यात आल्या. ठिबकसिंचन, तुषारसिंचन इत्यादी पद्धती ह्याकरताच विकसित झाल्या. वनस्पतीच्या मुळाशी ठराविक कालावधीने ठिबकत सिंचन केल्यास तेवढ्यास ओलितासाठी कमी पाणी लागते. तुषारसिंचन पद्धतीतही हाच लाभ अपेक्षित असतो.

पिके कापणीला येतात तसतशी पाखरे, प्राणी त्याकडे आकर्षून गोळा होऊ लागतात. त्यांच्यापासून पिकांचे संरक्षण करावे लागते. नाना प्रकारचे कीटक, अळ्या, कीड ह्यांपासून संरक्षण करावे लागते. त्यामुळे पीक संरक्षण ह्या विषय महत्त्वाचा ठरतो. कापणी झाल्यावर खळ्यात असेपर्यंत पिकाची खळ्यातच राखण करावी लागते. नंतर साठवण करणे, साठवणात असतांना जपणे आणि मग ईप्सित स्थळी वितरण करणे ह्या सर्व अवस्थांदरम्यान पिकाचे संरक्षण अत्यावश्यक ठरत असते. पाखरे, प्राणी जागे होतात त्यापूर्वीपासूनच सकाळी उठून गोफण, बुजगावणी इत्यादी पारंपारिक उपायांनी; तर विजेची कुंपणे, तरतर्‍हेचे आवाज इत्यादी आधुनिक उपायांनी पीकसंरक्षण केले जाते. उसाच्या पिकाला कोल्ह्यांची भीती तर रात्रीही असते. त्यांना उसाची मुळे गोड लागतात. त्यामुळे कोल्हे आले की ते उसाची मुळे उकरून खातात.

जमिनीत एकच एक पीक सालोसाल घेतले तर जमिनीचा कस उतरत जातो. म्हणून आळीपाळीने निरनिराळी परस्परपूरक पिके घेऊन; तसेच भौगोलिकदृष्ट्या सरमिसळ लागवडीने पिके घेऊनही जमिनीचा कस कायम ठेवला जाऊ शकतो. पिकांच्या गरजेनुरूप रासायनिक खतांची, कुजवलेल्या सेंद्रिय खतांची भर घालून जमिनी सकस ठेवता येऊ शकतात. वंशपरंपरेने शेताच्या वाटण्या होऊन छोटे छोटे तुकडे झाले तर जमीन कसण्यालायक राहत नाही. सहकारी शेतीच्या माध्यमातून तिचे मोठाल्या तुकड्यांत रूपांतर केल्यास शेती अधिक लाभकारक होऊ शकते.

ह्या सर्व माहितीचा वापर केवळ शेतकर्‍यांच्याच नव्हे तर सामान्यजनांच्या प्रबोधनासाठी केल्यास शेती अधिक उत्पादक होऊ शकेल. ह्यासाठी सार्वजनिक कृषी शिक्षणाचीही आवश्यकता आहे. सहकारी साखर उद्योग हे सहकारी शेतीकरता एक आदर्श उदारहण ठरावे. सहकारी तत्त्वावर शेती केल्यास शेतीकरता आवश्यक असणारा पतपुरवठाही सहजच साधता येऊ शकेल. शेतीसोबतच शेतीवर अवलंबून असलेले पशुपालन, दुग्धोत्पादन इत्यादी व्यवसायही मग ह्या क्रांतीत मोलाची भर घालू शकतात. गुजरातेतील आणंद येथील दुग्धोत्पादन प्रकल्पाचे उदाहरण ह्याबाबतीत आदर्श ठरावे.

अशाप्रकारे १९६० च्या सुमारास ज्या हरितक्रांतीने जग गाजवले, त्या क्रांतीची कहाणी आजही नवे आयाम साकारत असतांना दिसत आहे. आपणही खरे तर तिच्यात सहभागी व्हायला हवे आणि ते व्हायचे असेल तर प्रथमतः तिची समग्र माहिती आपणा सगळ्यांनाच व्हायला हवी आहे. त्याकरताचेच पहिले पाऊल म्हणजे हा लेख आहे.

संदर्भः ऊर्वरके ह्या विषयावरील विकीपृष्ठे https://simple.wikipedia.org/wiki/Manure



[१] टी.एम.सी.-थाऊजन्ड मिलिअन क्युबिक फीट- किंवा एक-अब्ज-घन-फूट आकारमान.

२०२३-०४-१४

डॉ. वासुदेव नारायण बेडेकर

 डॉ. वासुदेव नारायण बेडेकर 
(जन्मः २०-०२-१९१७, मृत्यूः १४-०४-२००४) 


ठाण्याच्या विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक असलेले डॉक्टर बेडेकर हे ठाणे शहराचे एक भूषण आहेत. त्यांच्याच प्रेरणेने ठाणे भारत सहकारी बॅंकेचीही स्थापना झाली. ठाण्यातील विद्याप्रसारक मंडळ, म्हणजे डॉक्टरांनी लावलेला एक ज्ञानदीपच होय.

विद्याप्रसारक मंडळाचे बोधवाक्यही
प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः
असेच आहे. ब्रम्हपुराणात व्यासांना वंदन करतांना आलेल्या पुढील श्लोकातून ते घेतले आहे. 


मूळ संस्कृत श्लोकः

नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र ।
येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः ॥ - उपजाति, ब्रम्हपुराण-२४६.११ 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२००४०८

उत्फुल्ल पद्मासम नेत्रवंता प्रदिप्तबुद्धा नमस्कार व्यासा ।
स्वये जये चेतविला दिवाची तुला पुरा भारत ज्ञात व्हाया ॥ - उपेंद्रवज्रा, ब्रम्हपुराण-२४६.११ 

डॉक्टर साहेबांच्या स्मृतीदिनी त्यांच्या स्मरणार्थ रचलेले हे शब्दचित्र.

विद्याप्रसारक मंडळः एक ज्ञानदीप (भुजंगप्रयात)

कसे स्वास्थ्य आरोग्य येथे असावे । कळण्यास तू वैद्य झालास कष्टे ॥
मिळावे कसे ज्ञान जो प्रार्थि त्याला । प्रशाला तुवा स्थापिली हे कराया ॥ १ ॥

असो स्वास्थ्य वा शिक्षणाची व्यवस्था ।
स्वतः कष्ट घेऊन केली उभी ती ॥
अवस्था सुधारार्थ जी सिद्ध केली । खरे स्वास्थ्य दे, ज्ञान दे, पुष्टि दे ती ॥ २ ॥

व्यवस्थापनाची पुढे जाण आली ।
समाजास दे ज्ञान ती सोय केली ॥
समाजात संस्थापुनी त्या व्यवस्था । समाजास जे लागले ते दिलेही ॥ ३ ॥

महाभारताच्या जयाच्या कथेला । रचोनी जसा लावला दीप व्यासे ॥
प्रसारार्थ विद्येचिये, मंडळासी । तुवा स्थापुनी रे दिवा लावलासी ॥ ४ ॥

समाजा जसे लागले जे तसे त्या ।
मिळो सर्व काळी, असे साधले त्वा ॥
तुझे कार्य नेती पुढे शिष्य तेही । नमू वासुदेवा, नमू मंडळाही ॥ ५ ॥ 

२०१७ हे वर्ष त्यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. १९३५ साली डॉ. वासुदेव नारायण बेडेकर यांनी ठाणे येथे विद्या प्रसारक मंडळाची स्थापना केली. प्रज्वलितः ज्ञानमयः प्रदीपः हे बोधवाक्य घेऊन त्यांनी आयुष्यभर विद्याप्रसाराचे कार्य केले.

अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मनुष्याच्या तीन प्राथमिक आणि जीवनावश्यक गरजा. अर्थशास्त्रीय नियमाप्रमाणे कोणत्याही गरजा भागवण्यासाठी प्रयत्नांची गरज असते. प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने प्रयत्न करीत आपल्या कुटुंबाच्या गरजांचे समाधान करण्याचे प्रयत्न करते. पण हे सर्व प्रयत्न कौटुंबिक पातळीपुरते मर्यादित असतात. ठाणेकरंच्या नशिबाने ह्या सर्व गरजा सामाजिक पातळीवर भागवण्यासाठी सहा सात दशके स्वतःस समर्पित करणारे डॉ. वा. ना. बेडेकर, त्यांना लाभले.

कोणत्याही गरजांची पुर्ती करण्यासाठी शारीरीक आरोग्य आणि मानसिक सुदृढता असावी लागते आणि ह्या दोन गोष्टी प्राप्त झाल्यावर नोकरी किंवा व्यवसाय ह्याद्वारे अर्थाजन करावे लागते. डॉक्टरांना ह्या गोष्टीची अचूक जाण असल्याने त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य, समाजाचे आरोग्यरक्षण, शिक्षण आणि नोकरी-व्यवसाय ह्यासाठी खर्च केले.

वैद्यकीय पेशा स्वीकारल्याने निरोगी समाज निर्माण करणेही अंगभूत जबाबदारी त्यांनी स्वीकारली तथापि वैद्यकीय व्यवसाय डॉक्टरांनी धंदा म्हणून नव्हे तर धर्म म्हणून जोपासला. सध्याच्या काळात लोप पावलेली फॅमिली डॉक्टर ही संकल्पना त्यांनी आयुष्यभर राबवली, याची साक्ष अनेक ठाणेकर देतील.

वैद्यकीय क्षेत्राबरोबर डॉक्टरांनी ठाण्याच्या शैक्षणिक विकासासाठी अविरत प्रयत्न केले. अर्धशतकाहून अधिक काळ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्षपद संभाळताना डॉक्टरांनी, गोठ्यातील शाळेचे पूर्व प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण, मराठी तसेच इंग्रजी माध्यमातुन शिक्षण उपलब्ध असणार्‍या जनमान्य संस्थेत रुपांतर केले. चिखलातून कमळ उमल्याप्रमाणे ठाणा खाडीच्या दलदलीतून ज्ञानद्वीप निर्माण होण्यामागची खरी प्रेरणा डॉक्टरांचीच होती. पाचशे विद्यार्थी संख्येने सुरू झालेले स्थान, आज पंधरा हजारांवर विद्यार्थ्यांना कला, वाणिज्य, विज्ञान, विधी, तंत्रज्ञान, व्यवस्थापन, ग्रंथालय विज्ञान इत्यादी विविध विद्याशाखांचे पदवी व पदव्यूत्तर पातळीवरचे ज्ञानदान करत आहे. केवळ ठाण्यातीलच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातील हे एक आघाडीचे ज्ञानसंकूल बनले आहे. ही किमया डॉक्टरांच्या दूरदृष्टीची आणि अविरत कष्टांची आहे.

सहकारक्षेत्र आणि विषेषतः सहकारी बँकांबद्दल एकूण जनसामान्यात अविश्वासाचे वातावरण असणार्‍या काळात ठाण्यात आणखी एक सहकारी बँक स्थापन करणे म्हणजे काहींच्या मते वेडेपणाच होता, पण विशिष्ठ उद्दीष्टांनी प्रेरीत झालेली वेडी माणसे असल्याशिवाय समाजाची प्रगती होत नसते. अत्यल्प भांडवल आणि ठेवी ह्यांच्या पायावर सुरू झालेली ठाणे भारत सहकारी बँक उण्यापुर्‍या पंचवीसवर्षात एक आघाडीची बँक झाली आहे. ह्या बँकेने अनेकांना रोजगारप्राप्त करून देताना त्यांच्यातील उद्यमशीलतेला अर्थाची जोड दिली आहे.

डॉ वा. ना. बेडेकर हे नाव शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असून त्यांचे या क्षेत्रातील झालेले कार्य पाहता त्यांना शिक्षणमहर्षी असे म्हटले तर वावगे ठरू नये. त्यांनी विद्याप्रसारक मंडळाची अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळत व अनेक निष्ठावंतांच्या सहकार्यामुळे हिमालयाएवढे उत्तुंग कार्य केले. त्यांचा पेशा हा डॉक्टरी असल्यामुळे जसे त्यांनी अनेक अपत्यांना जन्माला आणले. त्याप्रमाणे मराठी व इंग्लिश माध्मय शाळा, कला, वाणिज्यविज्ञान महाविद्यालये, तंत्रनिकेतन, व्यवस्थापन विभाग ही सगळी त्यांची अपत्ये आहेत.

१९७४ साली व्यवस्थापन विभाग स्थापन झाला. १९९९-२००० या शैक्षणिक वर्षात पदव्युत्तर कोर्स (पीजी डी बी एम) सुरू केला. तेव्हापासून व्यवस्थापन विभागाने कात टाकली. आज ही संस्था अखिल भारतीय तंत्रशिक्षण मंडळ या संस्थेकडून मान्यता मिळालेली संस्था म्हणून दिमाखदारपणे उभी आहे. या सगळ्यांमागे डॉक्टरांची प्रबळ इच्छाशक्ती कारणीभूत आहे. ते स्वतः गमतीने म्हणायचे, मीसुध्दा व्यवस्थापन कोर्स करण्याचा विचार करीत आहे. पुढे विद्या प्रसारक मंडळाच्या कार्यकारिणीने व्यवस्थापन विभागाला त्यांचे नाव देण्याचे ठरविले व त्याचे नामकरण डॉ. वा. ना. बेडेकर संशोधन व व्यवस्थापन अभ्यास संस्था असे ठेवले.

डॉक्टर त्यांच्या वयाचा विचार न करता कष्ट करत असत. तरुण मंडळींना लाज वाटावी एवढे अथक परिश्रम त्यांनी व्यवस्थापन विभागाच्या जडण-घडणीत घेतले. इमारतीसाठी निधी उभा व्हावा म्हणून त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, सोव्हिनीअरसाठी जाहिराती मिळविणे यासाठी त्यांनी वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन केले. प्रसंगी त्यांनी त्यांचा ओळखीच्या व्यक्तीकडे जाऊन निधी संकलनासाठी मदत केली. एवढेच नव्हे तर त्यांनी स्वतः एक्याऐंशीव्या (८१) वाढदिवसासाठी मिळालेली ८१,०००/- रुपयांची थैलीसुध्दा व्यवस्थापनाच्या इमारतनिधीसाठी दान केली. यावरून त्यांचा मनाचा मोठेपणा व संस्थेशी त्यांची असलेली आपुलकी लक्षात येते.

विद्या प्रसारक मंडळाचे वर्तमान संचालक डॉ. विजय बेडेकर हे विद्या प्रसारक मंडळाच्या सगळ्या संस्थांना आपल्या बरोबर घेऊन मोठी झेप घेत आहेत. विद्या प्रसारक मंडळाच्या महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यंदाच्या सर्वच उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला आहे. विद्या प्रसारक मंडळाच्या या महाविद्यालयाबाबतच्या सर्वच उद्दिष्टांना भविष्यात देदिप्यमान सुयश लाभो हीच ह्यानिमित्ताने हार्दिक शुभकामना!


२०२३-०४-०५

विख्यात ई.डी.टी.ए. तज्ञ डॉ. भालचंद्र गोखले यांचे देहावसान

कळविण्यास अत्यंत वाईट वाटते की, “बायपास सर्जरीशिवाय हृदयविकार निवारण” या पुस्तकाचे लेखक डॉ. भालचंद्र गोखले यांना दि.१२/०१/२०२३ रोजी देवाज्ञा झाली. मी डॉक्टरांच्या घरी तसेच गोरेगाव-मुलुंड रस्त्यावरील प्रयोगशाळेतही एकदा गेलेलो होतो. त्यांच्या चिरजिज्ञासू स्वभावाचे आणि बुद्धिमत्तेचे मला खूप अपरूप वाटे. उत्तम धात्विकीतज्ञ असूनही, त्यांना इतर असंख्य विषयांत कायमच रुची आणि गतीही असे. ई.डी.टी.ए. उपचार पद्धतीवरील त्यांच्या व्याख्यानांनी अगणित डॉक्टरांना मोलाचे ज्ञान मिळवून दिलेले आहे. भारतीय संस्कृतीतील चिरस्थायी अनुभवसाराचे पुनरुत्थान करण्याबाबतही आमच्यात चर्चा झालेली मला आठवते.



२०२३-०२-२३

आरव गोळेने आज ८ तास ४० मिनिटांत ३९ किमी पोहून धरमतरची खाडी पार केली!

कळविण्यास खूप आनंद होतो की, २२-०२-२०२३ रोजी, कुमार आरव अद्वैत गोळे राहणार डोंबिवली, याने ३९ किमी धरमतरची खाडी ८ तास ४० मिनिटांत पोहून पार केली. त्यानिमित्त आरव, त्याचे कुटुंबिय, त्याचे शिक्षक, त्याचे मदतनीस या सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन! आज त्याचे वय केवळ दहा वर्षे आहे!. त्याने अथक परिश्रम घेतले आहेत आणि यशश्री खेचून आणली आहे. यापुढेही अशीच उत्तुंग वाटचाल करण्यासाठी त्याला सर्व गोळे कुळातील मंडळींचे शुभार्शीवाद. श्री. सोमेश्वर देव आणि श्री. करंजेश्वरी देवीचे लाख लाख शुभाशीर्वाद आहेतच. पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन.

निर्धार स्वाध्याय तपेन प्राप्य, पोहून केलेस स्वतःच साध्य ।
हे आरवा कौतुक ते तुझेही, मातापिता आणि गुरू कृपाही ॥ 

अल्पवयातच परिश्रमपूर्वक थोर यश प्राप्त केले आहेस, हे गोळे कुळास अत्यंत भूषणावह आहे! प्राप्त केलेल्या सर्व सामर्थ्यांचा तुला तुझ्या भावी संकल्पांत खूप उपयोग तर होईलच. त्या सर्व शुभसंकल्पांना सुयश लाभो हीच प्रार्थना!

२०२३-०१-२७

निखिल यास विवाहाप्रसंगी त्रिमिती हार्दिक शुभेच्छा!



हे चित्र, कलेचा एक आविष्कार आहे. एक त्रिमितीय-एकचित्र-यदृच्छय-ठसा-बहुशिक्का-रेखन. एका चौकटीत अनेक वार, प्रतलातील दोन्हीही दिशांना, एकाच पुनरावर्ती चित्राचे, अनेक ठसे उमटवले जातात. पुनरावर्ती चित्राच्या प्रत्येक आवृत्तीत किंचितसा बदल करून, त्यांतील फरकाद्वारे पार्श्वभूमीत एक त्रिमितीय चित्र साकारले जाते. पुनरावर्ती ठशाची व आत दडवलेल्या मूळ चित्राची निवड केल्यावर, त्यांपासून असे त्रिमिती चित्र तयार करणार्‍या संगणकीय प्रणाली उपलब्ध आहेत. अशांपैकीच एक वापरून हे चित्रही तयार केलेले आहे.

चित्र कसे वाचाचे हे सांगणारे पद्य मागील बाजूस आहे. चित्रातील सुसंगती शोधण्यास ते उपयुक्त ठरेल, जीवनातील सुसंगतीही शोधण्यासही उपयुक्त ठरू शकेल. पद्यातील दुसरा अंतरा, वधुवरांस अशा प्रकारे सुसंगती साधण्याकरता शुभेच्छा व्यक्त करणारा आहे.

हे चित्र कुणीही सामान्य दृष्टी असलेली व्यक्ती वाचू शकते. त्याकरता, चित्र निर्मितीची पद्धत आणि वाचनाचे निर्देश यांवर थोड्याशा प्रत्यक्ष स्वाध्यायाची आवश्यकता असते.

चित्राच्या प्रतलास सरळ, ताठ, दृष्टीस लंब अशा रीतीने सुस्पष्ट दृश्यमानतेच्या अंतरावर धरावे. मग केंद्रबिंदू पृष्ठभागाच्या सहा इंच खाली (अथवा वर) आहे, असे समजून दृश्य पुन्हा नीट पाहावे. चित्राचा पृष्ठभाग पाण्यासारखा अथवा काचेसारखा नितळ, पारदर्शी दिसू लागतो. आरपार पाहतांना खोलवर (किंवा प्रतलावर उंच उठून) ते साकारलेले चित्र प्रकट होऊ लागते. पूर्णपणे दिसू लागते तेव्हा त्याचे त्रिमितीय अस्तित्व अचंबित करते!

This image, is a piece of art. A three-dimensional-single-image-random-textured patterns stereogram. A single image is repetitively placed one-after another in either of the two dimensions, in a frame of the paper, many times. Small changes are made in each repetitive pattern, so that these differences, create a three dimensional picture in the background. Once the repetitive pattern and the picture are selected, computer programs are available to create the three dimensional picture. This picture is also created using one of such programs.

A poem overleaf, tells how to read this picture. It would be useful for searching the co-relation in the picture, it may also help in co-relating the facts in real life. Second stanza gives the bride and the groom best wishes  in doing so.

This picture can be read by any person with normal vision. It needs an effort to understand the process of its creation and the directions to read it.

Hold the picture straight, upright, directly visible to the eyes, at the distance of distinct vision. Then see it, assuming the focus to be located six inches below (or above) the plane of paper. Plane of the paper may start looking glossy like water or glass surface. Seeing deep through (or elevated above the paper) it, the original picture starts appearing. When it is fully visible, it’s three dimensional existence gives us a surprise.


२०२२-१२-१५

व्रतस्थ शक्ती

व्रतात शक्ती असते! ती अपार असते. ती दुर्बळ, असहाय्य लोकांनाही, कमालीची उपयुक्त ठरते. ह्या गोष्टी, मला पुराणातील वानगी वाटत असत. कसलं व्रत आणि काय ती त्याची शक्ती! अशा पूर्णतः नास्तिक भावनेने मी संपूर्णतः पछाडलेलो होतो. मग आज असा अचानकच काय फरक पडला? आज मला साक्षात्कार झाला. ती शक्ती प्रत्यक्षात दिसून आली. प्रत्येक माणसास, ती प्रत्यही उजागर करता येते, हे उमजून आले. कालांतरापासूनचा माझा भ्रम निरस्त झाला.

ह्यापूर्वी, मनुष्य अन्नावाचून अमूक एक काळपर्यंत जिवंत राहू शकतो, पाण्यावाचून तमूक काळपर्यंत जिवंत राहू शकतो, हवेवाचूनही काही काळ गुदमरत राहू शकतो, आणि मुंडीविहीन धडाने दोन्हीही हातात पट्टे घेऊन शत्रुचे शिरकाणही करू शकतो (आठवा बाजीप्रभू देशपांडेंची अमर सत्यकथा!) एवढीच काय ती माहिती, मनावर कोरली गेलेली होती. प्रत्यक्षात कुणी असा जगतांना पाहण्याचे भाग्य मला लाभलेले नव्हते. अलीकडेच अण्णा हजारेंनी उपोषण[१] केले तेव्हा, अन्नाविना अण्णा तेरा दिवस खुशाल जगले होते. एवढेच नव्हे तर, तेराव्या दिवशी त्यांनी उपोषण सोडले, तेव्हा आता ते आडव्या हाताने जेवण हापसतील, असे वाटलेला मी, त्यांनी उद्या जेवणार असल्याचे जाहीर केल्यावर विस्मयचकीत झालो होतो. त्यावर ताण म्हणजे, तेरा दिवसांचे उपोषण केलेला माणूस उभा राहून, इतरांनाच धन्यवाद देणारे मोठे प्रोत्साहनपर भाषण, ताठ मानेने करता झाला तेव्हा, मला मानवी शक्तीच्या जागराचा अनोखा आविष्कार अनुभवायला मिळालेला होता.

मात्र, मी सर्वांना सांगून माझे आश्चर्य जाहीर करायचाच अवकाश होता, मला लोक अशा अशा अद्‌भूत कहाण्या सांगू लागले की, मी त्यांच्या कथानायकांप्रतीच्या आदराने अधिकाधिक विनम्र होत गेलो. इंटरनेटवर मला संत फतेहसिंग ह्यांच्या[२] २१ दिवसांच्या आमरण उपोषणाची माहितीही  मिळाली. म्हणजे अन्नाविना मनुष्य निदान २१ दिवस जिवंत राहत असल्याचा पुरावाच मिळालेला होता. एकाने तर मला, आश्चर्यकारक  अशा एका व्रताची गोष्ट सांगितली. छठ पूजेच्या वेळेस बिहारी स्त्रिया म्हणे, अनेक दिवसपर्यंत कठोर उपोषण अंमलात आणूनही, घरातील सर्वांना, पै-पाहुण्यांना पंच-पक्वांन्नांचे जेवण करून वाढतात. रमझान महिन्यांत उपवास करणारे अनेक मुसलमान मलाही माहीत होते, मात्र ते सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत, इफ्तार पार्ट्यांत खाद्यपदार्थांची रेलचेल उडवून देत असल्याने त्यांचे विशेष अपरूप मला वाटे ना.

गणेश चतुर्थी, ऋषीपंचमी, महालक्ष्म्यांच्या दिवसांत अनेक स्त्रिया परंपरेने उपास करत आलेल्या आहेत. माझ्या लहानपणापासूनच, आमच्या घरी मात्र अशा व्रतांकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नव्हते. म्हणून मला त्यातल्या “व्रत” संकल्पनेची फारशी सखोल माहिती नव्हती. व्रताबाबत मला फारसे कौतुकही नव्हते. लहानपणी कहाणीसंग्रहातील व्रतांच्या कथा मात्र मी पूर्ण तपशीलाने आणि अत्यंत उत्सुकतेने वाचलेल्या मला आठवतात. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही अशी शपथ घेऊन लोक जे व्रत पत्करत असत, ते ईप्सित आराध्य दैवत प्रसन्न होऊन समोर प्रकट होईपर्यंत अत्यंत कर्मठपणे पाळत असत. असेच त्यात ठसवलेले असे. माझ्या पुर्‍या बालवयात, मी मात्र कुणा दैवतास साक्षात प्रकटतांना पाहिलेले नसल्याने, कहाणीसंग्रहातील कथा मला भाकड वाटू लागल्या ह्यात नवल ते काय?

पुढे मी कामाला लागलो. नियमितपणे चहा, नास्ता, जेवण, पुन्हा चहा, पुन्हा नास्ता, रात्रीचे जेवण असा भरगच्च खानपान कार्यक्रमच माझी दिनचर्या झाला. माझीच काय माझ्या आजूबाजूच्या सगळ्यांची, थोड्या-अधिक प्रमाणात हीच कहाणी असे. एकदा आम्ही सगळे असेच चहा-नास्त्याला गेलो, तेव्हा सोबतचे एक सहकारी नास्ता घेतांना दिसले नाहीत. मी त्यांना विचारले का हो? आज उपवास का? ते हो म्हणाले. त्यांनी केवळ चहाच घेतला. मग समजले की ते दरच गुरूवारी उपवास करत असत. त्या दिवसांत आम्ही जवळजवळ दिवसभरच प्रचलित प्रकल्पाच्या संदर्भात एकत्र काम करत असायचो. मात्र, कुठल्याही गुरूवारी त्यांचा चेहरा दुर्मुखलेला, थकलेला, किमान कोमेजलेलाही दिसत नसे. मला आश्चर्य वाटायचे. त्या काळात क्वचित एखादा नास्ता चुकला, अगदी जेवायला उशीर झाला तरीही, मला मरगळ जाणवत असायची. मग हे उपवास करूनही कसे काय राहू शकतात. म्हणून एक-दोनदा मीही एखादे जेवण वगळून टाकायचे प्रयत्न केले. पण मला हे कबूल करावेच लागेल की, त्या वेळी मला कमालीचा थकवा जाणवत असे. त्यामुळे मग मी ते प्रयत्न सोडून दिले.

गेल्या वर्षी नवरात्र सुरू झाले. तेव्हा आमच्या घरी मोलकरणीचे काम करणार्‍या बाई, चपला न घालताच कामाला आलेल्या मी बघितल्या. थोडी आणखी चौकशी केली तेव्हा समजले की, त्या नवरात्रीचे नऊही दिवस उपवास करतात. गेली जवळपास दहा वर्षे त्या आमच्याकडे काम करत आहेत. मात्र, त्या सर्व काळात मला हे कधी समजलेही नव्हते. म्हणजे त्या उपवास करतच होत्या. सणासुदीला सगळ्यांकडे जास्तीची कामेही त्यांच्याकडून करवून घेत असतच. तरीही ह्या बाई, बापाविना पोरक्या असलेल्या आपल्या चारही मुलांचे स्वयंपाकपाणी करून, इतर दहा घरची नेहमीची कामे, तसेच सणासुदीला वाढलेली कामे करून, उपवासही करत होत्या. चपलाही घालत नव्हत्या. व्रताच्या नियमांनुसार आणखी न जाणे काय काय करत होत्या! मनातल्या मनात मी व्रतस्थ शक्तीपुढे नतमस्तक झालो.

यंदाच्या नवरात्रींच्या दिवसांत तर, रस्त्यांवर फिरतांना मी काळजीपूर्वक पाहत असे. मला अनेक लोक अनवाणी चालतांना दिसून येत होते. डोंबिवलीत तसेही अनेक जैन लोक मंदिरात जातांना अनवाणी चालत असलेले मी रोजच पाहतो. मात्र हे आताचे अनवाणी चालणे निराळे होते. एवढी वर्षे हे सगळे लोक नवरात्रींच्या दिवसांत असेच अनवाणी चालत असणार. पण मलाच तेव्हा जगाकडे पाहण्याची सुयोग्य दृष्टी नव्हती. असे आता जाणवत आहे. अशाच व्रतस्थ लोकांच्या निर्धारांवर, सामाजिक शक्तीचे स्त्रोत विसंबून असतात. ऋषीमुनींना सुटेना असा भुकेचा उखाणा त्यांनी यशस्वीरीत्या सोडविलेला आहे. आपणही अशाप्रकारच्या निर्धाराचे, निश्चयाचे असे बळ अंगी बाणवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशी प्रेरणा आज माझ्यात निर्माण झालेली आहे.

अमेरिकेत गेलेले भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी, मॅडिसन-स्क्वेअर-गार्डन प्रेक्षागृहात, अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीयांना संबोधित करत होते. भाषण जोशपूर्ण झाले. तिथल्या लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देणारे काही निर्णयही, त्यांनी तिथे जाहीर केले. सगळे प्रेक्षक खूश होते. अखेरीस भाषण संपता संपता त्यांनी सगळ्या प्रेक्षकांकडून भारत माता की जय अशी घोषणा करवून घेतली. त्यावर ते म्हणाले की, आणखी जरा जोरात म्हणा, भारत माता की जय. कारण माझे जरी उपवास सुरू असले, तरी तुमचे नाहीत. मग पुन्हा त्रिवार घोषणा झाल्या, भारत माता की जय. अतिशय जोशात. मला मग समजले की, आपले पंतप्रधान गेल्या पस्तीस वर्षांपासून, दरच वर्षी नवरात्रांत उपवास करत आहेत. मी आश्चर्यात बुडून गेलो.

उपवासाच्या आदल्या दिवशी भरपेट खाऊन घेणारे लोक मी पाहिले आहेत. उपवासाच्या दिवसांत घरच्यांकरवी आपली जास्तीची बडदास्त ठेवून घेणारे लोक मी पाहिले आहेत. उपवासाच्या दिवसांत उपवासाचे पदार्थ, ह्या नावाखाली उत्तमोत्तम पदार्थांची चंगळ करून घेणारे लोकही, मी पाहिलेले आहेत. ’उपाशी आणि दुप्पट खाशी’, ही म्हणही अशा लोकांच्या चिरंतन अस्तित्वाचे ऐतिहासिक पुरावेच सादर करत नाही काय?

मात्र उपाशी असतांना आपला नियमित कार्यक्रम कुठल्याही तक्रारीविना पार पाडणारे, देशाकरता स्वतःहून अंगावर घेतलेल्या लक्षावधी अपेक्षांच्या जबाबदार्‍या विना-तक्रार सांभाळणारे, आणि उपवास काळात लिंबू सरबतही नाकारणारे, आपले पंतप्रधान अभूतपूर्व आहेत. एकमेवाद्वितीय आहेत. दृढनिश्चयी आहेत. देशभक्तीची ज्योत अंतरात तेवती राखून, तिच्या प्रकाशात, देशाच्या उजळलेल्या भवितव्याप्रती असणारी आस्था, त्यांनी जपून ठेवली आहे. हे बंधन त्यांनी स्वतःच स्वतःस घालून घेतलेले बंधन आहे. स्वयं स्वीकृतं नः सुगं कारयेत्‌ । क्रांतिकारक कवी विनायक दामोदर सावरकर “माझे मृत्यूपत्र” ह्या आपल्या अजरामर काव्याचा समारोप करत असतांना असे म्हणतात कीः

की घेतले व्रत न हे, अम्हि अंधतेने । लब्धप्रकाश इतिहास निसर्गमाने ॥
जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे । बुद्ध्याच वाण धरिले करि हे सतीचे ॥ 

म्हणजे, आम्ही (राष्ट्रसेवेचे) हे व्रत काही आंधळेपणाने पत्करलेले नाही. प्रसिद्धीच्या लोभाने, किंवा सहजच स्वीकारलेले नाही. आम्हाला ते दिव्य आहे, अद्‍भूत आहे हे माहीत आहे. तरीही आम्ही हे अवघड कर्तव्य (सतीचे वाण) जाणीवपूर्वक हाती घेतले आहे.

त्याप्रमाणेच, नरेंद्र मोदींनी घेतलेले राष्ट्रसेवेचे व्रत हे डोळसपणे, समजून, उमजून, जाणीवपूर्वक पत्करलेले व्रत आहे. त्यांचे नवरात्रींच्या उपवासाचे व्रत ते ज्या कर्मठपणे पाळत आहेत, तसेच कर्मठपणे ते राष्ट्रसेवेचे व्रतही पाळत आहेत.

अशी व्रते, अशी बंधने, हे रेशमाचे बंध असतात. मानले तर आहेत. न मानले तर नाहीत. विख्यात कवियित्री शांता शेळके म्हणतातः

हे बंध रेशमाचे, ठेवी जपून जीवा । धागा अतूट हाच, प्राणांत गुंतवावा ॥
बळ हेच दुर्बळांना, देती पराक्रमांचे । तुटतील ना कधीही, हे बंध रेशमाचे ॥ 

गरीब, दुबळ्या, वंचितांना, जेव्हा उपजीविकेची साधने उपलब्ध नसतील; तेव्हाही त्यांना आपल्या पंतप्रधानांच्या व्रताची हकिकत समजल्यावर, आणि त्यांच्या कर्मठतेने केलेल्या व्रताचरणाची माहिती समजल्यावर; प्राप्त परिस्थितीशी झुंजण्याकरता त्यांच्यात हजार हत्तींचे बळ निर्माण होईल. नरेंद्र मोदींच्याच म्हणण्याप्रमाणे, जर सव्वाशे कोटी भारतीयांनी, राष्ट्रसेवेच्या अशाच शक्तीशाली व्रताचा स्वीकार केला तर, अशक्यप्राय उद्दिष्टेही आपण सहजच गाठू शकू. निदान मला तरी आता अशा व्रतस्थ शक्तीची ओळख पटली आहे. स्वतःमध्ये ती उजागर करण्याचा मी भरकस प्रयत्न करेन. मान्यवर, आपण काय म्हणता?

पूर्वप्रसिद्धीः व्रतस्थ शक्ती, ठाण्यातील विद्याप्रसारक मंडळाच्या ’दिशा’ मासिकाचा २०१४ सालच्या डिसेंबरचा अंक.


[१]  १५ ऑगस्ट २०११ ते २८ ऑगस्ट २०११ असे सलग १३ दिवस अण्णा हजारे ह्यांनी लोकपाल विधेयक संसदेत मंजूर व्हावे म्हणून उपोषण केलेले होते. http://www.annahazare.org/

[२] १८ डिसेंबर १९६० ते ९ जानेवारी १९६१ असे सलग २१ दिवस संत फतेहसिंग ह्यांनी पंजाबी भाषक राज्याच्या निर्मितीकरता उपोषण केले होते. http://en.wikipedia.org/wiki/Fateh_Singh_(Sikh_leader)