डॉ. मलूर रामस्वामी श्रीनिवासन
(जन्मः ५ जानेवारी १९३०; मृत्यूः २० मे २०२५)
कळविण्यास दुःख होते की, पूर्व अध्यक्ष अणुऊर्जाआयोग आणि अणुऊर्जाविभागाचे पूर्वसचिव डॉ. मलूर रामस्वामी श्रीनिवासन यांनी, २० मे २०२५ रोजी वयाच्या ९५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
डॉ. श्रीनिवासन सप्टेंबर १९५५ मध्ये अणुऊर्जाविभात रुजू झाले होते. डॉ. होमी भाभा यांचेसोबतच त्यांनी, भारताच्या पहिल्या अणुभट्टीवरील आपल्या देदिप्यमान कारकीर्दीची सुरूवात केली होती. अप्सरा नावाची ती अणुभट्टी ऑगस्ट १९५६ मध्ये प्रथमच क्रांतिक झाली.
ऑगस्ट १९५९ मध्ये श्रीनिवासन, भारतातील पहिल्या अणुऊर्जासंयंत्राच्या उभारणीकरताच्या प्रकल्पाचे प्रमुख प्रकल्प व्यवस्थापक म्हणून नियुक्त केले गेले. त्यांच्या नेतृत्वात भारताचा अणुकार्यक्रम साकारला गेला. १९६७ साली त्यांनी मद्रास अणुसंयंत्राचे प्रमुख प्रकल्प अभियंता म्हणून कार्यभार स्वीकारला.
डॉ. श्रीनिवासन यांनी राष्ट्रीय महत्त्वाच्या अनेक कळीच्या पदांवर कार्य केले. १९७४ मध्ये ते ऊर्जाप्रकल्प अभियांत्रिकी विभागाचे संचालक झाले. तसेच अणुऊर्जामंडळाचे अध्यक्षही झाले. या भूमिकेतून त्यांनी देशभरातील सर्व अणुऊर्जाप्रकल्पांचे नियोजन, उभारणी आणि संचालनही केले.
१९८७ साली त्यांची नियुक्ती अध्यक्ष अणुऊर्जाआयोग आणि अणुऊर्जाविभागाचे सचिव म्हणून केली गेली. त्याच साली ते भारतीय अणुऊर्जा महामंडळाचे संस्थापक संचालकही झाले. त्यांच्या नेतृत्वात देशात १८ अणुऊर्जा संयंत्रे विकसित केली गेली. त्यांपैकी सात कार्यान्वितही झाली होती.
भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमातील त्यांच्या सहभागाखातर त्यांना पद्मविभूषण सन्मान प्रदान करण्यात आला.
भारताच्या अणुऊर्जाक्षेत्रात, द्रष्टे नेतृत्व, तांत्रिक सर्वोत्कृष्टता
आणि देशाप्रतीची अविचल सेवावृत्ती यांखातर डॉ. श्रीनिवासन यांचे स्मरण केले जाईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा