राजा भर्तृहरी
राजा भर्तृहरी एक महान कवी होता. संस्कृत साहित्यातील एक विख्यात तत्त्वचिंतक होता. अवंती-उजैनीचा राजा होता. ज्याचे नावे विक्रमसंवत ओळखले जाते, त्या सम्राट विक्रमादित्याचा वडील भाऊ होता. नीतिशतक, शृंगारशतक, वैराग्यशतक या शतकत्रयाद्वारे त्याने संस्कृत साहित्याला अलंकृत केलेले आहे. भारतीय जनमानसावर, या शतकत्रयीतील सुभाषितांची अमिट छाप आहे. संस्कृत व्याकरणावरील त्याचा "वाक्यपदीय" हा ग्रंथही तेवढाच विख्यात आहे. अशा राजा भर्तृहरीची ही परिचयकथा आहे.

हे आहे भर्तृहरीचे मंदिर. अलवार-जयपूर रस्त्यावरील सारिस्काघाटीत ३५ किलोमीटरवर एक तपोभूमी आहे, जिथे हे मंदिर आजही अस्तित्वात आहे. भर्तृहरीने आपल्या आयुष्यातील अखेरचे दिवस इथेच व्यतीत केले होते. दरसाल ऑगस्ट महिन्यात इथे यात्रा भरते.
राजा भर्तृहरीच्या दरबारात एकदा एक साधू आला. त्याने एक दिव्य फळ राजाला दिले. सांगितले की जो कुणी हे फळ खाईल तो आरोग्यसंपन्न होईल. दीर्घायू होईल. राजाचे आपल्या पिंगला नावाच्या राणीवर नितांत प्रेम होते. म्हणून त्याने ते फळ राणीस दिले. तिचे प्रेम सेनापतीवर असल्याने तिने ते फळ सेनापतीस दिले. सेनापतीचे प्रेम एका राजनर्तिकेवर होते. त्याने ते फळ तिला दिले. राजनर्तिकेला असे वाटले की, असे दिव्य फळ खाण्याकरता राजा भर्तृहरीच सर्वात योग्य व्यक्ती आहे. म्हणून तिने ते दरबारात आणून राजास नजर केले. पुढे राजास सर्व हकिकत समजली. राजा अतिशय उद्विग्न झाला. त्याला संसाराप्रती वैराग्य उत्पन्न झाले. म्हणून त्याने आपला धाकटा भाऊ विक्रमादित्य यास राज्यशकट सोपवला आणि स्वत: वानप्रस्थाश्रमास रवाना झाला.
या सर्व हकीकतीस त्याने नीतीशतकातील एका सुभाषितात गुंफून ठेवले आहे आणि सर्व संबंधित व्यक्तींचा त्याच सुभाषितात धिक्कारही केला आहे. ते सुभाषित खालीलप्रमाणे आहे.
यां चिन्तयामि सततं मयि सा विरक्ता ।
साप्यन्यमिच्छति जनं स जनोऽन्यसक्तः ॥
अस्मत्कृते च परिशुष्यति काचिदन्या ।
धिक् तां च तं च मदनं च इमां च मां च ॥
म्हणजे:
करतो ध्यान जिचे सतत मी, अनुरक्त मजवर न ती ।
जडले प्रेम जयावरी तिचे, त्याचीही प्रिया वेगळीच ॥
मजकरता सुकवित यौवनही ती, तिजला न तो आवडे ।
धिक् तिस, त्यास, मदनास, हीस; वाटे माझे मला वावडे॥