२०२५-०५-२२
अणुचाचणीच्या स्थलनिवडीची कहाणी
२०२५-०५-२०
डॉ. मलूर रामस्वामी श्रीनिवासन निवर्तले
डॉ. मलूर रामस्वामी श्रीनिवासन
(जन्मः ५ जानेवारी १९३०; मृत्यूः २० मे २०२५)
कळविण्यास दुःख होते की, पूर्व अध्यक्ष अणुऊर्जाआयोग आणि अणुऊर्जाविभागाचे पूर्वसचिव डॉ. मलूर रामस्वामी श्रीनिवासन यांनी, २० मे २०२५ रोजी वयाच्या ९५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
डॉ. श्रीनिवासन सप्टेंबर १९५५ मध्ये अणुऊर्जाविभात रुजू झाले होते. डॉ. होमी भाभा यांचेसोबतच त्यांनी, भारताच्या पहिल्या अणुभट्टीवरील आपल्या देदिप्यमान कारकीर्दीची सुरूवात केली होती. अप्सरा नावाची ती अणुभट्टी ऑगस्ट १९५६ मध्ये प्रथमच क्रांतिक झाली.
ऑगस्ट १९५९ मध्ये श्रीनिवासन, भारतातील पहिल्या अणुऊर्जासंयंत्राच्या उभारणीकरताच्या प्रकल्पाचे प्रमुख प्रकल्प व्यवस्थापक म्हणून नियुक्त केले गेले. त्यांच्या नेतृत्वात भारताचा अणुकार्यक्रम साकारला गेला. १९६७ साली त्यांनी मद्रास अणुसंयंत्राचे प्रमुख प्रकल्प अभियंता म्हणून कार्यभार स्वीकारला.
डॉ. श्रीनिवासन यांनी राष्ट्रीय महत्त्वाच्या अनेक कळीच्या पदांवर कार्य केले. १९७४ मध्ये ते ऊर्जाप्रकल्प अभियांत्रिकी विभागाचे संचालक झाले. तसेच अणुऊर्जामंडळाचे अध्यक्षही झाले. या भूमिकेतून त्यांनी देशभरातील सर्व अणुऊर्जाप्रकल्पांचे नियोजन, उभारणी आणि संचालनही केले.
१९८७ साली त्यांची नियुक्ती अध्यक्ष अणुऊर्जाआयोग आणि अणुऊर्जाविभागाचे सचिव म्हणून केली गेली. त्याच साली ते भारतीय अणुऊर्जा महामंडळाचे संस्थापक संचालकही झाले. त्यांच्या नेतृत्वात देशात १८ अणुऊर्जा संयंत्रे विकसित केली गेली. त्यांपैकी सात कार्यान्वितही झाली होती.
भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमातील त्यांच्या सहभागाखातर त्यांना पद्मविभूषण सन्मान प्रदान करण्यात आला.
भारताच्या अणुऊर्जाक्षेत्रात, द्रष्टे नेतृत्व, तांत्रिक सर्वोत्कृष्टता
आणि देशाप्रतीची अविचल सेवावृत्ती यांखातर डॉ. श्रीनिवासन यांचे स्मरण केले जाईल.
२०२५-०४-१२
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
उणापुरा वीस वर्षाचा तरूण, १९८० च्या आसपास, नागपूरहून चंद्रपूरला आणि मग आलापल्लीला रवाना झाला. वनखात्याचा अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यामुळे, रुजू होण्यासाठी. आलापल्ली नक्षलग्रस्त होती, ती त्याही पूर्वीपासून. पण आम्हाला मात्र ते माहितच नव्हतं. त्याला आलापल्ली फाट्यावर उतरवून एस.टी. पुढे निघून गेली. वेळ संध्याकाळी सातची असावी. सोबत जुन्या काळात असायची तशी पत्र्याची एक ट्रंक, एक होल्डाल (ह्या वस्तुला आता केवळ ऐतिहासिक अर्थच काय तो उरला आहे!), हँडबॅग वगैरे सामान होते. रस्त्यावर इतर कुणी चिटपाखरूही नाही. अंधार गुडूप झालेले. गाव तर दिसू शकेल अशा अंतरावरही नव्हते. मग त्याने काय करावे? सामान घेऊन जाणे एकट्याने शक्यच नव्हते. हातात नेता येईल ते सामान घेऊन तो गावात गेला. उरलेले सामान तिथेच रस्त्यावर. अर्थात नेणार तरी कोण म्हणा उचलून! मग क्वार्टर म्हणून मिळालेले घर रिकामे नसल्याने, तात्पुरत्या मिळालेल्या निवार्यात दिवाबत्तीची सोय करून उरलेले सामान आणले. दूर, दाट निबिडात, एकट्याने, रात्रीचा पोहोचून, निर्भीडपणे आपले बस्तान बसवणारा आमचा भाऊच होता. ह्याचा मला अभिमान आहे.
२०२५-०४-०६
पुस्तक परिचय: अपराजिता
संदर्भः राणी नाइकीदेवी, अपराजिता, मेजर मोहिनी गर्गे-कुलकर्णी, मिहाना पब्लिकेशन्स, प्रथमावृत्ती १५ सप्टेंबर २०२४, किंमत रु.७५०/-, पृष्ठे ८३६, पृष्ठ-१४७
गोव्याचे कदंबराजे महामंडलेश्वर परमर्दीदेव (इसवीसन ११४७-४८) यांची मुलगी नाइकीदेवी हिचा विवाह, आन्हिलगडचे राजे, चालुक्य वंशातील अजयपाल यांचेसोबत झाला. इसवीसन ११७२ साली अजयपाल सिंहासनारूढ झाले. इसवीसन ११७५ साली घातपाताने त्यांचा मृत्यू ओढवला. त्यांना मूलराज नावाचा लहान मुलगा होता. त्यास गादीवर बसवून नाइकीदेवीने कारभार हाती घेतला. ११७८ साली ही परिस्थिती लक्षात घेऊन विजय मिळवण्यास सोपा देश पाहून महम्मद घोरीने मुलतानहून आन्हिलवाडा या चालुक्यांच्या श्रीमंत राजधानीकडे कूच केले. ऊंच नावाच्या गावी तो येऊन पोहोचला. माऊंट अबूजवळील सिरोही जिल्ह्यातील कायदरा येथून त्याने राणी नाइकीला निरोप पाठवला की, “तू तुझ्या राज्याची संपत्ती, स्त्रिया आणि तुझ्या मुलांसह स्वतःला माझ्या स्वाधीन कर, म्हणजे मी तुझ्या राज्यावर हल्ला करणार नाही. मोठा रक्तपात टळेल. स्त्रियांच्या हातात तलवार शोभत नाही. स्त्रिया तर जनानखान्याची शोभा असतात.”
इथे राणीने मोठा पवित्रा घेतला. घोरीला पुढे सरकू न देता माऊंट अबूच्या पहाडातच थोपवण्याकरता राणीने त्याचा प्रस्ताव बिनशर्त मान्य असल्याचे त्यास कळवले. घोरीला आनंद झाला. त्याला अशीच हुलकावणी देणे गरजेचे होते.
गुजरातचे हिंदू सैन्य आपणहून पुढे सरकत, सहानुभूतीदार अन्य हिंदू राजांची मदत घेत, अबू पहाडाच्या आजूबाजूने पुढेपर्यंत चालून गेले. तेथे राणीने त्या प्रसंगास अत्यंत धैर्याने तोंड दिले. छोट्या राजपुत्रास हिंदू सैन्यासमोर आणून सांगितले की, मी हा बालराजा तुमच्या ओटीत घालत आहे. तुम्ही याचे प्राणपणाने रक्षण करा. मग छोट्या मूलराजाला पाठीशी बांधून राणी सैन्यासह घोरीकडे जाण्याकरता झंझावातासारखी पुढे निघाली. अनेक मांडलिक राजांना तिने सोबत घेतले. घोरीच्या सैन्यास घेरले. पडलेल्या मुसळधार पावसाची मदत घेतली. गनिमी काव्याने शत्रूस त्रस्त केले. अंतिमतः घोरीचे सैन्य अक्षरशः कापून काढत राणीने रणसंग्राम जिंकला. घोरीच्या सैन्याची पार धूळधाण उडाली. पळता भुई थोडी झाली. घोरी ससैन्य माघारी फिरला. राणीच्या सैन्याने त्याचा पाठलाग करून त्यास राज्याच्या सीमेच्या पार पलीकडे हाकलून दिले. त्यानंतर मग घोरीने पुन्हा कधीही गुजरातवर हल्ला केला नाही.
ही आणि यांसारख्या चिरप्रेरणादायी कहाण्यांनी भरपूर असलेले ’अपराजिता’ हे पुस्तक सगळ्या देशाभिमानी लोकांनी अवश्य वाचावे आणि ’जया’चा खरा इतिहास जाणून घ्यावा!
महम्मद घोरीचा सपशेल पराभव
हिंदू सैन्या जयाचा, मुकुट गवसला, नाइकी जिंकली ती।
बोला होवो तियेचा, विजय, उजळु दे, हिंदू ऐक्याची नांदी॥धृ॥
गोव्याची राजकन्या, परिणत वधु ती, झालि चालुक्यराणी
दुर्दैवाने तियेच्या, अजय पति तिचा, घातपाती निमाला।
छोट्याशा मूलराजा, तखति बसवुनी, नाइकी राज्य हाके
जोखूनी या स्थितीला, सहज विजय तो, चिंतुनी घोरि आला॥१॥
पोहोचूनी ‘ऊंच’ गावी, लिहत तिजसि तो, ’राणि ये तू म्हणाला
शोभे स्त्री ती जनानी, तुज न खडग ते, शोभते, टाळ हिंसा’।
राणी ती स्वाभिमानी, हलकट रिपुला, ’थांब येते म्हणाली’
घोरी आनंदि झाला, नकळत थबके, वाट पाहे तियेची॥२॥
हिंदूंचे सैन्य सारे, जमवुन पुढती, ठेवि त्यांचे समोरी
छोट्या राजास राणी, विनवत सकला, याचि रक्षा करा रे।
राजे मैत्रीतलेही, जुळवत पुढती, वाट चाले अबूची
कावा मोठा गनीमी, करत करकचे, पाश चोहीकडूनी॥३॥
आबूच्या त्या पहाडी, उमजत सगळे, मार्ग राणीस होते
घोरीचे सैन्य मोठे, अलगद अडके, सापळा होत भूमी।
उंदीरा मांजरीशी, चिवडत दमवी, शत्रुसैन्यास राणी
केले ते ध्वस्त हेतू, रसद अडवली, केलि भू त्यास थोडी॥४॥
पाठीशी मूलराजा, अवचित पडत्या, पावसाच्या कृपेने
टाके छापे रिपूला, छळत छळत ती, नेई लोटीत पाठी।
हानी सोसे अती तो, कळत न तया, शत्रु येई कुठूनी
सोडूनी जिंकणे हे, अवजड सगळे, सैन्य पाठीच धावे॥५॥
राणीची झेप भारी, तळपत समरी, शत्रुला हाकले ती
हिंदू सैन्यास येई, नकळत विजयी, चेव देशाभिमानी।
घोरीला पाठि जाता, पुरत न भुमिही, प्राण कंठास येई
धक्का तो जीविताचा, धरत मग पुन्हा, घोरी आलाच नाही॥६॥
नरेंद्र गोळे २०२५०४०६
२०२५-०३-०१
प्रिय मित्र सुरेश यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मध्यमवर्गीय, पापभिरू, शाकाहारी, सख्खा मित्र;
हजारो कोटी रुपये मूल्याच्या आस्थापनेचा संचालक होतो,
ही घटनाच असाधारण आहे. मात्र तसा तो झाला.
माझा सख्खा मित्र सुरेश हावरे, ’हावरे बिल्डर्स’चा संचालक झाला.
जगभरातील सुमारे दहा कोटी बेघरांना घर कसे मिळेल?
या विवंचनेत हल्ली तो स्वतःला गुंतवून घेत असतो.
आज त्याचा वाढदिवस.
त्यानिमित्ताने केलेले हे त्याचे गुणगान आणि अभिष्टचिंतन.
रुजवत महतीही चांगल्या वर्तनाची
मिळवत सकलांचे स्नेह राहे सदाची ।
फिरत फिरत पाहे देश तो कौतुकाने
सतत हृदयि राहे आपल्या कर्तबाने ॥१॥
नकळत शिरलेले दोष संस्थादिकांत
करत बदल साधे नेमके योग्य तेच ।
जनहित मनि राहे कार्य ते कोणतेही
कुणि न कधि दुखावा वागणे हो असेची ॥२॥
सुखवत स्वजनांना वैभवी ने सदाची
थकत न श्रम होता हातिच्या नेक कर्मी ।
कर्मठ दिनचर्या वाट चाले सुरेश
अनुसरत पतीला पाठ राखे कलत्र ॥३॥
सुख बरसत राहो राहु दे पूर्ण स्वास्थ्य
गुण मिरवत राहो पुत्रपौत्रादि सर्व ।
अनुसरु मग आम्ही मार्ग तोची सुखाचा
अवसर बघता हा आज आनंदण्याचा ॥४॥
नरेंद्र गोळे
२०२५०३०१
२०२५-०२-२५
शतायु संघ संस्कार
रविवार दिनांक २७ सप्टेंबर १९२५, विजयादशमी, या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विधिवत स्थापना झाली. १९२५ च्या विजयादशमीस त्याला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त माझ्या पाहण्यातील संघाची श्रेयसंचिते आणि ’शतायु संघ संस्कारां’चे भविष्यातील स्वरूप यावरचे माझे विचार इथे मांडत आहे. माझ्या अपेक्षाही इथे नमूद करत आहे.
माझे बालपण नागपुरातच गेलेले असल्याने, संघाशी माझा लहानपणापासूनच संबंध आला. माझ्या घरासमोरच संघाची शाखा भरत असे आणि ध्वजही माझ्या घरीच ठेवलेला असे. शिशू, बाल, तरूण म्हणून मी त्याच शाखेचा स्वयंसेवक होतो. खापरीला होणारी संघाची अनेक शिबिरे मला आठवतात. २५ जून १९७५ रोजी आणीबाणी लागल्यावर, संघावर बंदी घातली गेली. ती उठवावी म्हणून सत्याग्रह करायचा निश्चित झाले. त्याकरता कोण कोण सत्याग्रह करणार ते ठरवायला माझ्या घरीही सभा झाल्याचे मला स्पष्ट आठवते. संघाचे ’ऑफिसर्स ट्रेनिंग कँप - ओ.टी.सी.’ रेशीमबागेत भरत असत. कुतुहलाने आम्हीही ते बघायला नेहमीच जात असू. प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष, तृतीय वर्ष शिक्षित स्वयंसेवकच आमच्या शाखेत मुख्यशिक्षक होत असत. मी इंजिनिअरिंग कॉलेजात जाऊ लागलो. तेथीलही दोन प्राध्यापक संघाचे अधिकारी होते. आमच्या शाखेतही ते अनेकदा येत असत.
मनुष्यापाशी सात प्रकारच्या जन्मजात प्रज्ञा असतात. त्यांचा वापर करून निरनिराळ्या सात प्रकारची कौशल्ये विकसित करणे शक्य असते.
भाषा कौशल्य: आपल्या भाव-भावना, संवेदना, विचार, संकल्पना, आशा-आकांक्षा, अपेक्षा, संदेश, संकेत; इतर मनुष्यप्राण्यांस समजावून देण्याचे म्हणजेच बोलून संवाद साधता येण्याचे कौशल्य.
गणितीय कौशल्य: आसपासच्या वस्तू, त्यांचे परिमाण, आकार-प्रकार, संगती-विसंगती, तुलनात्मक निदान, तुलनात्मक प्रमाण; या सार्यांचे सापेक्ष गणन व मापन करता येण्याचे कौशल्य. तर्ककौशल्य.
शारीरिक कौशल्य: शारीरिक हालचाली करण्याचे कौशल्य. यात आसन, प्राणायाम, व्यायाम, खेळ, वाद्यवादन, नृत्य, निरनिराळ्या कसरती करण्याचे कौशल्य यांचा समावेश होतो.
सांगितीक कौशल्य: शब्द, स्वर, नाद,
ताल, ठेका, गत, लय, गीत, संगीत यांचे ज्ञान,
त्यांची निर्मिती, आस्वाद, वर्णन, विश्लेषण, चिकित्सा,
अभ्यास, आराधना आणि परस्परांत विनिमय करण्याचे
कौशल्य.
कला कौशल्य: चित्रकला, हस्तकला, शिल्पकला, कुंभारकला, चांभारकला, कासारकला, विणकाम, शिवणकला, पणन-विपणन कला, इत्यादी अनेकानेक कौशल्यांचा समावेश होत असतो.
व्यक्ती विषयक कौशल्य: इतर व्यक्तींशी सुसंवाद साधण्याचे कौशल्य. यात प्रेम, मैत्री, नातेसंबंध, कौटुंबिक संबंध तसेच परस्परपूरक संबंध यांचा समावेश होतो.
समष्टी विषयक कौशल्य: व्यक्तीव्यक्तींत संघटन घडवून आणण्याचे कौशल्य. यात व्यवस्थापन, प्रशासन, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, लोककारण, देशकारण, विश्वकारण इत्यादींचा समावेश होतो.
यांपैकी अखेरची दोन कौशल्ये विकसित करण्याचे अत्यंत नेमके
प्रयत्न संघशाखांत करण्यात येतात. ’ओ.टी.सी. म्हणजे खरे तर, ऑर्गनायझेशनल ट्रेनिंग
कँप’. ’संघटनकौशल्य प्रशिक्षण शिबिर’. याहून समष्टीविषयक कौशल्याचे वर्ग निराळे
काही असूच शकत नाहीत. असा माझा समज आहे. गेल्या शंभर वर्षांत व्यक्ती आणि समष्टी
विषयक कौशल्यांच्या विकासाचे जे मार्ग संघाने शोधून काढलेले आहेत, ते अपूर्वच
नव्हेत तर जगात इतरत्र कुठेही आढळून येत नाहीत असे आहेत. त्यामुळेच तर देशास
सशक्त, समर्थ नेतृत्व देण्यात संघ यशस्वी झाला आहे. मात्र भाषा, गणित, शारीर,
सांगितीक आणि कला कौशल्यांबाबत असे म्हणता येत नाही. हीही कौशल्ये उपजत बाळगणारे
लोक बालवयातच हेरून त्यांचा बहुविध विकास घडवण्याचे कामही संघाला सहजच साधता येईल
असे आहे. ’शतायु’ झालेले संघसंस्कार आता ते कामही हाती घेवोत हीच ईश्वरचरणी
प्रार्थना. भविष्यात संघातून जसे प्रचारक घडतात तसे भाषाभ्यासी, गणिती,
शारीरकर्तबकुशल, संगीतज्ञ आणि कलाकुशल लोक निर्माण होऊ लागतील.