२०२५-०५-२२

अणुचाचणीच्या स्थलनिवडीची कहाणी


पोखरण-२ करता स्थानाची निवड केली त्याचा, निवडप्रक्रियेकरता नियुक्त केलेल्या चमूतील आघाडीच्या सदस्याने लिहिलेला, प्रथम पुरुषी एकवचनी अहवाल.
भारताची प्रथम अणुचाचणी १८ मे १९७४ रोजी पोखरण येथे करण्यात आली. सरकारने तिला ’शांततापूर्ण अणुचाचणी स्फोट’ म्हटले. पुढे सामान्यतः ती पोखरण-१ अणुचाचणी म्हणूनच ओळखली जाऊ लागली. मधे ७-८ वर्षांचा काळ गेल्यावर १९८१-८२ मध्ये पोखरण-२ अणुचाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पोखरण-१ पश्चात, चाचणीकरता खड्डा खोदण्याचे काम जोधपूरच्या लष्करी शिबिरातील इंजिनिअरिंग रेजिमेंटला सुपूर्त करण्यात आले. ११३-इंजिनिअरिंग रेजिमेंट नावाची ही रेजिमेंट १९६७ साली निर्माण करण्यात आलेली होती. या रेजिमेंटचा, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि शौर्य यांचा हेवा वाटावा असा इतिहास होता. १९७९ च्या उत्तरार्धात ती जोधपुरात आलेली होती. दिवंगत लेफ्टनंट कर्नल के.सी.धिंग्रा (पुढे जाऊन हे मेजर जनरल पदापर्यंत पोहोचले होते) तिचे नेतृत्व करत होते. जानेवारी १९८१ मध्ये त्यांना निकडीच्या चर्चेसाठी दिल्लीत बोलावून घेण्यात आले. ते जोधपूरला परतल्यावर, सीमाभागातील कार्यकारी टेहळणीकरता मला त्यांच्या सोबत येण्यास सांगितले. आम्ही दोन जोंगा वाहनांतून निघालो. पहिले वाहन ते स्वतःच चालवत होते. बाजूला मी बसलेलो. सोबतचे लोक दुसऱ्या वाहनात होते. वाटेत ते म्हणाले की, रेजिमेंटला १२ फूट व्यासाची आणि ५०० फूटहून अधिक खोलीची विहीर खणायला सांगितले गेले आहे.
आम्हा दोघांनाही तिचा उद्देश चांगल्या प्रकारे कळलेला होता, मात्र आण्विक वा अणुचाचणी हे शब्द मात्र कधीही उच्चारले गेले नाहीत. वस्तुतः या संपूर्ण कामा दरम्यान तसे वर्गीकरण कुणीही केले नाही.
आम्हाला अंतरातून माहीत होते की हे काम अवघडच आहे. मात्र त्या आव्हानाचा आवाका आणि आकार आकळला नव्हता. आम्ही नागरी अभियंते होतो आणि खनिकर्म अभियांत्रिकीबाबत आम्हाला फारच थोडी कल्पना होती. वस्तुतः आम्ही कधीही खाणीस भेट दिलेली नव्हती किंवा तसली विहीर बघितलेलीही नव्हती.
इथे अशी विहीर खोदण्याबाबत काही माहिती देणे सयुक्तिक ठरेल. भूमिगत खनिजस्तरापर्यंत पोहोचण्याकरता एक उभी विहीर जमिनीच्या पृष्ठभागापासून तर खनिजक्षेत्रापावेतो खणलेली असते. तिच्यातूनच माणसांची, सामानाची आणि उपस्करांची ने-आण केली जात असते. निष्कर्षित खनिजही तिच्यावाटेच जमिनीच्या पृष्ठभागाबाहेर काढले जात असते. खनिकर्माबाबतच्या सर्व साहित्यांत अशी विहीर खोदणे सर्वाधिक धोकादायक आणि हानीकारक कर्तव्य मानले जात असते. त्यास विशेष तज्ञता आणि विशेष उपस्करांची आवश्यकता असते.
आमच्या कामाबाबत सांगायचे तर, स्थाननिवडीचे काम रेजिमेंटवर सोपवलेले होते. पोखरण भागाचे नकाशे आमच्या हातात होते. पुढील दोन दिवसांत, जागेच्या विस्ताराची कल्पना यावी म्हणून, त्या पल्ल्यांत आम्ही अनेकदा फिरलेलो होतो. आम्ही नऊ वर्ग किलोमीटर क्षेत्रफळ निश्चित केले, जे महामार्गांपासून आणि गावांपासूनही दूर होते. सुरक्षा आणि गोपनीयतेबाबतच्या आमच्या गरजा त्यामुळे भागत होत्या.
जोधपूरला परतल्यावर कर्नल धिंग्रांनी नवी दिल्लीतील अधिकाऱ्यांना आमच्या स्थाननिवडीची कल्पना दिली. तिकडून मंजुरी मिळताच, मला पोखरणला जाऊन प्रत्यक्ष जागेची निवड करण्यास सांगण्यात आले. कॅप्टन एन.पी.एस. चौहान आणि कॅप्टन डी.के.राजपूत आणि वीस जवानांची फौज माझ्यासोबत होती. सूर्यास्ताला आम्ही त्या ठिकाणी जाऊन पोहोचलो. निवडलेल्या नेमक्या ठिकाणी पोहोचू न शकल्याने आम्ही रात्री तेथेच मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. खेतोलाई-लोहार्की दरम्यानच्या बैलगाडीच्या वाटेवरील ती एक सपाट जागा होती. एक १८० पौंडाचा तंबू तीन अधिकार्यांठकरता लगेचच उभारला गेला. जवान मात्र ३-टन वाहनातच झोपले.
डोळे मिटण्यापूर्वी दुसऱ्या दिवशीच्या कृतीबाबत आम्ही मिणमिणत्या कंदिलाच्या प्रकाशात चर्चा करत होतो. तेवढ्यात कॅप्टन राजपूत ओरडले ’साप’. आम्ही खाली पाहिले. त्या जागी अनेक साप आणि विंचू सरपटतांना पाहून आमची भीतीने गाळणच उडाली. फुरसं होती ती. हे उघडच होते की आम्ही त्यांच्या घरात शिरलेलो होतो. शूरवीराच्या काळजातही धडकी भरवणारे दृश्य होते ते. रात्रभर आम्ही आपापल्या कॅम्पकॉटांवरून उतरण्याचे धाडस केले नाही. लघुशंकेचा दाब वाढला तरीही नाही.
दुसऱ्या दिवशी पहिले काम आम्ही कुठले केले असेल तर ते पर्यायी शिबीर थाटण्याचे. मात्र संपूर्ण कामादरम्यानच आम्हाला या फुरशांचाच सामना करावा लागणार आहे, याची मात्र आम्हाला तेव्हा कल्पना आलेली नव्हती.
फुरसं हा एक सर्वात धोकादायक साप असतो. अन्य सर्व सापांमुळे होणाऱ्या जीवहानीहूनही फुरशांमुळे होणारी जीवहानी जास्त असते. ते सूप्तपणे वावरत असल्याने, स्थानिक लोक त्यांना कुजबुजत्या आवाजात ’चोर’ म्हणतात. आमच्याकडेही सर्पदंशाची अनेक प्रकरणे झाली. मात्र सर्व बाधितांना आमच्या कॅप्टन व्ही.के.शुक्ला या रेजिमेंटल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वेळीच सर्पविषविरोधी इंजेक्शन देऊन वाचवलेले होते.
स्थाननिवडीकरता संपूर्ण नऊ वर्ग किलोमीटरचा भाग आम्ही अनेकदा पालथा घातला. पण उपयोग झाला नाही. आम्हाला माहीत होते की, स्थान हे वाळूच्या टेकड्यांमधील सपाट जागीच हवे आहे, फारसे वाळूचे ढिगारे नको आहेत, शिबिराकरता पुरेशी सपाटी हवी आहे. पोखरण-१ च्या वेळी भूजलस्रोतांमुळे अनेकदा आम्हाला माघार घ्यावी लागलेली होती. भूजलस्रोतांचा आढळ कमीतकमी असेल असे ठिकाण हवे होते. मात्र असे ठिकाण कसे शोधायचे याची मात्र आम्हाला काहीच कल्पना नव्हती.
आम्ही खेतोली आणि लोहार्की गावातील स्थानिकांना भेटायचे ठरवले. भूजलस्रोतांच्या आढळाबाबतचे त्यांचे ज्ञान आम्हाला हवे होते. आम्ही त्यांना सांगितले की, आम्हाला तिथे एक कायमस्वरूपी शिबीर उभारायचे आहे. भूजलस्रोतांचा आढळ असेल असे ठिकाण हवे आहे. ते मदतीस तत्पर होते. त्यांनी पाण्याकरता प्रयत्न करून सोडून दिलेल्या अनेक जागा आम्हाला दाखवल्या. आम्हाला ती ठिकाणे टाळायला सांगितली. बोराची झाडे पाहा, मुंग्यांची वारुळे पाहा, तशा ठिकाणी सामान्यतः जमिनीतील पाणी मिळू शकेल, ते म्हणाले.
दुसऱ्या दिवस अखेर, आमची काहीच प्रगती झालेली नव्हती. मात्र आज सरपटणारे सोबती नसल्याने रात्र शांततेत गेली. तिसरे दिवशी सकाळी, आम्ही सेंट्रल ग्राऊंड वॉटर बोर्ड आणि राजस्थान ग्राऊंड वॉटर खात्यातील तज्ञांचा सल्ला घेण्याकरता जैसलमेर आणि पोखरण शहरांना भेटी दिल्या. भूजलप्रवाहनकाशांचे आधारे त्यांनी पोखरण क्षेत्राचे स्पष्टीकरण दिले. पोखरण निम्न जुराझिक लाठी संरचनेचा भाग असल्याचे सांगितले. तळाशी वर येणार्याी ग्रॅनाईटच्या खडकांनी ते व्याप्त होते. त्यात मध्यम ते ठळक दाण्यांचे वालुकाश्म होते, पातळ खडक होते आणि मिश्र राशीही होत्या.
मुख्य पाणीधारक खडकसंरचना अनिर्बंधित अथवा बंदिस्त असू शकतात. हवामानाने झिजलेल्या खडकांच्या फटींत असू शकतात. अभेद्य ग्रॅनाईटच्या १२०० फूट खोलातील स्तरांतही असू शकतात. प्रादेशिक भूजलस्तराच्या वरील भागांतही असू शकतात. मात्र आम्हाला ५०० फुटांपर्यंतच जायचे असल्याने आम्हाला या माहितीचा फारसा उपयोग नव्हता.
मग आम्ही सेंट्रल ऍरीड झोन रिसर्च इन्स्टिट्यूट जोधपूर येथेही जाण्याचा निर्णय घेतला. मात्र भूजलस्तराच्या वरील भागांचे आणि भूजलप्रवाहांचे भाकीत करणे अशक्यप्राय असल्याचे त्यांनी सांगितल्याने आमची निराशाच झाली. त्यांनी भूगर्भशास्त्रीय आणि क्षेत्रीय माहिती पुरवली. आम्ही त्यांची माहिती तपशीलाने अभ्यासली पण, निर्णयकारक निष्कर्षांप्रत पोहोचता आले नाही. खननकार्य सुरु करण्यासाठी स्थलनिश्चिती करणे कठीणच भासत होते. नवी दिल्लीकडूनचा दबाव वाढतच होता. कर्नल धिंग्रांनी स्थलनिश्चिती सत्वर व्हावी म्हणून, आम्हाला पुन्हा पोखरणला भेट देण्यास सांगितले.
निरनिराळ्या मार्गांनी मिळालेल्या माहितीसहित आम्ही पुन्हा तपशीलवार शोध घेतला आणि (अ, ब, क आणि ड) अशी चार ठिकाणे निवडून काढली. त्यांचे आपापसांतील अंतर ९०० ते १४०० मीटर होते. वालुका टेकड्यांच्या मधला कडक पृष्ठभागाचा तो सपाट भाग होता. उपस्कर आणि अन्य पायाभूत सुविधा उभारण्याकरता पुरेशी जागा होती. वाळूच्या टेकड्या जवळच असणे गरजेचे होते कारण उकरलेली माती दडपायला त्या उपयोगी ठरणार होत्या. एरवी निरीक्षक उपग्रहांच्या नजरेतून आमची हालचाल सुटली नसती.
आम्ही मग गावकऱ्यांना निश्चित केलेल्या ठिकाणांवर पाणी आढळण्याबाबत पुन्हा एकदा विचारले. हितचिंतक ज्येष्ठ गावकऱ्यांनी स्थानिक पानाड्यांची मदत घेण्याचा सल्ला दिला.
भूजलाचा जमिनीवरून शोध घेणाऱ्यांचा उपयोग, सिनाईच्या वाळवंटात ख्रिस्तपूर्व १२५० वर्षे इतक्या आधी मोझेसने केलेला होता. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रातील विचलने भूजल अस्तित्व प्रदर्शित करतात या समजुतीवर हे आधारलेले होते. पानाड्याचे शरीर विद्युत वाहक ठरते. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रातून चालतांना ते छोटी विभवांतरे निर्माण करते.
काही पानाडे गुल्लेरच्या आकाराच्या काड्याच वापरत. इतर काही एल आकाराच्या लोखंडी सळया वापरत. हातातील त्यांच्या हालचालींवरून ते भाकीत करत असत. ही पद्धत पूर्णतः संवेदनावरच आधारलेली आहे. पानाडे पाण्याची खोली, साठ्याचे प्रमाण यांबाबत किंवा ते असण्याबाबत वा नसण्याबाबतही कोणतीच शाश्वती देऊ शकत नाहीत. आम्हाला ही कल्पना सुरस वाटली मात्र अवैज्ञानिक म्हणून आम्ही ती सोडून दिली.
नंतरच्या दिवशी संध्याकाळी आम्हाला न सांगताच खेतोलाई गावातील प्रमुख, पोखरण शहरातून एका पानाड्याला घेऊन आला आणि त्याला त्याने निवडलेल्या ठिकाणांवर शोध घेण्यास सांगितले. ती पौर्णिमेची रात्र होती. नुकतीच तोडून आणलेली गुल्लेराकृती बोराच्या झाडाची काडी आपल्या पिशवीतून काढून, पाण्याने धुवून मंत्र पुटपुटले. आम्हा सगळ्यांकरता तो अनुभव भारून टाकणाराच होता. तरीही ही चारही ठिकाणे पाण्याकरता उपयोगाची नाहीत असे त्याने सांगताच आम्ही सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. कोणत्याही वैज्ञानिक आधाराविना अपेक्षित उत्तर मिळाल्याने समाधान वाटून आम्ही सुखावलो. अणुचाचणीकरता पानाड्याचे प्रमाणही कामी आले हे सांगणे असंबद्ध वाटते! खरोखरीच एक अप्रशस्त प्रमाण होते ते.
पोखरण-१ च्या वेळेला खोदकाम सुरू झाल्यानंतर तीन महिन्यांतच त्यात पाणी शिरल्याने ती विहीर सोडून द्यावी लागलेली होती आणि कोरडी म्हणून सोडून दिलेली एक विहीरच चाचणीकरता तयार करावी लागलेली होती. पोखरण-२ करता प्रस्तावित विहीर किमान ५०० फूट खोल असणे अपेक्षित होते. कोणतीही सोडून दिलेली विहीर इतकी खोल असणार नव्हती कारण त्या १२० फूटांहून जास्त खोल क्वचितच असत. अनपेक्षित अडचणी गृहित धरून, अधिकाऱ्यांनी एकाच वेळी दोन ठिकाणी विहीरी खोदायचा निर्णय घेतला. त्यामुळे निवडलेल्या चार ठिकाणांपैकी दोन जागा आम्ही निवडल्या. त्याकरता खूप विचार केला तरीही शंका येतच राहिल्या.
गोपनीयता राहील का ही भीती असूनही कर्नल धिंग्रा यांनी, स्थानिक भूजलप्रवाह अडतींचा विहीरीस पाणी लागण्याबाबतच्या अनुभवाविषयी सल्ला घेण्याचे ठरवले. अडतीलाही तीच कहाणी ऐकवली गेली की, लष्कराला भूजलस्रोतासहितची जागा कायमस्वरूपी शिबिराकरता हवी आहे. नमुन्यांकरता अडतीने भुगर्भविंधन केले. १५० फुटांपर्यंतचे नमुने ते काढू शकले. त्या चारही ठिकाणी विहीर खोदणे व्यर्थ आहे असाच अहवाल त्यांनी दिला. म्हणजे वापरण्यालायक परिमाणात पाणी असणार नव्हते. आमच्या निष्कर्षांची पुष्टी करणाराच अहवाल होता. मात्र निर्णायक नव्हता. कारण संवेदित खोली केवळ १५० फूटच होती.
अखेरचा उपाय म्हणून आम्ही भूमिगत जलसाठ्यांच्या शोधाकरता सरकारी अडतींची मदत घेण्याचा निर्णय घेतला. त्यांची पद्धत भूभौतिक होती. वीजवहनाचे आधारे जमिनीची वाहकता मोजून ते निर्णय करत असत. ठिकठिकाणी विद्युताग्रे लावून थेट प्रवाह त्यात प्रवाहित करून ते मापने घेत असत. खोली, आकार आणि साठा यांवर अवलंबून निदाने करत. उपस्कराची कार्यक्षमता लक्षात घेता त्या पद्धतीने २०० फुटांहून खोल ठिकाणी अनुमान करता येणारच नव्हते. त्यामुळे हे निष्कर्षही निर्णायक ठरले नाहीत.
सर्व माहितीच्या विश्लेषणाकरता कर्नल धिंग्रांनी अनेक बैठका घेतल्या. कष्टपूर्वक स्थलतुलना केली गेली. अ आणि क ही ठिकाणे पसंतीची म्हणून निवडली गेली. हे कबूल केलेच पाहिजे की, अंतीम निवडीत म्हणतात तसा सहाव्या इंद्रियाचा उपयोगही झालाच. मग कर्नल धिंग्रा आणि मी या निवडीवर शिकामोर्तब करण्यासाठी पोखरणला निघालो. अंतीमतः निवडलेली ठिकाणे, नवी दिल्लीला, नकाशावर खूण करून पाठविली गेली.
आम्ही ’अ’ ठिकाणी पोहोचेपर्यंत सूर्य अस्ताला जात होता. प्रस्तावित विहिरीचे केंद्र स्थानावर निश्चित करायचे होते. मी कर्नल धिंग्रांना विनंती केली की, त्यांनीच त्या ठिकाणी खुंटी ठोकावी. एका शिपायाने त्या जागी खुंटी धरून उभी केली. धिंग्रांपाशी हातोडा दिला. ते पुढे झाले. आम्ही सारेच त्यांच्याभोवती वर्तुळात उभे होतो.
तो क्षणच ऐतिहासिक होता. सूर्यकिरणे वाळूच्या टेकड्यांना सोनेरी रंगाच्या निरनिराळ्या छटांत चमकवत होती. मोठा रम्य प्रसंग होता तो. एकाकी वाळवंटातील शांतता वातावरणास आणखी भारावून टाकत होती. कर्नल धिंग्रा सूर्याकडे तोंड करून उभे होते. एक मिनिटभर त्यांनी डोळे मिटले. बहुधा जगन्नियंत्याचे आशीर्वादच घेतले. प्रसंगाच्या गांभीर्याने आम्हा साऱ्यांवरच गारूड केलेले होते. आम्ही सारेच निस्तब्ध झालेलो होतो. हातोडीच्या ठोक्यानेच ती स्तब्धता लोप पावली.
अंधार पडत होता. आम्ही घाईनेच ’क’ स्थळाप्रत निघालो. ते ९०० मीटर दूर होते. तीच प्रक्रिया अवलंबिली गेली. मात्र कर्नल धिंग्रांनी खुंटी ठोकायला मला बोलावले. हा त्यांचा उदार दृष्टिकोन होता. परतीच्या लांबलचक जोधपूर रस्त्यात आम्ही क्वचितच काही बोललो असू. फासा पडलेला होता. भारताच्या आण्विक आशेचे भवितव्य आमच्या निवडीवर अवलंबून होते. या विचाराने आम्हाला भारून टाकलेले होते.
मंजुरी मिळताच काम धडाक्यात सुरू झाले. वाळूचे ढिगारे दूर सारून आम्हाला मिश्र खडक लागला. वालुकाश्म आणि गाळाचा. ६० फुटावरच पाणी झिरपू लागले. खोली गाठणे अवघड होऊ लागले. मात्र आमचे इरादे बुलंद होते. ९०-१०० फुटांवर तर पाणी एवढे झिरपू लागले की, विंधन अशक्य झाले. थांबलेच.
मात्र ११३-इंजिनिअरिंग रेजिमेंटच्या दुर्दम्य इच्छाशक्ती आणि नवोन्मेषशाली पद्धतीने साऱ्या अडचणींवर मात केली. म्हणतात ना ’इतिहास तेच रचतात जे प्रभावी ठरतात’.
आम्ही पाण्याच्या झिरप्यावर कशी मात केली, ते पुन्हा कधीतरी सांगण्याकरता राखून ठेवू.
लेखक कारगील-सियाचेन क्षेत्रात रेजिमेंटचे नेतृत्व करत असत. अणुचाचण्यांकरता विहीर खोदण्याचे काम त्यांना सुपूर्त करण्यात आलेले होते. ते विपुल लेखन करणारे लेखक आहेत. भारताच्या संरक्षण उद्योगातील ते आघाडीचे तज्ञ मानले जातात.


मूळ इंग्रजी लेखकः मेजर जनरल मृणाल सुमन ०५-०७-२०२०
प्रथम प्रसिद्धीः https://swarajyamag.com/.../a-phenomenal-pokhran-mission...
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २२-०५-२०२५
श्रेय-अव्हेरः या लेखाचे स्वामित्व संपूर्णतः लेखकांचे आहे. अनुवादकाचे श्रेय हे अनुवादापुरतेच सीमित आहे.
खालील फोटो प्रातिनिधिक आहे.

२०२५-०५-२०

डॉ. मलूर रामस्वामी श्रीनिवासन निवर्तले

डॉ. मलूर रामस्वामी श्रीनिवासन
(जन्मः ५ जानेवारी १९३०; मृत्यूः २० मे २०२५)

कळविण्यास दुःख होते की, पूर्व अध्यक्ष अणुऊर्जाआयोग आणि अणुऊर्जाविभागाचे पूर्वसचिव डॉ. मलूर रामस्वामी श्रीनिवासन यांनी, २० मे २०२५ रोजी वयाच्या ९५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

डॉ. श्रीनिवासन सप्टेंबर १९५५ मध्ये अणुऊर्जाविभात रुजू झाले होते. डॉ. होमी भाभा यांचेसोबतच त्यांनी, भारताच्या पहिल्या अणुभट्टीवरील आपल्या देदिप्यमान कारकीर्दीची सुरूवात केली होती. अप्सरा नावाची ती अणुभट्टी ऑगस्ट १९५६ मध्ये प्रथमच क्रांतिक झाली.

ऑगस्ट १९५९ मध्ये श्रीनिवासन, भारतातील पहिल्या अणुऊर्जासंयंत्राच्या उभारणीकरताच्या प्रकल्पाचे प्रमुख प्रकल्प व्यवस्थापक म्हणून नियुक्त केले गेले. त्यांच्या नेतृत्वात भारताचा अणुकार्यक्रम साकारला गेला. १९६७ साली त्यांनी मद्रास अणुसंयंत्राचे प्रमुख प्रकल्प अभियंता म्हणून कार्यभार स्वीकारला.

डॉ. श्रीनिवासन यांनी राष्ट्रीय महत्त्वाच्या अनेक कळीच्या पदांवर कार्य केले. १९७४ मध्ये ते ऊर्जाप्रकल्प अभियांत्रिकी विभागाचे संचालक झाले. तसेच अणुऊर्जामंडळाचे अध्यक्षही झाले. या भूमिकेतून त्यांनी देशभरातील सर्व अणुऊर्जाप्रकल्पांचे नियोजन, उभारणी आणि संचालनही केले.

१९८७ साली त्यांची नियुक्ती अध्यक्ष अणुऊर्जाआयोग आणि अणुऊर्जाविभागाचे सचिव म्हणून केली गेली. त्याच साली ते भारतीय अणुऊर्जा महामंडळाचे संस्थापक संचालकही झाले. त्यांच्या नेतृत्वात देशात १८ अणुऊर्जा संयंत्रे विकसित केली गेली. त्यांपैकी सात कार्यान्वितही झाली होती.

भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमातील त्यांच्या सहभागाखातर त्यांना पद्मविभूषण सन्मान प्रदान करण्यात आला.

भारताच्या अणुऊर्जाक्षेत्रात, द्रष्टे नेतृत्व, तांत्रिक सर्वोत्कृष्टता आणि देशाप्रतीची अविचल सेवावृत्ती यांखातर डॉ. श्रीनिवासन यांचे स्मरण केले जाईल.

२०२५-०४-१२

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

उणापुरा वीस वर्षाचा तरूण, १९८० च्या आसपास, नागपूरहून चंद्रपूरला आणि मग आलापल्लीला रवाना झाला. वनखात्याचा अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यामुळे, रुजू होण्यासाठी. आलापल्ली नक्षलग्रस्त होती, ती त्याही पूर्वीपासून. पण आम्हाला मात्र ते माहितच नव्हतं. त्याला आलापल्ली फाट्यावर उतरवून एस.टी. पुढे निघून गेली. वेळ संध्याकाळी सातची असावी. सोबत जुन्या काळात असायची तशी पत्र्याची एक ट्रंक, एक होल्डाल (ह्या वस्तुला आता केवळ ऐतिहासिक अर्थच काय तो उरला आहे!), हँडबॅग वगैरे सामान होते. रस्त्यावर इतर कुणी चिटपाखरूही नाही. अंधार गुडूप झालेले. गाव तर दिसू शकेल अशा अंतरावरही नव्हते. मग त्याने काय करावे? सामान घेऊन जाणे एकट्याने शक्यच नव्हते. हातात नेता येईल ते सामान घेऊन तो गावात गेला. उरलेले सामान तिथेच रस्त्यावर. अर्थात नेणार तरी कोण म्हणा उचलून! मग क्वार्टर म्हणून मिळालेले घर रिकामे नसल्याने, तात्पुरत्या मिळालेल्या निवार्यात दिवाबत्तीची सोय करून उरलेले सामान आणले. दूर, दाट निबिडात, एकट्याने, रात्रीचा पोहोचून, निर्भीडपणे आपले बस्तान बसवणारा आमचा भाऊच होता. ह्याचा मला अभिमान आहे.

सालोसाल वनखात्याच्या वार्षिक खेळस्पर्धा होत असतात. त्यांतून सातत्याने खेळून तो बक्षिसे मिळवत असे. पिलोफाईट पासून तर बॅटमिंटन, क्रिकेट सारखे; वैयक्तिक आणि सांघिक खेळ खेळून त्यात पारितोषिकेही नेहमीच जिंकत असे. अशा पदकांनी त्याच्या घराच्या भिंती सुशोभित आहेत. ह्याचा मला अभिमान आहे.
पुढे त्याचे हाताखाली सुमारे तीस-चाळीस लोक काम करत असत. त्यात दोन हत्तीही होते. त्या सगळ्यांचा पगार महिन्याच्या पहिल्या तारखेस करावा लागे. त्याकरताचे पैसे चंद्रपूरच्या अधिकोषातून काढून आणावे लागत. एकट्याने घेऊन येणे कमी धोक्याचे नव्हते. वनखात्याची जीप होती. मागितल्यास पोलीसही दिमतीला मिळत असत. पण मग पोलीस मागवल्यास ते लक्षवेधी ठरून, अधिकच असुरक्षित होत असे. मग काय करायचे? तर पैसे काढून घेऊन, स्वतःच्या हिंमतीवर, कुणाच्या लक्षात येणार नाही अशा प्रकारे, कापडी पिशवीत ठेवून, चंद्रपूर आलापल्ली प्रवास, दर महिना अखेरीस, एस.टी.च्या बसमधून यशस्वीरीत्या पार पाडणारा साहसी तरूण, आमचा भाऊच होता. ह्याचा मला अभिमान आहे.
मग रामदेवबाबा उदयास आले. आस्था वाहिनीचा उगम झाला. तो योगाबद्दलच्या; प्रथम आत्मियतेने, मग प्रेमाने आणि नंतर निदिध्यासाने; अक्षरशः वेडाच झाला. कुठल्याही परिस्थितीत सकाळी सहा ते सात योगासने करायची, लोकांना शिकवायची, एकटाच असला तरी संपूर्ण इतमामाने सगळे करायचे. परम पूजनीय जनार्दन स्वामींच्या योगप्रसाराच्या कामात मग त्याने सक्रिय सहभाग सुरू केला. आज तो गोपालनगरच्या योगकेंद्राचा संचालक आहे. असंख्य लोक त्याला उत्तम योगशिक्षक मानतात. तो आमचा भाऊ आहे ह्याचा मला अभिमान आहे.
सावित्रीने सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत मिळवले. ती कहाणी सर्वश्रुतच आहे. पण पत्नीचे प्राण मृत्यूच्या जबड्यातून सहिसलामत परत आणणारा आमचा भाऊच आहे, ह्याचा मला अभिमान आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, तेव्हा नुसते आमदारच होते. पण त्यांनी नागपूर सुधार प्रन्यासने लावलेल्या वाढीव विकासदरास घटवावे ह्याकरता, सी.एम. फार्म्युला वापरावा, म्हणून त्यांनी केलेले प्रयत्न यशस्वी झाले होते. त्याकरता त्यांचा गोपालनगरवासियांतर्फे सत्कार करण्यात आला. सत्कार करणारे होते आमचे बंधुराज! ह्याचा मला अभिमान आहे.

असे आहेत आमचे राजाभाऊ!

असे म्हणतात की उमेदीच्या वयात अपार कष्ट करावेत. म्हणजे आयुष्याला आकार मिळतो. हे ज्याने प्रत्यक्षात आणले तोही आमचा भाऊच आहे. त्या काळात त्याचा दिवस सकाळी सहालाच सुरू होई, आणि रात्री उशीरापर्यंत शिकवण्या करत संपत असे. जाणीवपूर्वक, अपार कष्ट करून, एक उत्तम शिक्षक म्हणून त्याने नागपुरात नावलौकिक मिळवला. ह्याचा मला अभिमान आहे.
महाराष्ट्राचे एक मंत्री अतिशय विद्याविभूषित होते. ते वैद्यकीय डॉक्टर होते. प्रशासकीय पदव्यांनी अलंकृत होते. व्यवस्थापकीय पदव्यांचे शिरपेचही त्यांच्या मुकुटात शोभत असत. त्यांच्या पदव्यांची यादी संपता संपत नसे. त्यांचे नाव डॉ. श्रीकांत जिचकार. त्यांच्या उमेदीच्या काळात, आम्हा सगळ्यांनाच त्यांचे खूप कौतूक वाटे. त्यांच्यासारख्या ढीगभर पदव्या कुणी कधी मिळवू शकेल असे आम्हाला कधीही वाटले नाही. पुढे तशाच अनेक पदव्या, आमच्या भावानेही संपादन केल्या. त्याच्या पदव्यांचे शेपूटही हनुमंताच्या शेपटीसारखे वाढतच आहे. त्यात अभियांत्रिकीची पदवी आहे. पदव्यूत्तर पदवी आहे. ऑपरेशन्स रिसर्चमधील पी.एच.डी. आहे. प्रशासकीय पदव्या आहेत. व्यवस्थापकीय पदव्या आहेत. ह्या सगळ्या पदव्यांत प्राप्त केलेल्या ज्ञानाचे वितरण करण्याचाच तर त्याचा व्यवसाय आहे. असाही आमचा एक भाऊ आहे. ह्याचा मला अभिमान आहे.
वर्कशॉप ऑन ऍप्टिट्यूड डेव्हलपमेंट म्हणजे ’वॅड’चे फॅड नागपूरकरांना नवे नाही. विशेषतः अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना. त्या फॅडाचा जनक आमचा भाऊ आहे. ह्याचाही मला अभिमान आहे.
कारकीर्द समुपदेशक, व्यवस्थापकीय सेवांकरताचा मार्गदर्शक, जीवनातील अवघड प्रश्नांकरताचा मार्गदर्शक अशा भूमिका तो नेहमीच बजावत असतो. असंख्य विद्यार्थी आणि त्यांचे पालकही त्याच्या सल्ल्यानेच अनेक निर्णय घेत असतात. नागपुरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयाचा तो आज प्राचार्य आहे. ह्याचाही मला अभिमान आहे.
आपल्या महाविद्यालयीन जीवनात, विद्यापीठातील नामांकित जलतरणपटू, बुद्धिबळपटू, व्हॉलीबॉलपटू असलेला आमचा भाऊ, आजही मित्रांच्या मोठ्या कोंडाळ्यातच वावरत असतो. ह्याचा मला अभिमान आहे.

असा आहे सुरेंद्रा!

आज ह्या दोघांचाही जन्मदिवस आहे. त्यांचे आयुष्य उत्तरोत्तर अधिक आरोग्यसंपन्न आणि समृद्ध होत जावे, लोकाभिमुख व्हावे, लोकहितकर व्हावे ह्याकरता उभयतांस हार्दिक शुभेच्छा आणि अनेकानेक आशीर्वादही!
अशा गुणवान, कर्तृत्ववान मुलांची आई म्हणजेच माझी आई. आमची आई अतिशय सहनशील. सोशिक. तिचा स्वभाव जणू काय हिंदूत्वाचे मर्मच आहे. हिंदू धर्माची मुख्य शिकवण काय असे मला कुणी विचारले तर मी बिनदिक्कतपणे सांगेन की; परधर्म सहिष्णुता, परकर्म सहिष्णुता आणि परवर्म सहिष्णुता! आईचे आचरण, शिकवण आणि स्वभावही सहिष्णुतेचा कणा असणारा. तिचे हस्ताक्षर सुवाच्य, सुघटित आणि सुंदर! असे म्हणतात की, ’न संतोषात परं सुखम्‌’. संतोष हा तिच्या जीवनाचा आधार आहे. असेल त्या परिस्थितीत संतोषाने, सहजपणे मार्ग शोधण्याचा तिच्या वर्तनातूनच; आम्हीही ते शिकलो तर बरे असे वाटत राहते. ह्याचाही मला खूप अभिमान आहे. ह्या निमित्ताने तिचेही हार्दिक अभिनंदन आणि तिला सादर प्रणाम!

२०२५-०४-०६

पुस्तक परिचय: अपराजिता

संदर्भः राणी नाइकीदेवी, अपराजिता, मेजर मोहिनी गर्गे-कुलकर्णी, मिहाना पब्लिकेशन्स, प्रथमावृत्ती १५ सप्टेंबर २०२४, किंमत रु.७५०/-, पृष्ठे ८३६, पृष्ठ-१४७

गोव्याचे कदंबराजे महामंडलेश्वर परमर्दीदेव (इसवीसन ११४७-४८) यांची मुलगी नाइकीदेवी हिचा विवाह, आन्हिलगडचे राजे, चालुक्य वंशातील अजयपाल यांचेसोबत झाला. इसवीसन ११७२ साली अजयपाल सिंहासनारूढ झाले. इसवीसन ११७५ साली घातपाताने त्यांचा मृत्यू ओढवला. त्यांना मूलराज नावाचा लहान मुलगा होता. त्यास गादीवर बसवून नाइकीदेवीने कारभार हाती घेतला. ११७८ साली ही परिस्थिती लक्षात घेऊन विजय मिळवण्यास सोपा देश पाहून महम्मद घोरीने मुलतानहून आन्हिलवाडा या चालुक्यांच्या श्रीमंत राजधानीकडे कूच केले. ऊंच नावाच्या गावी तो येऊन पोहोचला. माऊंट अबूजवळील सिरोही जिल्ह्यातील कायदरा येथून त्याने राणी नाइकीला निरोप पाठवला की, “तू तुझ्या राज्याची संपत्ती, स्त्रिया आणि तुझ्या मुलांसह स्वतःला माझ्या स्वाधीन कर, म्हणजे मी तुझ्या राज्यावर हल्ला करणार नाही. मोठा रक्तपात टळेल. स्त्रियांच्या हातात तलवार शोभत नाही. स्त्रिया तर जनानखान्याची शोभा असतात.”

इथे राणीने मोठा पवित्रा घेतला. घोरीला पुढे सरकू न देता माऊंट अबूच्या पहाडातच थोपवण्याकरता राणीने त्याचा प्रस्ताव बिनशर्त मान्य असल्याचे त्यास कळवले. घोरीला आनंद झाला. त्याला अशीच हुलकावणी देणे गरजेचे होते.

गुजरातचे हिंदू सैन्य आपणहून पुढे सरकत, सहानुभूतीदार अन्य हिंदू राजांची मदत घेत, अबू पहाडाच्या आजूबाजूने पुढेपर्यंत चालून गेले. तेथे राणीने त्या प्रसंगास अत्यंत धैर्याने तोंड दिले. छोट्या राजपुत्रास हिंदू सैन्यासमोर आणून सांगितले की, मी हा बालराजा तुमच्या ओटीत घालत आहे. तुम्ही याचे प्राणपणाने रक्षण करा. मग छोट्या मूलराजाला पाठीशी बांधून राणी सैन्यासह घोरीकडे जाण्याकरता झंझावातासारखी पुढे निघाली. अनेक मांडलिक राजांना तिने सोबत घेतले. घोरीच्या सैन्यास घेरले. पडलेल्या मुसळधार पावसाची मदत घेतली. गनिमी काव्याने शत्रूस त्रस्त केले. अंतिमतः घोरीचे सैन्य अक्षरशः कापून काढत राणीने रणसंग्राम जिंकला. घोरीच्या सैन्याची पार धूळधाण उडाली. पळता भुई थोडी झाली. घोरी ससैन्य माघारी फिरला. राणीच्या सैन्याने त्याचा पाठलाग करून त्यास राज्याच्या सीमेच्या पार पलीकडे हाकलून दिले. त्यानंतर मग घोरीने पुन्हा कधीही गुजरातवर हल्ला केला नाही.

ही आणि यांसारख्या चिरप्रेरणादायी कहाण्यांनी भरपूर असलेले ’अपराजिता’ हे पुस्तक सगळ्या देशाभिमानी लोकांनी अवश्य वाचावे आणि ’जया’चा खरा इतिहास जाणून घ्यावा!


महम्मद घोरीचा सपशेल पराभव

हिंदू सैन्या जयाचा, मुकुट गवसला, नाइकी जिंकली ती।
बोला होवो तियेचा, विजय, उजळु दे, हिंदू ऐक्याची नांदी॥धृ॥ 

गोव्याची राजकन्या, परिणत वधु ती, झालि चालुक्यराणी
दुर्दैवाने तियेच्या, अजय पति तिचा, घातपाती निमाला।
छोट्याशा मूलराजा, तखति बसवुनी, नाइकी राज्य हाके
जोखूनी या स्थितीला, सहज विजय तो, चिंतुनी घोरि आला॥१॥ 

पोहोचूनी ऊंच गावी, लिहत तिजसि तो, ’राणि ये तू म्हणाला
शोभे स्त्री ती जनानी, तुज न खडग ते, शोभते, टाळ हिंसा’।
राणी ती स्वाभिमानी, हलकट रिपुला, ’थांब येते म्हणाली’
घोरी आनंदि झाला, नकळत थबके, वाट पाहे तियेची॥२॥ 

हिंदूंचे सैन्य सारे, जमवुन पुढती, ठेवि त्यांचे समोरी
छोट्या राजास राणी, विनवत सकला, याचि रक्षा करा रे।
राजे मैत्रीतलेही, जुळवत पुढती, वाट चाले अबूची
कावा मोठा गनीमी, करत करकचे, पाश चोहीकडूनी॥३॥ 

आबूच्या त्या पहाडी, उमजत सगळे, मार्ग राणीस होते
घोरीचे सैन्य मोठे, अलगद अडके, सापळा होत भूमी।
उंदीरा मांजरीशी, चिवडत दमवी, शत्रुसैन्यास राणी
केले ते ध्वस्त हेतू, रसद अडवली, केलि भू त्यास थोडी॥४॥ 

पाठीशी मूलराजा, अवचित पडत्या, पावसाच्या कृपेने
टाके छापे रिपूला, छळत छळत ती, नेई लोटीत पाठी।
हानी सोसे अती तो, कळत न तया, शत्रु येई कुठूनी
सोडूनी जिंकणे हे, अवजड सगळे, सैन्य पाठीच धावे॥५॥ 

राणीची झेप भारी, तळपत समरी, शत्रुला हाकले ती
हिंदू सैन्यास येई, नकळत विजयी, चेव देशाभिमानी।
घोरीला पाठि जाता, पुरत न भुमिही, प्राण कंठास येई
धक्का तो जीविताचा, धरत मग पुन्हा, घोरी आलाच नाही॥६॥ 

नरेंद्र गोळे २०२५०४०६

२०२५-०३-०१

प्रिय मित्र सुरेश यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

मध्यमवर्गीय, पापभिरू, शाकाहारी, सख्खा मित्र;
हजारो कोटी रुपये मूल्याच्या आस्थापनेचा संचालक होतो,
ही घटनाच असाधारण आहे. मात्र तसा तो झाला. 

माझा सख्खा मित्र सुरेश हावरे, ’हावरे बिल्डर्सचा संचालक झाला.
जगभरातील सुमारे दहा कोटी बेघरांना घर कसे मिळेल?
या विवंचनेत हल्ली तो स्वतःला गुंतवून घेत असतो. 

आज त्याचा वाढदिवस.
त्यानिमित्ताने केलेले हे त्याचे गुणगान आणि अभिष्टचिंतन.    

रुजवत महतीही चांगल्या वर्तनाची
मिळवत सकलांचे स्नेह राहे सदाची ।
फिरत फिरत पाहे देश तो कौतुकाने
सतत हृदयि राहे आपल्या कर्तबाने ॥१॥ 

नकळत शिरलेले दोष संस्थादिकांत
करत बदल साधे नेमके योग्य तेच ।
जनहित मनि राहे कार्य ते कोणतेही
कुणि न कधि दुखावा वागणे हो असेची ॥२॥ 

सुखवत स्वजनांना वैभवी ने सदाची
थकत न श्रम होता हातिच्या नेक कर्मी ।
कर्मठ दिनचर्या वाट चाले सुरेश
अनुसरत पतीला पाठ राखे कलत्र ॥३॥ 

सुख बरसत राहो राहु दे पूर्ण स्वास्थ्य
गुण मिरवत राहो पुत्रपौत्रादि सर्व ।
अनुसरु मग आम्ही मार्ग तोची सुखाचा
अवसर बघता हा आज आनंदण्याचा ॥४॥ 

नरेंद्र गोळे
२०२५०३०१

२०२५-०२-२५

शतायु संघ संस्कार

रविवार दिनांक २७ सप्टेंबर १९२५, विजयादशमी, या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विधिवत स्थापना झाली. १९२५ च्या विजयादशमीस त्याला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त माझ्या पाहण्यातील संघाची श्रेयसंचिते आणि ’शतायु संघ संस्कारां’चे भविष्यातील स्वरूप यावरचे माझे विचार इथे मांडत आहे. माझ्या अपेक्षाही इथे नमूद करत आहे.

माझे बालपण नागपुरातच गेलेले असल्याने, संघाशी माझा लहानपणापासूनच संबंध आला. माझ्या घरासमोरच संघाची शाखा भरत असे आणि ध्वजही माझ्या घरीच ठेवलेला असे. शिशू, बाल, तरूण म्हणून मी त्याच शाखेचा स्वयंसेवक होतो. खापरीला होणारी संघाची अनेक शिबिरे मला आठवतात. २५ जून १९७५ रोजी आणीबाणी लागल्यावर, संघावर बंदी घातली गेली. ती उठवावी म्हणून सत्याग्रह करायचा निश्चित झाले. त्याकरता कोण कोण सत्याग्रह करणार ते ठरवायला माझ्या घरीही सभा झाल्याचे मला स्पष्ट आठवते. संघाचे ’ऑफिसर्स ट्रेनिंग कँप - ओ.टी.सी.’ रेशीमबागेत भरत असत. कुतुहलाने आम्हीही ते बघायला नेहमीच जात असू. प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष, तृतीय वर्ष शिक्षित स्वयंसेवकच आमच्या शाखेत मुख्यशिक्षक होत असत. मी इंजिनिअरिंग कॉलेजात जाऊ लागलो. तेथीलही दोन प्राध्यापक संघाचे अधिकारी होते. आमच्या शाखेतही ते अनेकदा येत असत.

मनुष्यापाशी सात प्रकारच्या जन्मजात प्रज्ञा असतात. त्यांचा वापर करून निरनिराळ्या सात प्रकारची कौशल्ये विकसित करणे शक्य असते.

भाषा कौशल्य: आपल्या भाव-भावना, संवेदना, विचार, संकल्पना, आशा-आकांक्षा, अपेक्षा, संदेश, संकेत; इतर मनुष्यप्राण्यांस समजावून देण्याचे म्हणजेच बोलून संवाद साधता येण्याचे कौशल्य.

गणितीय कौशल्य: आसपासच्या वस्तू, त्यांचे परिमाण, आकार-प्रकार, संगती-विसंगती, तुलनात्मक निदान, तुलनात्मक प्रमाण; या सार्‍यांचे सापेक्ष गणन व मापन करता येण्याचे कौशल्य. तर्ककौशल्य.

शारीरिक कौशल्य: शारीरिक हालचाली करण्याचे कौशल्य. यात आसन, प्राणायाम, व्यायाम, खेळ, वाद्यवादन, नृत्य, निरनिराळ्या कसरती करण्याचे कौशल्य यांचा समावेश होतो.

सांगितीक कौशल्य: शब्द, स्वर, नाद, ताल, ठेका, गत, लय, गीत, संगीत यांचे ज्ञान, त्यांची निर्मिती, आस्वाद, वर्णन, विश्लेषण, चिकित्सा, अभ्यास, आराधना आणि परस्परांत विनिमय करण्याचे कौशल्य.

कला कौशल्य: चित्रकला, हस्तकला, शिल्पकला, कुंभारकला, चांभारकला, कासारकला, विणकाम, शिवणकला, पणन-विपणन कला, इत्यादी अनेकानेक कौशल्यांचा समावेश होत असतो.

व्यक्ती विषयक कौशल्य: इतर व्यक्तींशी सुसंवाद साधण्याचे कौशल्य. यात प्रेम, मैत्री, नातेसंबंध, कौटुंबिक संबंध तसेच परस्परपूरक संबंध यांचा समावेश होतो.

समष्टी विषयक कौशल्य: व्यक्तीव्यक्तींत संघटन घडवून आणण्याचे कौशल्य. यात व्यवस्थापन, प्रशासन, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, लोककारण, देशकारण, विश्वकारण इत्यादींचा समावेश होतो.

यांपैकी अखेरची दोन कौशल्ये विकसित करण्याचे अत्यंत नेमके प्रयत्न संघशाखांत करण्यात येतात. ’ओ.टी.सी. म्हणजे खरे तर, ऑर्गनायझेशनल ट्रेनिंग कँप’. ’संघटनकौशल्य प्रशिक्षण शिबिर’. याहून समष्टीविषयक कौशल्याचे वर्ग निराळे काही असूच शकत नाहीत. असा माझा समज आहे. गेल्या शंभर वर्षांत व्यक्ती आणि समष्टी विषयक कौशल्यांच्या विकासाचे जे मार्ग संघाने शोधून काढलेले आहेत, ते अपूर्वच नव्हेत तर जगात इतरत्र कुठेही आढळून येत नाहीत असे आहेत. त्यामुळेच तर देशास सशक्त, समर्थ नेतृत्व देण्यात संघ यशस्वी झाला आहे. मात्र भाषा, गणित, शारीर, सांगितीक आणि कला कौशल्यांबाबत असे म्हणता येत नाही. हीही कौशल्ये उपजत बाळगणारे लोक बालवयातच हेरून त्यांचा बहुविध विकास घडवण्याचे कामही संघाला सहजच साधता येईल असे आहे. ’शतायु’ झालेले संघसंस्कार आता ते कामही हाती घेवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भविष्यात संघातून जसे प्रचारक घडतात तसे भाषाभ्यासी, गणिती, शारीरकर्तबकुशल, संगीतज्ञ आणि कलाकुशल लोक निर्माण होऊ लागतील.