२०२६-०७-३०

भारतीय विज्ञानवर्धिनी संस्था-१५०

भारतीय विज्ञानवर्धिनी संस्था-१५० (इंडियन असोसिएशन फॉर कल्टीव्हेशन ऑफ सायन्स-१५०)

आधुनिक भारतीय विज्ञानाचे अवतरण

सुहास नाईक साटम

२०२६ साल हे कोलकाता येथील “भारतीय विज्ञानवर्धिनी संस्थे”चे शतकोत्तर सुवर्णजयंतीवर्ष आहे. संपूर्णतः मूलभूत विज्ञान संशोधनास वाहिलेली भारतातील ही सर्वात जुनी संस्था आहे. २९ जुलै १८७६ रोजी द्रष्टे भौतिकशास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ञ डॉ. महेंद्रलाल सरकार यांनी तिची स्थापना केली होती. भारतास जेव्हा प्रायोगिक संशोधनास वाहिलेल्या संस्थांची आवश्यकता होती तेव्हाच विद्यावर्धिनीचा जन्म झाला होता. राष्ट्रीय प्रगतीकरता शास्त्रीय संशोधन करणे अनिवार्य आहे अशी त्यांची दृढ धारणा होती. भारतीयांनी केलेले संशोधन पुष्ट व्हावे म्हणून, तसेच जनमानसात विज्ञान रुजावे म्हणून त्यांनी ही संस्था स्थापन केली होती. आज दीडशे वर्षांनंतरही ती भारतातील आघाडीची संशोधन संस्था आहे. देशातील आधुनिक विज्ञानाच्या इतिहासासोबतच तिची वाढ झालेली आहे.

डॉ. महेंद्रलाल सरकार

बंगालातील पुनरुत्थानाच्या काळातील बौद्धिक उलथापालथींतच संस्थेच्या निर्मितीची बिजे दडलेली आहेत. पाश्चात्य विज्ञानात प्रशिक्षित असूनही भारतीय बौद्धिक उत्थानाकरता कटिबद्ध असलेले महेंद्रलाल असे म्हणत असत की, विज्ञानवर्धन पाठ्यपुस्तकांतून आयात होण्याऐवजी प्रयोगातून झाले पाहिजे. संशोधनातून झाले पाहिजे. ब्रिटनमधील रॉयल इन्स्टिट्यूटपासून प्रेरणा घेऊन, त्यांनी एक सामुदायिक समर्थनातून उभी होणारी राष्ट्रीय प्रयोगशाळा कल्पिली, जिथे भारतीय लोक स्वतंत्र विज्ञानसाधना करू शकतील. वसाहती राज्यात जेव्हा अशा सुविधा दुर्मीळ होत्या तेव्हा, विज्ञानवर्धिनी देशातील मूलभूत विज्ञानसंशोधनास वाहिलेली पहिली संस्था झाली.

सुरुवातीच्या दशकांत, प्रयोगशालेय संशोधनासोबतच, विज्ञानवर्धिनी सार्वजनिक व्याख्याने आणि शास्त्रीय प्रात्यक्षिकेही आयोजित करत असे. त्यामुळे आंतरशाखीय संस्कृती निर्माण झाली. भौतिकी, रसायनशास्त्र आणि नैसर्गिक विज्ञाने परस्परांशी जोडली गेली. संसाधने कमीच होती. तरीही विज्ञानवर्धिनीने कुतुहलचालित चिरजीवी परंपरा रुजवली.

१९०७ साली चंद्रशेखर व्यंकट रमण यांच्या आगमनाने विज्ञानवर्धिनीच्या इतिहासात एका निर्णायक प्रकरणाची सुरूवात झाली. भारतीय वित्तखात्यात सेवा करत असतांना रमण संध्याकाळी आणि सुटीच्या दिवशी विज्ञानवर्धिनीत प्रयोग करत असत. ध्वनी आणि प्रकाश शास्त्रांतील ते प्रयोग असत. प्रकाशाच्या विखुरण्यावरील ते प्रयोग असत. २८ फेब्रुवारी १९२८ रोजी, ते आणि त्यांच्या प्रयोगशालेय सहकाऱ्यांनी एका शोधाची घोषणा केली. रेणूंकडून होणाऱ्या प्रकाशाच्या अप्रत्यास्थ विखुरणाची –रमण प्रभावाची- ती घोषणा होती. त्यामुळे एक शक्तीशाली वर्णपटदर्शनतंत्र निर्माण झाले होते, ज्यामुळे रेण्वीय संरचनेचा अभ्यासच बदलवून टाकला होता.

आज रसायनशास्त्र, पदार्थविज्ञान, जीवशास्त्र, वैद्यक, औषधनिर्मिती, पर्यावरणीय देखरेख आणि ग्रहीय गवेषणार्थ रमण वर्णपटदर्शनतंत्र अपरिहार्य झालेले आहे. याकरता रमण यांना १९३० सालचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कारही देण्यात आला. असा पुरस्कार मिळणारे ते पहिले आशियाई व्यक्ती ठरले. त्यांचे हे संपूर्ण कार्य भारतातच केलेले होते. त्यांच्या यशाने हे दाखवून दिले की, जागतिक स्तरीय वैज्ञानिक संशोधन भारतीय प्रयोगशाळांतूनही केले जाऊ शकते.

तरीही विज्ञानवर्धिनीचा वारसा रमण यांच्या पलीकडेही आहेच आहे. केदारेश्वर बॅनर्जींनी पथदर्शी क्ष-किरण स्फटिकालेखनाद्वारे प्रगत स्फटिकालेखन संशोधन केले. तर सत्येंद्रनाथ बसूंनी बौद्धिक समृद्धीत भर घालून विज्ञानवर्धिनीचे नाव पुंजभौतिकीतील प्रगतीस पोषक केले. मेघनाद साहा यांच्या औष्णिक मूलकीकरण सिद्धांताने खगोलविज्ञानात भर घातली आणि यासोबतच रमण, बसू व साहा यांनी कोलकाता येथे आशियातील आघाडीचे वैज्ञानिक केंद्र प्रस्थापित केले.

ज्ञानचंद्र घोष यांच्याकरवी संस्थेने रसायनशास्त्रात मोठीच भर घातली. भौतिकी रसायनशास्त्रातल्या त्यांच्या कार्याने भारतातील आधुनिक रसायनशास्त्र संशोधनाचा पाया रचला. स्वातंत्र्योत्तर काळात विज्ञानवर्धिनीचा विस्तार झाला. रासायनिक, पदार्थ, जैव विज्ञाने आणि सैद्धांतिक भौतिकशास्त्र यांत तो विस्तार झाला. यातून विज्ञान तपासाच्या वाढत्या परिमाणातील आंतरशाखीयतेचेच दर्शन होते.

विज्ञानवर्धिनीच्या उत्कृष्ट वैज्ञानिकांत असीमा चटर्जीही होत्या. त्यांच्या पथदर्शी कार्याने, नैसर्गिक उत्पादन रसायनशास्त्र आणि औषधी वनस्पतीज अल्कलाईडांच्या शास्त्राचे रूपांतरण, वनस्पतीरसायनशास्त्रात केले. तसेच औषधनिर्मितीशास्त्रातही त्यांनी लक्षणीय भर घातली. अजय घटक यांनी प्रकाशतंतू, लहरवाहिनी आणि लेझर भौतिकीतील आपल्या कार्याने विज्ञानवर्धिनीची कीर्ती वाढवली. त्यांच्या पुस्तकांनी भौतिकशास्त्रज्ञ आणि अभियंत्यांच्या अनेक पिढ्या घडवल्या. अगदी अलीकडे विज्ञानवर्धिनीच्या संशोधकांनी अतिजलद वर्णपटदर्शन, अब्जांश पदार्थ, पुनर्नविनीक्षम ऊर्जा, पुंज पदार्थ आणि संगणकीय जीवशास्त्रांसही प्रगतीपथावर नेले आहे.

आज विज्ञानवर्धिनी अभिमत विद्यापीठ म्हणून, भारत सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान खात्यांर्गत कार्य करत आहे. तिच्या आंतरशाखीय संशोधनाचा विस्तार, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि जैवविज्ञानांत झालेला आहे. वर्णपटदर्शन, सूक्ष्मदर्शन, क्ष-किरण विवर्तन, विजकीय सूक्ष्मदर्शन, संगणकीय प्रारूपण आणि पदार्थ स्वभावांकन सुविधांनी ती समर्थित आहे. तिचे डॉक्टरल आणि पोस्ट डॉक्टरल कार्यक्रम, असे वैज्ञानिक निर्माण करत आहे जे जगभरातील विद्यापीठे, संशोधन प्रयोगशाळा आणि उद्योगांना योगदान देत आहेत.

संस्थेची चिरजीवी सामर्थ्ये तिच्या कुतुहलचालित संशोधनाप्रतीच्या कटिबद्धतेत दडलेली आहेत. प्राथमिकतः तंत्रविकासाकरता वा औद्योगिक उपायोजनांकरता स्थापित संस्थांहून हे निराळे आहे. विज्ञानवर्धिनीने हे सातत्याने मान्य केलेले आहे की, परिवर्तनशील नव-आविष्करण मूलभूत विज्ञानाच्या आकलनापासूनच सुरू होत असते.

विज्ञानवर्धिनी शतकोत्तर सुवर्णजयंती पार करत असतांना महेंद्रलाल सरकार यांच्या दृष्टीचाच वारसा ती पुढे नेत आहे. त्यानुसार, विज्ञानाची आराधना बौद्धिक स्वातंत्र्यासह केली जावी. प्रायोगिक उत्साहाने केली जावी. तसेच मानवी प्रगतीप्रतीच्या अविचल कटिबद्धतेसह केली जावी.

(लेखक, राष्ट्रीय विज्ञान संवादक केंद्र, मुंबई, येथील मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. लेखात व्यक्त केलेली मते लेखकाची स्वतःची मते आहेत.)

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: