२०२०-०७-२१

वातावरणीय दाब

वातावरणीय दाब

लेखकः नरेंद्र गोळे २०२००७२१

वातावरण आपल्याला वेढून असते. पृथ्वी ही गोल आहे. मोठ्या चेंडूत लहान चेंडू अंतर्भूत असावा तशी वातावरणाच्या मोठ्या चेंडूत पृथ्वी कायमच राहत असते. पृथ्वीच्या पाठीवर कुठेही जमिनीपासून सुमारे १० किलोमीटर उंचीपर्यंत हे वातावरण म्हणजे वायूचे आवरण पसरलेले असते. सामान्यतः आपण ज्याला हवा म्हणतो ती हवा नत्रवायू (७९%) आणि प्राणवायू (२१%) ह्यांचे मिश्रण असते. आपल्या डोक्यावर सुमारे १० किलोमीटर उंचीपर्यंत जी हवा पसरलेली असते तिचे वजन आपल्या वजनाच्या सुमारे १५ पट असते. तरीही आपल्याला ते जाणवतही नाही कारण आपल्या शरीरातही त्याच दाबाने, तीच हवा आपण सतत श्वासोश्वासाद्वारे आतबाहेर करतच असतो.

हवेला वजन असते का? तर, हो. असते. पाण्याच्या एक हजारांश इतके कमी असते. पण असते जरूर. त्यामुळे एक एकक क्षेत्रावरील सुमारे १० किलोमीटर उंचीचा हवेचा स्तंभ तेवढ्याच क्षेत्रावरील जवळपास १० मीटर पाण्याच्या वजनाइतका भरेल. मग हे वजन एवढे आहे ह्याची प्रचिती आपल्याला कशी पाहता येईल?

आपण एक छोटासा प्रयोग करू या. एका छोट्या उभट पारदर्शक प्लास्टिकच्या भांड्यात पाणी भरून घेऊन, त्यावर आपण एक किंचित जाड पारदर्शक पण कुठेही न मुडपलेला असा प्लास्टिकचा कागद ठेवू. मग खाली डोके वर पाय पद्धतीने ते भांडे उलटे करू. कागद खाली असेल. भांडे वर. भांडे पाण्याने भरलेले असेल. मग खालून कागदाचा आधार आपण काढून घेऊ. तसे केल्यावर असे लक्षात येईल की पाणी त्या कागदावर उभे राहिले आहे. हे आश्चर्यकारकच आहे. का ते राहते असे. तर त्या कागदावर वरून असतो पाण्याचा दाब आणि खालून असतो हवेचा. पाण्याच्या पातळीवर हे दोन्हीही दाब जेव्हा परस्परास तोलून धरतात तेव्हा पाणी खाली पडत नाही.

चला तर मग पाहू या हा प्रयोग!


चलचित्रण श्रेयः सौ. संजीवनी गोळे 

चलचित्रण श्रेयः सौ. संजीवनी गोळे 

आता तुम्हीही हा प्रयोग करून पाहा. अतिशय सोपा आहे. मात्र काळजी ही घ्यायची आहे की, कागद व भांड्याची कडा, ह्यातून हवा भांड्यात शिरता कामा नये. आत जर हवा शिरली तर, त्याच ठिकाणातून पाणी बाहेर निघून जाईल आणि प्रयोग फसेल.

ह्यासाठी कागद साधारणतः ओव्हरहेड ट्रान्सपरन्सी असते तशा जाडीचा घ्यावा. कुठेही मुडपलेला नसावा. तो जर हाती धरला तर आपल्याच वजनाने कुठेही वाकू नये इतका कडक हवा.

जादूचे प्रयोग ते असतात जे जादुगार करू शकतो. इतर मात्र करू शकत नाहीत. ह्याउलट वैज्ञानिक प्रयोग ते असतात जे कुणीही करू शकतो. किंबहुना कुणालाही वर्णनाबरहुकूम करता येतात, त्या कृतींनाच वैज्ञानिक प्रयोग म्हणता येते. हे विज्ञान आहे. तेव्हा तुम्हालाही नक्कीच जमेल!

 वातावरण आपल्याला वेढून असते. त्याचा दाब असतो. ह्याची आपल्याला जाणीव करून देणे, हाच ह्या प्रयोगाचा उद्देश आहे. तुम्ही हा प्रयोग यशस्वीरीत्या करून पाहिलात म्हणजेच हा प्रयोग यशस्वी झाला आहे असे म्हणता येईल!

1 टिप्पणी:

संजीवनी म्हणाले...

विवेकानंद केंद्राच्या 'नचिकेत' प्रकल्पाकरता केलेला हा पहिला प्रयोग आहे.