२०२०-०७-०१

राष्ट्रीय डॉक्टर दिवस

राष्ट्रीय डॉक्टर दिवस 
   
(जन्मः १ जुलै १८८२ रोजी बिहार येथे, मृत्यूः १ जुलै १९६२ रोजी) 

हा लेख सौ. संजीवनी गोळे ह्यांच्या फेसबुक वॉलवरून समायिक करून घेतलेला आहे.


आज १ जुलै. देशांतील डॉक्टरांप्रती तसेच आरोग्यसेवेतील सर्वच कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा तसेच त्यांना मान देण्याचा दिवस आहे. १९९१ पासून दरसाल १ जुलै हा दिवस डॉ. बिधान चंद्र रॉय यांच्या सन्मानार्थ ’राष्ट्रीय डॉक्टर दिवस’ म्हणून केंद्र सरकारद्वारा साजरा केला जातो. ह्या निमित्ताने संपूर्ण आरोग्य चिकित्सा सेवेतील व्यक्तींच्या कार्यावर प्रकाश टाकला जातो आणि त्यांचा सन्मान केला जातो. डॉ. बिधान चंद्र रॉय यांचा जन्म १ जुलै १८८२ रोजी बिहार येथे झाला. ते विख्यात डॉक्टर होतेच. पण त्याचबरोबर शिक्षक, समाजसेवक, कुशल राजकारणीही होते. ते एक स्वातंत्र्य सेनानी होते. त्यांनी FRCS (Fellowship of the Royal College of Surgeons) आणि MRCP (Magnetic resonance cholangiopancreatography) अशा दोन्ही पदव्या संपादन केल्या. त्यांनी त्यांचे जीवन लोकांच्या भल्यासाठी व्यतीत केले. सुदृढ आणि सशक्त समाजच स्वातंत्र्य मिळवू शकेल असे त्यांचे मत होते.

 शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी काही वर्षे कोलकत्ता मेडीकल कॉलेज, कॅम्पबेल मेडीकल कॉलेज, येथें प्राध्यापक म्हणून काम केले. त्यांनी जादवपूर टी. बी. हॉस्पिटल, चित्तरंजन सेवा सदन, कमला नेहरू हॉस्पिटल, चित्तरंजन कॅन्सर हॉस्पिटल आदींची स्थापना केली. चित्तरंजन सेवा सदन हे खास महिला आणि मुलांसाठीच होते. त्यांनी महिलांसाठी नर्सिंग प्रशिक्षणही सुरु केले. त्यांच्यासाठी वैद्यकी हा केवळ पेशा नव्हता तर सामाजिक कल्याण व उत्थानाचा सर्वात महत्त्वाचा मार्ग होता. स्वास्थ्यसेवा केवळ थोरामोठ्यांपर्यंतच नव्हे तर जनसामान्यांच्या आवाक्यात आणायचे त्यांचे उद्दिष्ट होते. कोलकात्यातील कित्येक मोठी शुश्रुषालये त्यांच्याच पुढाकाराने सुरू झाली. १९२८ मध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन (आय.एम.ए.) ची स्थापना झाली. त्यातही त्यांचा मोलाचा सहभाग होता. मोठमोठी पदे भूषवल्यानंतरही ते गरीब रुग्णांचा निःशुल्क इलाज करत असत. रुग्णांनाही असा विश्वास वाटे की, त्यांना रुग्णाकडे केवळ पाहूनच रोगाचे निदान होते. १९६१ साली आपल्या मृत्यूपूर्वीच आपली सर्व संपत्ती त्यांनी जनतेच्या नावे केली होती.

 ते पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री होते. पहिले मुख्यमंत्री प्रफुल्लचंद्र घोष हे होते. १९४८ पासून १४ वर्षे त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम पहिले. या काळात त्यांनी अनेक महत्वाची कामे केली. त्यांनी कित्येक संस्था, नगरे आणि विद्यापीठांची स्थापना केली. त्यांनी दुर्गापूर, कल्याणीनगर, विधाननगर, अशोकनगर, आणि हबरा ही पाच शहरे वसवली. त्यांना त्यांच्या उत्कृष्ट समाजसेवेसाठी ४ फेब्रुवारी १९६१ रोजी "भारतरत्न" या पुरस्काराने गौरवण्यात आले. १ जुलै १९६२ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

एरवीही सगळेच डॉक्टर्स, परिचारिका, रूग्णालयातील इतर मदतनीस दिवस रात्र काम करत असतात. सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तर त्यांना एखाद्या योद्ध्याप्रमाणे रूग्णांना बरं करण्यासाठी जणूकाही युद्धच लढावं लागतय. संपूर्ण अंगावर कवच घालून रूग्णसेवा करावी लागतीय. घरच्यांपासून दूर राहावं लागतय. हे संरक्षक कवच सलग ६ ते ७ तास अंगावर घालून रूग्णांची तपासणी करावी लागते. कितीही काळजी घेतली तरी संपर्कात आल्यामुळे काही डॉक्टरांना तसेच इतर मदतनीसांना कोरोना झाला आणि त्यातून ते सहिसलामत बाहेर आल्याची उदाहरणं आहेत.

सगळे प्रामाणिकपणे सेवा देत असतांना काही ठिकाणी मात्र गैरसमजामुळे किंवा अपवादात्मक एखाद्या डॉक्टरच्या चुकीमुळे उगाचच लोकांचा उद्रेक होऊन डॉक्टरांवर हल्ले होत आहेत. ह्याकरता गुन्हेगारांवर कठोर कारवाई करता यावी म्हणून केंद्र शासन वटहुकूम काढत आहे. तसेच केंद्र सरकारने कोरोना योद्ध्यांसाठी ५० लाखांचा विमा घोषित केलेला आहे.

अहोरात्र न थकता सेवा देणाऱ्या या मंडळींबद्दल आपण आज कृतज्ञता व्यक्त करूया आणि त्यांना सलाम करूया. डॉ. बिधान चंद्र रॉय ह्यांनाही ह्या निमित्ताने विनम्र अभिवादन!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: