२०१२-०१-०१

पद्मविभूषण ई.श्रीधरन यांस मानाचा मुजरा!



पद्मविभूषण डॉ. ईलत्तुवलपीळ श्रीधरन व्यवस्थापकीय संचालक, दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन.

दिल्ली मेट्रोचे जणू बोधचिन्हच असलेल्या श्रीधरन यांचे व्यासपीठाच्या मंचावरले चित्र, त्यांच्या अवकाशप्राप्तीनंतर, हात जोडून त्यांना अभिवादन करत असतांनाचे, हे प्रकाशचित्र, दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या, कॉर्पोरेट कार्यालयात, म्हणजेच मेट्रो भवन येथे ३१-१२-२०११ रोजी काढलेले आहे.

भ्रष्टाचाराचा बोलबाला होत असलेल्या भारतात, शिष्टाचाराचे मूर्तिमंत प्रतीक बनून, विधिवत मिळालेले काम निष्ठापूर्वक करणारे अनेक लोक आजही आहेत. त्यांच्याच बळावर भारतीय समाज व्यवस्था घट्ट उभी आहे.

अशा व्यक्तींच्या कामांची नोंद घेऊन त्यांचा यथोचित सन्मान आपण करायला हवा. पद्मविभूषण डॉ. ईलत्तुवलपीळ श्रीधरन व्यवस्थापकीय संचालक, दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन हे अशा लोकांपैकीच एक आहेत. कालच त्यांनी आपल्या कार्यभाराची सूत्रे, आपल्या उत्तराधिकार्‍यास सुपूर्त केली. त्यानिमिताने, त्यांच्या कारकीर्दीचा घेतलेला हा एक आढावा. कोकण रेल्वेचे दैदिप्यमान काम ज्यांनी संकल्पिले, नियोजले आणि नियत कालावधीत यशस्वीरीत्या करून दाखवले त्या श्रीधरन यांना माझा मानाचा मुजरा!




आज वाशी स्टेशनकडे देशातल्या आदर्श स्टेशनचा नमुना म्हणून पाहिले जाते. गाड्या, फलाट, इमारत, रूळमार्ग पार करणारे दादरे, सगळेच एका छताखाली आणल्याने, स्टेशन आहे की विमानतळ असे वाटवणारे भारतातले पहिले रेल्वे स्टेशन आहे वाशी. भारतभरच्या स्टेशनांभोवतीच्या बकाल वस्तीचा येथे निकास करून, आंतरराष्ट्रीय माहिती-तंत्र-उद्यानाची निर्मिती स्टेशनाच्या वरच केल्याने सार्‍या परिसराचेच उद्धरण केलेले स्पष्टपणे जाणवते. कोकण रेल्वे प्रकल्पाला अशीच विकासाची दिव्य दृष्टी देणारे श्रीधरन आज कार्यनिवृत्त झालेले आहेत. त्यांच्याच उत्तम कार्यांची ही उजळणी.

श्रीधरन यांचा जन्म १२ जून १९३२ रोजी केरळातील पलक्कड जिल्ह्यातील करुकपुथूरमध्ये झाला. बसेल-ईव्हांजेलिकल-मिशन-उच्च-माध्यमिक शाळेतून त्यांनी शिक्षण घेतले. पलक्कडच्या व्हिक्टोरिया कॉलेजातून महाविद्यालयीन शिक्षण घेतले आणि मग काकीनाडा येथील गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमधून अभियांत्रिकी स्नातक झाले. कोझिकोडे येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये नागरी-अभियांत्रिकीतील व्याख्याता म्हणून काम केले. नंतर मुंबईच्या पोर्ट ट्रस्टमध्ये उमेदवारी केली. त्यानंतर ते भारतीय रेल्वेत रुजू झाले. दक्षिण रेल्वेत ते १९५४ च्या डिसेंबरमध्ये, सहाय्यक प्रशिक्षणार्थी अभियंता म्हणून रुजू झाले.

दक्षिण आणि दक्षिणपूर्व रेल्वेत त्यांनी सहाय्यक अभियंता, कार्यकारी अभियंता, प्रभागीय अभियंता आणि उपमुख्य अभियंता इत्यादी पदे भूषवली. जेव्हा ते नवे मार्ग निर्माण करण्याची जबाबदारी सांभाळत होते, तेव्हा क्विलॉन-एर्नाकुलम मिटरगेज आणि मँगलोर-हसन मार्गांची निर्मिती करण्यात आली. त्यादरम्यान अनेक पूल, बोगदे यांचे प्रकल्प यशस्वीरीत्या पार पडले. तसेच पालघाट, हुबळी आणि बेझवाडा प्रभागांची देखरेखही केली गेली.



१९६३ मध्ये भारताच्या रामेश्वरमला मुख्य भूमीशी जोडणारा तामिळनाडूतील पंबनम्‌ पूल वादळाने वाहून गेला. पंबनम्‌-पूलाचे वाहून गेलेले १२५ टप्पे, ४६ दिवसात पुन्हा उभे करण्याच्या त्यांच्या कामगिरीखातर रेल्वे मंत्रालयाने त्यांना पारितोषिक दिले. ते उपमुख्य अभियंता असतांना देशातील पहिली मेट्रो रेल्वे १९७० ते १९७५ या काळात कोलकाता येथे उभारण्यात आली. त्या कामाचे तेच प्रभारी होते. त्यांनीच ह्या कामाचा तपास, नियोजन आणि अभिकल्पन केले होते.

ऑक्टोंबर १९७९ ते नोव्हेंबर १९८० ते जहाज वाहतूक मंत्रालयाच्या कोचीन येथील जहाजबांधणी कारखान्याचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून प्रतिनियुक्तीवर होते. त्यांच्या कार्यकाळात या कारखान्याने उभारलेले पहिले जहाज “राणी पद्मिनी” चे जलावतरण करण्यात आलेले होते.

जुलै १९८७ मध्ये ते पश्चिम रेल्वेचे प्रमुख व्यवस्थापक झाले. जुलै १९८९ मध्ये रेल्वे महामंडळाचे अभियांत्रिकी सदस्य व म्हणूनच भारत सरकारचे पदसिद्ध सचीव झाले. १९९० मध्ये अवकाशप्राप्त करतांनाच ते प्रतिष्ठेच्या समजल्या गेलेल्या कोकण रेल्वेवर अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त केले गेले. कोकण रेल्वेचा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर ५ नोव्हेंबर १९९७ पासून ते दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त केले गेले.



कोकण रेल्वे आणि मग दिल्ली मेट्रो यांच्या उभारणीत अथक परिश्रम करून भारतीय सार्वजनिक वाहतूकीचे चित्रच त्यांनी बदलवून टाकले. त्यांच्या निष्ठापूर्वक केलेल्या कठोर परिश्रमाचे फळ म्हणून भारत सरकारने २००१ मध्ये त्यांचा “पद्मश्री” देऊन सन्मान केला. टाईम्स ऑफ इंडियाने त्यांना २००२ साली मॅन ऑफ द ईयर म्हणून निवडले. २००३ साली टाईम नियतकालिकाने त्यांची आशियातील एक पुढारी म्हणून निवड केली. २००५ मध्ये फ्रेंच सरकारनेही त्यांचा गौरव केला.

२००९ मध्ये त्यांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानातील भरीव कामगिरीच्या सन्मानार्थ त्यांना भारत सरकारने “पद्मविभूषण” देऊन गौरवले.

त्यांच्यासाठी त्यांच्या कार्यनिवृत्तीच्या निमित्ताने मी उत्तम आयुरारोग्य प्रार्थितो आणि त्यांच्या उत्तर आयुष्याकरता हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो.

श्रेयनिर्देशः प्रकाशचित्रे व मजकूर यांखातर संबंधित खाली दिलेल्या संस्थळांचे मनःपूर्वक आभार.

संदर्भः
१. http://india.gov.in/myindia/padmavibhushan_awards_list1.php?start=10
२. http://www.delhimetrorail.com/whatnew_details.aspx?id=NgRPa7TMhkQlld&rdct=d
३. http://en.wikipedia.org/wiki/E._Sreedharan

४ टिप्पण्या:

aativas म्हणाले...

एप्रिल २०११ मध्ये अण्णांचे 'जंतर मंतर'वर उपोषण चालू असताना एका संध्याकाळी जेव्हा श्रीधरन तिथे आले तेव्हा जमलेल्या लोकांनी त्यांचे जे उत्स्फूर्त स्वागत केले होते ते अजून माझ्या लक्षात आहे. 'बोलायची' विनंती संयोजकांनी केल्यावर 'मी एक सामान्य नागरिक आहे आणि मी इथे फक्त पाठिंबा देण्यासाठी आलोय, मार्गदर्शन करण्यासाठी नाही' असे त्यांनी सांगितले होते. त्यातून त्यांचा साधेपणा दिसतो. दिल्लीची मेट्रो त्यांनी खरच चांगली केलीय - ती प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवून केलेली व्यवस्था आहे. अशी माणसं आपल्याला पहायला मिळतात हे आपल् भाग्यच आहे.

mannab म्हणाले...

मादाम मेरी क्युरी, अमूलचे श्री. वर्घीज कुरीयन आणि आता हे श्री. श्रीधरन आपल्या अनुदिनीवर आले, याचा मला आनंद वाटला. त्यांचा हा परिचय देऊन आपण त्यांना एक प्रकारे अभिवादन केले आहे. आपल्या या कृतीत मी एक समविचारी वाचक म्हणून सहभागी होत आहे.

मंगेश नाबर.

Dr. Surendra Gole म्हणाले...

श्रीधरन साहेबांच्या व्यक्तीमत्त्वाची ही एक चांगली ओळख आहे. मला आवडली!

नरेंद्र गोळे म्हणाले...

आतीवास, नाबरसाहेब, डॉ.सुरेंद्रा,

सगळ्यांना प्रतिसादाखातर मन:पूर्वक धन्यवाद!