20111126

अमूल द टेस्ट ऑफ इंडिया





डॉ.वर्घिज कुरिअन हे “ऑपरेशन फ़्लड” ह्या जगातील सर्वात मोठ्या दुग्ध-विकास-कार्यक्रमाचे शिल्पकार आहेत. भारतातील दुग्ध-क्रांतीचे जनक आहेत. त्यांनीच भारताला जगातला सर्वात मोठा दुग्धोत्पादक देश बनवले. भारत देशाने त्यांना पद्मश्री (१९६५), पद्मभूषण (१९६६) आणि पद्मविभूषण (१९९९) या पदव्या देऊन गौरवान्वित केले आहे. तर सामाजिक नेतृत्वाकरता मेगॅसेसे (१९६३) आणि जागतिक-अन्न-पारितोषिक (१९८९) मिळवून ते जगभरातील सगळ्यांकरता लोकोत्तर ठरले आहेत. अमूल उद्योग समूहाचे ते अग्रणी आहेत.





आज त्यांचा ९० वा जन्मदिन. त्यांच्या अनन्यसाधारण कर्तुत्वास माझा सादर प्रणाम. त्यांना उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो हीच प्रार्थना!

२६ नोव्हेंबर १९२१ रोजी केरळामधील कालिकत येथे वर्घिज पुथेनपुरक्कल कुरिअन यांचा जन्म झाला. उच्च साक्षरतादर असलेल्या सिरिअन ख्रिश्चन समाजात ते वाढले. ख्रिश्चन मिशनरी शाळेत शिकले. टेनिस, बॅडमिंटन, क्रिकेट आणि बॉक्सिंग इत्यादी मैदानी खेळांत त्यांनी कॉलेजचे प्रतिनिधित्व केले. स्वभावाने नास्तिक. लष्करात भरती होण्याची त्यांची इच्छा होती. मात्र ते २१ वर्षांचे असतांना त्यांचे वडील गेले आणि आई त्यांना लढाईवर जाऊ देण्यास तयार नव्हती, म्हणून ते लष्करात दाखल होऊ शकले नाहीत. चेन्नईतील लॉयोला कॉलेजमधून ते १९४१ साली भौतिकशास्त्रात पदवीधर झाले. १९४४ साली चेन्नई विद्यापीठातून ७व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन अभियंत्रज्ञ झाले. १९४६ मध्ये जमशेदपूर येथील टिस्कोमधून त्यांनी अभियांत्रिकीतील एक विशेष अभ्यासक्रम पूर्ण केली. १९४८ मध्ये मिशिगन-स्टेट-युनिव्हर्सिटीतून त्यांनी अभियांत्रिकीतील “मास्टर्स इन सायन्स” ही पदयुत्तर पदवी प्राप्त केली. तिच्याकरता आण्विक अभियांत्रिकी आणि धात्विकी हे त्यांचे प्रमुख विषय होते. ही पदवी त्यांनी दुग्ध-विकास-अभियांत्रिकीतील विशेषज्ञतेसहित प्राप्त केलेली होती. मग त्यांनी राष्ट्रीय-दुग्धविकास-संशोधन-संस्था, बंगलोर येथून दुग्धविकास-अभियांत्रिकीतील विशेष प्रशिक्षण प्राप्त केले.


४ जानेवारी १९४६ रोजी काइरा जिल्ह्यातील समरखा येथे झालेल्या शेतकरी संमेलनाच्या फलस्वरूप, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सल्ल्यावरून मोरारजी देसाई यांनी, कुरियन यांना, बेभरवशाच्या दुध-व्यापार्‍यांविरुद्ध लढण्याकरता पाचारण केले. बॉम्बे-मिल्क-स्किम ह्या सरकारी संस्थेस मग काइरातले शेतकरी थेट दूध पुरवू लागले. १९५५ मध्ये “अमूल”चा उदय झाला. इथे दुग्धोत्पादन, संकलन आणि विक्री या सर्वांवर शेतकर्‍यांचेच पूर्ण नियंत्रण असे. यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळाले. १ कोटी शेतकरी आणि ८१,००० सहकारी संस्था यांच्या संगमातून घडलेल्या अमूलला, दरसाल २,४०० कोटी रुपये उत्पन्न मिळू लागले. जागतिक अधिकोषाने पुरवलेल्या केवळ २०० कोटी भांडवलावर एवढे उत्पन्न मिळू लागले. युरोपिअन किंवा अमेरिकन बाजारातल्या भावापेक्षा ४०% खर्चात दूध निर्माण होऊ लागले. अमूल पॅटर्न/ आणंद पॅटर्न म्हणून ह्याचा भरपूर बोलबाला झाला.

कुरिअन म्हणतातः

१. “लोकांवर दबाव आणून किंवा त्यांना केवळ दायित्व देऊन संशोधन साधता येत नाही. लोक आणि परिस्थिती यांच्या गुणवत्तेवरच हे सारे घडत असते. पुरेसे कुशल लोक स्वयं-कार्यान्वित परिस्थितीतून पुढे यावे लागतात, तेव्हाच कुठे संशोधन साधता येते!”

२. “मी मांजरीसारखा आहे. कसेही फेका. मी पायांवरच उभा राहेन.”

३. “आठ तास डेअरीकरता, आठ तास कुटुंबाकरता आणि आठ तास झोप.”

४. “माझे जीवनाचे तत्त्वज्ञान हे आहे की, जे कमी सुदैवी आहेत त्यांच्याकरता जे जे चांगले करणे शक्य असेल ते ते सर्व करा. मात्र, माझे स्वतःचे आयुष्य मी सामान्य माणसाप्रमाणे जगणेच पसंत करेन!”

कुरियन यांनी शेतकर्‍यांना काम देण्याऐवजी त्यांना संघटित केले. नोकरशहा, मंत्री, प्रस्थापित संस्था इत्यादींसोबत शेतकर्‍यांच्या हिताकरता लढा दिला. त्यांनी शेतकरी जणू देवच मानला. गुणवत्ता, पैशाचे पूर्ण मूल्यदान, सदोदित उपलब्धता आणि उत्तम सेवा यांचे आधारे त्यांनी अमूलला यशोशिखरावर चढवले. लोकच मग “अमूल द टेस्ट ऑफ इंडिया” म्हणू लागले. मानू लागले.

संदर्भः

१. http://www.amul.com/
२. http://www.slideshare.net/leo/milkman-of-india-varghese-kurien
३. http://www.iloveindia.com/indian-heroes/verghese-kurien.html
.

20111111

मेरी स्तोत्र

नव्यानेच सुरू झालेल्या ’ऐसी अक्षरे’ या संकेतस्थळावर, http://www.aisiakshare.com/node/173 या दुव्यावर “हजारो वर्षांपूर्वी लिहीलेल्या स्तोत्रांचा साठा करण्यापेक्षा मला महत्त्वाचे वाटतात ‘आजचे आदर्श’. आधुनिक ऋषि-मुनि आणि देव - आयझॅक न्यूटन, चार्ल्स डार्विन, मारी क्यूरी, महात्मा गांधी आणि अगदी सचिन तेंडूलकरसुद्धा! तर हा धागा आहे आजच्या काळाच्या आदर्शांबद्दल काही लिहीण्याचा. फक्त एकच अट आहे, हे लिखाण करायचं ते स्तोत्रांच्या स्वरूपातच. ” - ३_१४ विक्षिप्त अदिती (Tue, 08/11/2011 - 22:12) असे आवाहन दिसले! ७ नोव्हेंबर हा मेरी क्युरीचा जन्मदिन होता. म्हणून मी "मेरी स्तोत्र" लिहायला घेतले. तिच्या काही ठळक वैशिष्ट्यांचा समावेश करून तयार केलेले तेच हे "मेरी स्तोत्र". मेरीच्या लोकोत्तर गुणांना, ते उजागर करते!



मेरी क्युरी
(७ नोव्हें. १८६७, वॉर्सा, पोलंड-४ जुलै १९३४, सॅव्हॉय, फ्रान्स)

जन्मगाव वॉर्सा, मुळी वारसा न फारसा ।
तरीही उजळलीस तू, मेरी किरण-अर्जिता१ ॥ धृ ॥

उदय२ गोंधळात ना, म्हणून त्यजशी देश ना ।
कष्ट काढले जिथे ती, कर्मभूमी फ्रान्स ना ॥ १ ॥

रुचसी शिक्षकास३ तू, पियरेस कांक्षसीही तू ।
शोधवेड साधण्या, वरशीही लग्नगाठ तू ॥ २ ॥

’किरणे युरेनियमची४’ ती, विषय कठीण मानती ।
निवडसी तयास तू, तुला न वाटते क्षिती ॥ ३ ॥

“मी” म्हणत थंडी ये, नळात पाणी गोठते ।
उबेस कोळसा५ नसे, तरी ज्ञानभक्ती तेवते ॥ ४ ॥

प्रखर युरेनियमहुनी, जे द्रव्य किरण सोडते ।
शोधण्या तयास, सकल मूलद्रव्य६ हुडकते ॥ ५ ॥

गवसले असेही द्रव्य, किरण दिव्य सोडते ।
’पोलोनियम७’ म्हणून ती देशाभिमान दावते ॥ ६ ॥

पिचब्लेंड८मधून आगळे मग द्रव्य आढळे नवे ।
प्रारणे सशक्त, दिप्ती लक्षगुणित जाणवे ॥ ७ ॥

हे ’रेडियम९’ नवेच द्रव्य, दिप्ती दूर फाकते ।
टनात खनिज चाळता, लघुग्रॅम फक्त हाती ये ॥ ८ ॥

शोध लावला म्हणून, लाभले ’नोबेल१०’ही ।
शोधते कसे जनांस उपयुक्त ते ठरेल, ही ॥ ९ ॥

अकस्मात, चालता पियरेस देत धडक११ एक ।
वाहने उजाडले तिचे आयुष्य विरह देत ॥ १० ॥

आयरीन१२ गुणी खरीच, किरणोत्सार घडवते ।
ईव्ह धाकटी, पियानो, जन-रंजनास वाजवे ॥ ११ ॥

उपचार१३ दिप्तीचेही ती, शोधण्यास राबली ।
’नोबेल’ लाभले पुन्हा, दिगंत कीर्ती जाहली ॥ १२ ॥


१ अर्जिले किरणांस जिने ती, किरण-अर्जिता
२ वॉर्सा त्याकाळी रशियाच्या गुलामगिरीत कितपत असल्याने, देशात उदय होणे कठीण असे वाटून मेरी स्क्लोडोवस्का हिने पोलंड हा स्वदेश सोडला होता. ती चरितार्थ चालवण्याकरता तसेच शोधजिज्ञासा शमवण्याकरता फ्रान्समधे स्थलांतरित झाली होती.
३ पिअरे क्युरी या भौतिकशास्त्राच्या प्राध्यापकांना, मेरी तिच्या कष्टाळू आणि जिज्ञासूवृत्तीमुळे आवडू लागली. तिलाही ते आवडत असत. परस्परपूरक वैज्ञानिक काम करत राहिल्याने, पुढे त्यांच्यात प्रेम होऊन, मग त्यांचे लग्न झाले.
४ मेरीने युरेनियमची किरणे हा अवघड विषय अभ्यासाकरता निवडलेला होता.
५ मेरी क्युरीची गोष्ट हाडे गोठवणार्‍या थंडीत चौथ्या मजल्यावर कोळसा वाहून नेऊन ती ऊब मिळवत असे. तोही संपला की असतील नसतील ती कापडे गुंडाळून कुडकुडत बसावे लागे. तरीही तिची शिकण्याची जिद्द उणावली नाही.
६ अनेक मूलद्रव्यांची छाननी करून मेरीने किरणोत्सारी मूलद्रव्ये वेगळी काढली होती.
७ सर्वप्रथम ज्या किरणोत्सारी मूलद्रव्याचा शोध तिने लावला त्यास तिच्या मायदेशाच्या नावावरून त्यांनी ’पोलोनियम’ हे नाव दिले.
८ हे युरेनियमचे प्रख्यात असलेले खनिज आहे. युरेनियम काढून घेतलेल्या पिचब्लेंडमध्ये अथक परिश्रमानी शोध घेऊन मेरीने पोलोनियम हुडकून काढले.
९ पुढे पोलोनियमपेक्षाही अधिक सक्रियता पिचब्लेंडमध्ये आढळून आली. तेव्हा रेडियमचा शोध लागला.
१० पोलोनियम आणि रेडियमच्या शोधाखातर मेरी क्युरी आणि तिचे पती पिअरे क्युरी यांना १९०३ सालचे नोबेल पारितोषिक, नैसर्गिक किरणोत्सर्जनाचा शोध लावणार्‍या हेन्री बेक्वेरल यांचेसोबत विभागून मिळाले होते.
११ या अपघातात पियरे यांचा मृत्यू झाला.
१२ ही क्युरी दंपत्याची मोठी मुलगी. कृत्रिम किरणोत्सर्जनाचा शोध लावल्याखातर हिला १९३५ सालचे रसायनशास्त्राचे पारितोषिक मिळाले होते.
१३ मेरीने पियरे यांच्या पश्चात किरणोत्साराचे वैद्यकीय उपयोग आणि तत्संबंधित कायदे यांचा व्यासंगी अभ्यास केला होता. तिच्या ह्या कामाची पावती म्हणून किरणोत्साराच्या अभ्यासाखातर तिला १९११ सालचे रसायनशास्त्राचे पारितोषिक मिळाले होते.
.