२००९-११-१२

एकात्मता स्तोत्र

॥ एकात्मता स्तोत्र ॥ 

परंपरागत प्रातस्मरण रोज सकाळी उठून म्हटल्याने आपल्याला आपल्या वारशाची, संस्कृतीची आणि कर्तव्यांची जाणीव दिवसाच्या सुरूवातीलाच होऊन आपण कर्तव्यपूर्तीकरता दैनंदिनीचे नियोजन करू शकतो. याकरता भारतीय परंपरेत पहाटेसच उठून प्रातःस्मरण म्हणण्याची प्रथा होती. आज ती नामशेष झालेली आहे. मीही पूर्वी (लहान असतांना) प्रातस्मरण म्हणत असे. 

कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती । करमूलेः तु गोविंदः प्रभाते करदर्शनं ॥ 

म्हणजे, बोटांवर नांदते लक्ष्मी, तळहाती सरस्वती । मनगटी नांदतो ईश, (हाताचे) पहाटे कर दर्शन ॥ 

या श्लोकाने सुरूवात होणारे अठरा वीस श्लोकांचे ते पूर्ण प्रातस्मरण होते. आज ते आठवणारे आणि म्हणणारेही मोजकेच असतील. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने परंपरागत प्रातस्मरणात अर्वाचीन भारतातील संस्मरणीय आभूषणांची भर घालून केलेले प्रातस्मरण संघाच्या प्रभातशाखांवर आजही म्हटले जाते. त्याकाळी त्या प्रातस्मरणास, संघात भारतभक्तीस्तोत्र म्हणत असत. हल्ली एकात्मता स्तोत्र म्हणतात. हे नावच आजच्या त्याच्या स्वरूपास जास्त शोभून दिसते. मी संघाचा प्रचारक नाही. मात्र प्रातस्मरणाची आवश्यकता जाणवलेला भारतमातेचा पुत्र आहे. पूर्वी जेव्हा मी संघाच्या प्रातस्मरणातील आभूषणांच्या वैशिष्ट्यांचा शोध घेतला होता तेव्हाच, त्याचा अर्थ माझ्यापुरता पुनर्संकलित केला होता. ते प्रातस्मरण आणि त्याचे ते अर्थशोधन इथे देत आहे. ज्यांचा याच्याशी कधीच संबंध आलेला नव्हता त्यांनी हे पूर्वग्रहविरहित दृष्टीने वाचून त्याची उपयुक्तता ठरवावी. जे त्याचेशी पूर्वपरिचय राखतात त्यांना कदाचित हे अर्थशोधन नवे वाटू शकेल. 

निसर्गतःच आपल्याला निरागसतेची आवड असते. जे प्रकृतीनी सुंदर असेल, प्रचितीनी विलोभनीय असेल त्याला उत्स्फूर्तपणे दाद दिली जाते. ते हवेहवेसे वाटते. एखाद्या मोहक देखण्या हावभावाचा आपल्यावर एवढा प्रभाव पडतो की आपल्याही नकळत आपण त्याचे अनुकरण करू पाहतो. चांगल्याचे अनुकरण करण्याची ओढ मनुष्याला जीवनहेतूच्या निकट नेत असते. मग निर्माण होते कुतुहल. की खरंच, जीवनाचा हेतू काय असावा? आपल्याला सुष्ट आणि दुष्ट आविष्कार ओळखता का येतात? सुष्ट आविष्कारच का आवडतात? अनादी कालापासून मनुष्याला हे कोडे कुतुहलाचे ठरलेले आहे. पूर्वसुरींनी आपापल्या परीने त्याची उकल करण्याचा प्रयत्न चालूच ठेवला. परिसरातील चराचरांनी त्यांना मार्गदर्शन केले आणि सृजनाचे गूढ उलगडता उलगडता संस्कृती उदयास आली. मानवी मन मुळातच संवेदनाशील असते. सुष्टप्रिय असते. सत्यशोधक असते. समाजशील असते. ते तसेच का असते? हा प्रश्न मनुष्याला प्रवृत्त करतो. स्फुरण देतो. चेतवतो. अशाचप्रकारे उत्स्फूर्त होऊन पूर्वसुरींनी ज्या संस्कृतीला जोपासले, तिची उपासना व संस्मरण आपलाही मार्ग खचितच प्रशस्त करू शकेल. ज्या चराचरांनी त्यांना घडवले त्यांचे स्मरण आपल्यालाही प्रेरक ठरू शकेल. या विश्वासातूनच प्रातःस्मरणाचा जन्म झाला.

भारतभक्तीस्तोत्राची रचना झाली. मनुष्यस्वभाव समाजशील असल्यामुळे आणि भाषा हे त्याच्या अभिव्यक्तीचे प्रभावी साधन असल्यामुळे, स्वतःस झालेले परिस्थितीचे दर्शन/आकलन निकटवर्तियांस अनुभूत करून देण्यात त्याला आनंद वाटतो. त्यामुळे स्वभावतःच भाषा ही वर्णनाचे साधन ठरते. एक असते गुणवर्णन आणि दुसरे असते दोषदर्शन. अन् निंदा ही अनिष्टकारक असल्याचे सर्वमान्यच असल्याने, चांगुलपणाची स्तुती हा अभिव्यक्तीचा सुसंस्कृतपणा समजला जाऊ लागला. मग जन्माला आली ती स्तोत्रे. देवदेवतांची स्तवने. राजेरजवाड्यांची प्रशंसागीते. सृष्टीसौंदर्याची वर्णने आणि अशाच असंख्य रचना. निंदानिर्मित अनिष्टांपासून मानवतेचे रक्षण करणारी अभिव्यक्ती हीच या सर्व स्तोत्रांची प्रेरणा असल्याचे दिसून येते. त्यातून हे स्तोत्र तर जीवनहेतूच्या एवढे जवळ नेणारे आहे. आपले आयुष्य जर उन्नत करायचे असेल तर आपण हे स्तोत्र मुखोद्गत केलेच पाहीजे. एवढेच नव्हे तर समजून उमजून त्याचे मननही केले पाहीजे. जमीन कसदार असेल तर पीक मोत्यांचे येते. त्यातून, ज्या भरतभूमीला नररत्नांची खाण म्हणून गौरवले जाते, त्या भूमीचा कस तो काय वर्णावा. त्या वतनभूचे, तिच्यात अंगभूत असलेल्या पंचमहाभूतांचे, तिच्या पर्वतनद्यादी आभूषणांचे आणि एकूणच साऱ्या पार्श्वभूमीचे स्तवन सुरूवातीच्या काही श्लोकांतून केलेले आहे. 

जी भरतभू सुजल श्यामल आणि शस्य, शोभे समुद्रवलयांकित जी प्रशस्त । 
आभूषणे स्मर तिची तव मानसात, तू संघ संघ जप मंत्र निजांतरात ॥ 

ही आपली मातृभूमी आहे. ते दगड. ती माती. ती हवा. ते पाणी. या साऱ्यांचे बनलेले खण्डहर म्हणजे ती नव्हे. ती आहे विश्वमांगल्याची चिरंतन ज्योत. सर्व पंचमहाभूतांची अभेद्य संघटना. संघ. त्या आनंदमयी मातेस प्रथमतः वंदन! 

ओम् नमः सच्चिदानंदरूपाय परमात्मने । ज्योतिर्मयस्वरूपाय विश्वमांगल्यमूर्तये ॥ १ ॥ 

सर्व ग्रहनक्षत्रे, ही सृष्टी, हा परिसर आकाशपाताळादी सर्व लोक व त्यांना बंधनात ठेवणाऱ्या दशदिशा आणि काळ हे आम्हा सर्वांचे नेहमी कल्याण करोत. 

प्रकृतिः पंचभूतानी ग्रहलोका स्वरास्तथा । दिशः कालश्च सर्वेषां सदा कुर्वंतू मंगलम् ॥ २ ॥ 

समुद्रवसना भारतमातेला देवतात्मा हिमालय मुकुटाप्रमाणे शोभून दिसतो. ऋषी, महर्षी, राजर्षी, ब्रह्मर्षी आदी महापुरूषांच्या अशा या महन्मातेला आमचे प्रणाम असोत. 

रत्नाकरा धौतपदां हिमालयकिरीटीनीम् । ब्रह्मराजर्षिरत्नाढ्यां वंदे भारतमातरम् ॥ ३ ॥ 

उत्कलप्रदेशाचे भूषण असलेला आणि महर्षी परशुरामाचे कायमचे निवासस्थान असणारा महेंद्र पर्वत, दक्षिण भारताचे भूषण ठरणारा निलगिरी (मलयगिरी) पर्वत, स्वातंत्र्याची मंगल लेणी ठरलेले कोटकिल्ले अंगाखांद्यावर बाळगणारा सह्याद्री पर्वत, देवदेवतांची तीर्थक्षेत्रे असल्यामुळे गौरव पावलेला हिमालय पर्वत, वनराज सिंहांचे वसतीस्थान असणारा रैवतक (गिरनार) पर्वत, वयोवृद्ध गिरीराज विंध्याचल तथा महाराणा प्रतापांची आठवण देणारा अरवली पर्वत हे सर्व संस्मरणीय आहेत. 

महेंद्रो मलय सह्यो देवतात्मा हिमालयः । ध्येयो रैवतको विंध्यो गिरिश्चारवलिस्तथा ॥ ४ ॥ 

लोकमाता गंगा, विद्यादेवी सरस्वती, आर्यसंस्कृतीची आद्य पोषणकर्ती सिंधू, ईशान्य भारताची जीवनसरिता ब्रह्मपुत्रा, गंगेची पुष्टीवर्धिनी गण्डकी, दण्डकारण्यातील अक्षयसरिता कावेरी, कृष्णकन्हय्याची यमुनामय्या, स्फटिकप्रस्तरांतून झेपावणारी रेवा (नर्मदा), कृष्णप्रस्तरांत शोभून दिसणारी कृष्णा, दक्षिणगंगा गोदावरी तसेच विंध्यकुमारी महानदी ह्या नद्या आपले जीवन सरस करतात. समृद्ध करतात. म्हणूनच त्यांचेही स्मरण आपणांस प्रेरक आहे. 

गंगा सरस्वती सिंधुब्रह्मपुत्रश्च गण्डकी । कावेरी यमुना रेवा कृष्णा गोदा महानदी ॥ ५ ॥ 

वसली अनेक नगरे वसले प्रदेश । स्फुरली अनेक शास्त्रे स्फुरलेही धर्म ॥ 
त्यांचा समग्र महिमा धर मानसात । तू संघ संघ जप मंत्र निजांतरात ॥ 

संस्कृतीचा उदय आणि उत्कर्ष जिथे झाला, ती तीर्थक्षेत्रे संस्मरणीय आहेत. सुसंस्कृत आचरणाचे नियम म्हणजेच धर्मशास्त्रे. त्यांचा विकास कसा झाला, त्यांची निर्मिती कशी झाली ह्याची आठवण प्रेरणादायी ठरते. एवढेच काय पण त्यांचे नामस्मरणही मनाला उभारी आणते. रामजन्मभूमी अयोध्या, कृष्णजन्मभूमी मथुरा, पहाडी प्रदेशातून सखल प्रदेशात गंगावतरण होते ते हरिद्वार (मायापुरी), देवाधिदेव महादेवाचे निवासस्थान काशी, परंपरागत विद्यानगरी कांची, सम्राट विक्रमादित्याची राजधानी उज्जैन (अवंतिका), जगन्नाथाची रथयात्रा आजही चालवणारी जगन्नाथपुरी (नीलांचल), पाणिनी अन् कौटिल्यल्यकालीन विश्वविद्यालय तक्षशीला, तसेच भगवान बुद्धाला जिथे ज्ञानप्राप्ती झाली ती गया यांचे स्मरण आपल्याला आपल्या सांस्कृतिक वारशाची आठवण करून देते. 

अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका । वैशाली द्वारिका ध्येया पुरी तक्षशिला गया ॥ ६ ॥ 

गंगा यमुनेच्या पवित्र संगमाचे स्थान प्रयाग, सम्राट चंद्रगुप्ताची राजधानी पाटलीपुत्र, कृष्णदेवरायाची राजधानी विजयानगर, पांडवांची राजधानी इंद्रप्रस्थ, गौरवशाली इतिहासाचे सोमनाथ आणि अमृतसरोवरवेष्ठित हरमिंदरसाहेबांचे पवित्र मंदिर असलेले अमृतसर यांचे स्मरण आपल्याला आपल्या प्रेरणांचे दर्शन घडवते. चारही वेद, अठरा पुराणे, सर्व उपनिषदे, रामायण, महाभारत, गीता आणि सद्दर्शने; तसेच जैनागम, त्रिपिटक, गुरूग्रंथसाहेब आणि सज्जनांची वचने ही आमची श्रद्धास्थाने आहेत. म्हणूनच संस्मरणीयही आहेत. 

चतुर्वेदाः पुराणानी सर्वोपनिषदस्तथा । रामायणं भारतंच गीता सद्दर्शनानी च ॥ ८ ॥ 

जैनागमास्त्रिपिटका गुरूग्रंथः सतां गिरः । एष ज्ञाननिधिः श्रेष्ठः श्रद्धेयो हृदी सर्वदा ॥ ९ ॥ 

पतिव्रतांचा आदर्श ठरल्यामुळे सप्तर्षींसोबत आकाशात चमचमणारी अरुंधती, दत्तात्रेयांनी जिच्यापोटी जन्म घेतला ती महासती अनुसया, प्रत्यक्ष यमाकडूनही पतीचे प्राण परत मिळवणारी सावित्री, पत्नीत्वाचा आदर्श ठरलेली भूमीकन्या जानकी, पतीचा अनादर सहन न झाल्याने पित्याकडील यज्ञात भस्म होणे पत्करणारी दक्ष प्रजापतीची कन्या सती (पार्वती), अलौकिक पतीव्रता द्रौपदी, पतीवरील अन्याय त्याच्या मृत्यूनंतरही राजसभेत वाद करून दूर करणारी सती कण्णगी, जनकसभेत पती याज्ञवल्क्य याजसोबत शास्त्रार्थात भाग घेणारी ब्रह्मवादिनी गार्गी तसेच कृष्णभक्त संत मीराबाई या स्त्रिया आपल्या संस्कृतीतील स्त्रीत्वाच्या आदर्श आहेत.

अरुंधत्यनसूया च सावित्री जानकी सती । द्रौपदी कण्णगी गार्गी मीरा दुर्गावतीस्तथा ॥ १० ॥ 

परंतु गढामंडलाच्या राणी दुर्गावतीसारख्या स्त्रिया पराक्रमांचे निकष घडवतात. अशा स्त्रियांच्या शूरतेनेही आमचा इतिहास संपन्न आहे. 

विद्युल्लता जशी चमकते घन अंबरात । लढल्या स्त्रियाही पूर्वी भर संगरात ॥ 
त्यांच्याविना अधुरा, संसार स्मर मनात । तू संघ संघ जप मंत्र निजांतरात ॥ 

महाराणी लक्ष्मीबाई, प्रजाहितदक्ष अहिल्यादेवी, कित्तूरची राणी चन्नम्मा तसेच काकतीय सम्राज्ञी रुद्रमांबा यांच्या कथा आजही आम्हाला स्फुरण देतात. यांच्याचप्रमाणे समाजहितैषी भगिनी निवेदिता व रामकृष्ण परमहंस यांच्या धर्मपत्नी शारदादेवी याही आम्हाला पूजनीय आहेत. 

लक्ष्मीरहल्याचन्नम्मा रुद्रमांबा सुविक्रमा । निवेदिता सारदा च प्रणम्या मातृदेवता ॥ ११ ॥ 

मर्यदापुरूषोत्तम राम, ज्याच्या नावाने आपला देश "भारत" म्हणून ओळखला जातो तो भरत, योगेश्वर कृष्ण, प्रतिज्ञेचा गौरव ज्यांनी आपल्या आचरणाने वाढवला ते पितामह भीष्म, सर्वश्रेष्ठ धर्मपरायण युधिष्ठिर, महान धनुर्धर अर्जुन, बालपणातच अपमृत्यूशी यशस्वी झुंज देणारे महर्षी मार्कंडेय, सत्यवचनी राजा हरिश्चंद्र, परमभक्त प्रल्हाद, धर्मोल्लंघनावर मनोवैज्ञानिक उपचार करणारे महर्षी नारद तसेच घोर तपश्चर्या करून अढळपद प्राप्त करून घेणारा बाल ध्रुव हे आमचे वर्तणुकीचे आदर्श आहेत. 

श्रीरामो भरतः कृष्णो भीष्मो धर्मस्तथार्जुनः । मार्कंडेयो हरिश्चंद्रः प्रल्हादो नारदो ध्रुवः ॥ १२ ॥ 

स्वामीनिष्ठेचे चिरंतन प्रतीक रामभक्त हनुमान, आत्मज्ञानी मिथिलानरेश जनक महाराज, "व्यासोच्छिष्ठं जगत् सर्वं" असे ज्यांच्याबाबत म्हटले जाते ते महर्षी व्यास, प्रत्यक्ष श्रीरामाला "योगवासिष्ठ्या"चा उपदेश करणारे गुरूवर्य वसिष्ठ, राजा परीक्षिताला मृत्यूपूर्व सात दिवसांत भागवत कथा कथन करणारे व्यासांचे पुत्र दैत्यगुरू शुक्राचार्य, बळाच्या जोरावर देवलोकावर अधिराज्य करणारा प्रल्हादाचा नातू बळीराजा, उन्मत्त वृत्रासुराच्या निर्दालनासाठी वज्र तयार करण्याकरता ज्यांनी स्वतःच्या अस्थी दिल्या ते दधीची ऋषी, "सुदर्शन चक्र, त्रिशूळ व वज्र" इत्यादी अमोघ शस्त्रांचा निर्माता आद्य स्थपती विश्वकर्मा. ज्याच्या कृषीविकासाच्या धोरणांमुळे ही धरणी एवढी संपन्न झाली की तिला पृथ्वी हे नाव प्राप्त झाले तो पृथू राजा, रामायणकार महर्षी वाल्मिकी तसेच चिरंजीव धनुर्धर परशुराम अशा अनेकानेक महापुरूषांच्या चरीत्रांचा समृद्ध वारसा आम्हाला लाभलेला आहे. 

हनुमानंजनको व्यासो वसिष्ठश्च शुको बलिः । दधीचिर्विश्वकर्माणौ पृथुर्वाल्मीकिभार्गवाः ॥ १३ ॥ 

आपल्या अविरत प्रयत्नांनी ज्याने अवनीतलावर गंगावतरण केले व "प्रयत्नांना" भगीरथ हे विशेषण प्राप्त करून दिले तो राजा भगीरथ, गुरूदक्षिणेच्या स्वरूपात ज्याने आपल्या उजव्या हाताचा अंगठाही सहज कापून दिला तो परमशिष्य एकलव्य, आदीपुरूष मनू, चौदा रत्नांतील एक रत्न आणि आयुर्वेदाचे जनक आचार्य धन्वंतरी, शरणागत कबुतरास जीवन देण्यासाठी ससाण्यास स्वतःचे शरीर अर्पण करणारा शिबीराजा तसेच दुष्काळात जनतेला सर्वस्व वाटून टाकणारा राजा रंतिदेव यांची कीर्ती पुराणांमध्ये सांगितलेली आहे. हे सर्व आमचे स्फुर्तीस्त्रोत आहेत. 

भगीरथश्चैकलव्योमनुर्धन्वंतरिस्ततथा । शिबिश्च रंतिदेवश्च पुराणोद्गीतकीर्तयः ॥ १४ ॥ 

अज्ञानामुळे भासमान असणाऱ्या जरामरणादी दुःखांवर विचारपूर्वक विजय मिळवण्याची व अहिंसामर्गाने संयमित जगण्याची बुद्धी ज्याराजपुत्र सिद्धार्थाने तपचरणाने मिळवली तो भगवान बुद्ध, जैन विचारधारेचा जनक महावीर, महान् हठयोगी गोरक्षनाथ, "अष्टाध्यायी"सारख्या व्याकरणशास्त्राचा रचयिता पाणिनी, प्रसिद्ध योगसूत्रकार पतंजली, अद्वैतमताचे आद्य पुरस्कर्ते शंकराचार्य, द्वैतवादाचे प्रवक्ते वैष्णव मध्वाचार्य, द्वैत व अद्वैत वादांची सांगड घालणारे निंबार्काचार्य, विशिष्ताद्वैतमताचे प्रतिपादक रामानुजाचार्य तसेच शुद्धाद्वैतमताचे जनक वल्लभचार्य या साऱ्यांनी आम्हाला सद्धर्माची शिकवण दिली. 

बुद्धो जिनेंद्रो गोरक्षः पाणिनिश्च पतंजली । शंकरो मध्वनिंबार्कौ श्रीरामानुजवल्लभौ ॥ १५ ॥ 

इसवी सनाच्या १० व्या शतकात जबरीच्या सार्वत्रिक धर्मांतराचे प्रयत्न विफल करणारे झुलेलाल, महान कृष्णभक्त चैतन्य महाप्रभू, तिरुक्कुरलाचे रचयिता तिरुवल्लुवर, शैव आणि वैष्णव संत, कंबरामायणकार रामभक्त कंब तसेच वीरशैव संप्रदायाचे संस्थापक बसवेश्वर यांनी आमच्या धर्मभावना सन्मार्गी लावल्या.

झुलेलालोऽथ चैतन्यः तिरुवल्लुवरस्तथा । नायन्मारालवाराश्च कंबश्च बसवेश्वरः ॥ १६ ॥ 

धर्मांतरितांना पुन्हा स्वधर्मात प्रवेशाचा मार्ग सुकर करणारे देवलस्मृतीचे रचनाकार देवल, थोर संत रोहिदास, महान् स्पष्टवक्ता संत कबीर, शिख पंथाचे संस्थापक गुरू नानक, "वैष्णव जन तो तेणे कहिये" या सुप्रसिद्ध भजनाचे रचयिता नरसी मेहता, "रामचरितमानसकार" संत तुलसीदास तसेच शिखांचे दहावे गुरू गोविंदसिंह यांनी आमची सद् अभिरुची तेवत ठेवली. 

देवलो रविदासश्च कबीरो गुरूनानकः । नरसिस्तुलसीदासो दशमेशो दृढव्रतः ॥ १७ ॥ 

आसामात भागवत धर्माचा प्रसार करणारे शंकरदेव यांनी भागवत धर्माचे सार सांगणारा "गुणमाला" ग्रंथ लिहीला. मध्वाचार्य तथा सायणाचार्य यांनी विजयानगरचे साम्राज्य वैभवास नेले. भागवत धर्म महाराष्ट्रात वाढला याचे श्रेय ज्ञानेश्वर, तुकाराम यांसारख्या संतांचे आहे. त्याबाबत असे म्हणतात की "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस". शिखांचे चौथे गुरू रामदास तर सर्वश्रुतच आहेत. मात्र "तुझ्या रक्षणा तूच रे सिद्ध होई" हा आगळा संदेश आपल्या रामदासस्वामींनी दिलेला आहे. पुरंदरदासांचे वर्णन तर "कर्नाटकाचे तुकाराम" असेच करतात. या सर्वांची शिकवण आम्हाला संयमित सहजीवनाला सामर्थ्याची जोड देण्यास सांगते. 

श्रीमत् शंकरदेवश्च बंधू सायणमाधवौ । ज्ञानेश्वरस्तुकारामो रामदासः पुरंदरः ॥ १८ ॥ 

बिरसा मुंडा यांनी दक्षिण बिहार, ओरिसा तसेच मध्यप्रदेशातील विजनवासी जनतेला संघटित करून इंग्रजांविरुद्ध उठाव केला होता. स्वामी सहजानंदांनी उद्धव संप्रदायाची स्थापना केली. रामानंदांनी लोकाभिमुख धर्माचा प्रचार केला. कबीर, रोहीदास, सेना न्हावी, पद्मावती आदी त्यांचेच शिष्य होत. या सर्व महात्म्यांनी त्यांच्या दैवी गुणसंपदेचा वारसा आम्हाला दिलेला आहे. 

बिरसा सहजानंदो रामानंदस्तथा महान् । वितरंतू सदैवैते दैवीं सद्गुणसंपदम् ॥ १९ ॥ 

नाट्यशास्त्राचे आद्याचार्य भरतमुनी, "अभिज्ञान शाकुंतलम्, मेघदूत, रघुवंश" इत्यादी महाकाव्यांचा रचयिता महाकवी कालीदास, बहुविद्याविशारद राजा भोज, होयसाळ शैलीचा प्रख्यात शिल्पशास्त्री जकणाचार्य ज्याने "हळेबिडू, बेलूर, सोमनाथ" इत्यादी मंदिरांचे शिल्प घडवले, "सूरसागर" रचयिता सूरदास, "धनराज पंचरत्न" कर्ता त्यागराज तसेच "सवैय्यां"चा कर्ता रसखान यांनी आमचा इतिहास कलासमृद्ध केलेला आहे. 

भरतर्षिः कालिदासः श्रीभोजो जकणस्तथा । सूरदासस्त्यागराजो रसखानश्च सत्कविः ॥ २० ॥ 

महान चित्रकार राजा रविवर्मा, आधुनिक संगीतशास्त्राचे प्रवर्तक भातखण्डे गुरूजी तसेच ललितकलेचा आश्रयदाता मणिपूरचा राजा भाग्यचंद्र आदी विख्यात कलावंत सदैव स्मरणीय आहेत. 

रविवर्मा भातखण्डे भाग्यश्चंद्रः स भूपतिः । कलावंतश्च विख्याताः स्मरणिया नितंतरम् ॥ २१ ॥ 

झाले किती खचित होतीलही अनेक । राष्ट्रा समर्थ करण्या झटले कृतार्थ ॥ 
त्यांच्या स्मृतीस स्मर तू सदा मनात । तू संघ संघ जप मंत्र निजांतरात ॥ 

दण्डकारण्यात वैदिक संस्कृतीची ध्वजा फडकवल्यावर सप्तसिंधूंपलीकडे जावा सुमात्रादी द्विपांवर सम्यक संचार करणारे महर्षी अगस्ती, प्रागैतिहासिक काळात कंबोडिया सारख्या प्रदेशावर अधिकार करून तेथील सर्वतोमुखी विकास केल्यामुळे त्या देशास स्वतःचे नाव देणारा राजा कंबू, आग्नेय आशियात फुनान साम्राज्य स्थापणारा भारतीय कौण्डिण्य, मलाया द्विपापर्यंत साम्राज्यविस्तार करणारा चौल राजेंद्र, पराक्रमाने कलिंगविजय मिळवणारा अन् त्यातील नरसंहाराने व्यथित होऊन बौद्ध धर्म स्वीकारणारा सम्राट चण्डाशोक, अधोगतीस पोहोचलेल्या अखेरच्या मौर्य नृपतीस बाजूस सारून यवनांना पळवणारा सेनापती पुष्यमित्र शुंग व यवनराज दिमित्राचे आक्रमण परतवण्याकरता मगधराजाशी शत्रुता विसरून संधी करणारा चेदिराज खारवेल यांच्या स्मरणाने आमची संघशक्ती जागृत होते. 

अगस्त्यः कंबुकौण्डिन्यौ राजेंद्रश्चोलवंशजः । अशोकः पुष्यमित्रश्च खारवेलः सुनीतिमान् ॥ २२ ॥ 

कौटिलीय अर्थशास्त्राचा रचयिता आर्य चाणक्य, हिंदुकुशपर्वतापर्यंत प्रशासन करणारा सम्राट चंद्रगुप्त, अवंतीच्या स्वतंत्रतेसाठी शकांचा पराभव करणारा शककर्ता सम्राट विक्रमादित्य, पैठणला नवी राजधानी वसवणारा शककर्ता शातवाहन राजा शालिवाहन, आर्यावर्तात सुवर्णयुग आणणारा दिग्विजयी सम्राट समुद्रगुप्त, हूणांच्या वर्चस्वापासून मुक्त असे एकछत्री साम्राज्य स्थापून कन्नौजला त्याची राजधानी करणारा राजा हर्षवर्धन, ब्रह्मदेशावर सत्ता गाजवणारा कलिंगराज शैलेंद्र तसेच अरबस्थानापर्यंत पाठलाग करून अरबांना परास्त करणारा चितौडाधिपती बाप्पा रावळ यांचे स्मरण आम्हाला "परं वैभवं नेतुं एतद् स्वराष्ट्रम्" ह्या आमच्या निर्धाराची आठवण करून देते. 

चाणक्यश्चंद्रगुप्तौच विक्रमः शालिवाहनः । समुद्रगुप्तः श्रीहर्षः शैलेंद्रो बप्परावळः ॥ २३ ॥ 

मामापेक्षा देश मोठा म्हणून मुगल सेनेला फितुर झालेल्या मामाचा शिरच्छेद करणारा वीर अहोम सेनापती लाचित बडफुकन, कुशल प्रशासक राजा भास्करवर्मा, महाक्रुर हूण राजा मिहिरकुल याचा पराभव करणारा मंदसौरनरेश यशोधर्मा, विजयनगरचा प्रसिद्ध शास्ता कृष्णदेवराय व आक्रमण हाच संरक्षणाचा राजमार्ग मानून "तुर्क, मुस्लिमादी" आक्रमकांचा त्यांचे घरापर्यंत जाऊन पाठलाग करून त्यांना परास्त करणारा ललितादित्य मुक्तापीड आम्हाला स्वसंरक्षणाचे धडे देतात. 

लाचिद भास्करवर्माच यशोधर्माच हूणजित । श्रीकृष्णदेवरायश्च ललितादित्य उद्बलः ॥ २४ ॥ 

महान संघटक मुसुनुरी नायक (प्रोलय व कप्पय), मेवाड नरेश महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज तसेच काशी विश्वनाथ व हरमिंदर मंदिरावर सुवर्णकलश चढवणारा महाराजा रणजीतसिंह यांचे विक्रम विश्वविख्यात आहेत. त्यांचे स्मरण आमच्या विजिगिषू वृत्तीत भर घालते. 

मुसुनुरिनायकौ तौ प्रतापः शिवभूपती: । रणजित्सिंह इत्येते वीरा विख्यातविक्रमा: ॥ २५ ॥ 

सांख्यसूत्रांचे रचयिता कपिल मुनी, वैशेषिक सूत्र प्रणेता महर्षी कणाद, प्रख्यात शल्यविशारद सुश्रुत, कायाचिकित्सेवर "चरकसंहिता" लिहीणारे चरकऋषी, गुरूत्वाकर्षणाचा शोध लावणारे भास्कराचार्य तसेच बृहत्संहितेचे रचयिता वराहमिहिर आमच्यातील वैज्ञानिक प्रेरणांना दृढमूल करतात. 

वैज्ञानिकाश्च कपिलः कणादः सुश्रुतस्तथा । चरको भास्कराचर्यो वराह्मिहिरः सुधीः ॥ २६ ॥ 

रसायनशास्त्राच्या व आयुर्वेदाच्या अभ्यासासाठी भावास राज्य सोपवणारा नागार्जुन, प्राचीन विमानविद्येचे प्रणेते भरद्वाज ऋषी, पृथ्वी सूर्याभोवती फिरते असा सिद्धांत मांडणारे प्रख्यात गणितज्ञ आर्यभट्ट, वनस्पतींना जीव असतो असा शोध लावणारे जगदीशचंद्र बोस, प्रकाशावरील "रामनप्रभाव" शोधून काढणारे चंद्रशेखर वेंकटरमण व श्रेष्ठ गणितज्ञ रामानुजम् आमच्या संपन्न वैज्ञानिक परंपरेची आम्हाला आठवण देतात. 

नागार्जुनो भरद्वाजः आर्यभट्टो बसुर्बुधः । ध्येयो वेंकटरामश्च विज्ञा रामानुजादयः ॥ २७ ॥ 

स्वामी विवेकानंदांचे गुरू रामकृष्ण परमहंस, आर्यसमाजाचे संस्थापक स्वामी दयानंद, गीतांजलीकार रविंद्रनाथ ठाकूर, ब्राह्मोसमाजसंस्थापक राजा राममोहन राय, स्वामी रामतीर्थ, योगी अरविंद तसेच स्वामी विवेकानंद यांचा सांस्कृतिक वारसा आम्हाला लाभलेला आहे. 

रामकृष्णो दयानंदो रवींद्रो राममोहनः । रामतीर्थोऽरविंदश्च विवेकानंद उद्यशाः ॥ २८ ॥ 

थोर समाजसुधारक दादाभाई नौरोजी, दीनदुःखितांचे कैवारी गोपबंधू दास, "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच" असा उद्घोष करणारे लोकमान्य टिळक, अहिंसेचे पूजक महात्मा गांधी, रमण महर्षी, पंडित मदन मोहन मालवीय तसेच सुब्रह्मण्यम् भारती अशा थोर पुरूषांचा वारसा आम्हाला लाभलेला आहे.

दादाभाई गोपबंधुः तिलको गांधिरादृताः । रमणो मालवीयश्च श्रीसुब्रह्मण्यमभारती ॥ २९ ॥ 

सुभाषचंद्र बोस, भारत सेवाश्रम संघाचे संस्थापक प्रणवानंद, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, भिल्ल सेवा मंडळाचे संस्थापक ठक्कर बाप्पा, घटनाकार आंबेडकर, स्त्री शिक्षणाचे प्रखर पुरस्कर्ते महात्मा फुले तसेच हिंदू संघटक नारायण गुरू अशांचे स्मरण आम्हाला प्रेरणा देते. 

सुभाषः प्रणवानंदः क्रांतिवीरो विनायकः । ठक्करो भीमरावश्च फुले नारायणो गुरूः ॥ ३० ॥ 

संघनिर्माता डॉ. हेडगेवार व संघविस्तारक गोळवलकर गुरूजी यांचे स्मरण सदैव चैतन्यदायी भासते.

संघशक्तिप्रणेतारौ केशवोमाधवस्तथा । स्मरणीया सदैवैते नवचैतन्यदायकाः ॥ ३१ ॥ 

या भारतवर्षात असे अनेक ईश्वरी आविष्कारास जवळ असणारे महाभाग होऊन गेले ज्यांची नावे वर उल्लेखित नाहीत. असेही अनेक अज्ञात वीर होऊन गेले ज्यांनी समरांगणावर शत्रूचा विध्वंस केला. त्याचप्रमाणे अनेक समाजोद्धारक व उपयुक्त विज्ञानाविष्कारांत निष्णात असे दिग्गज होऊन गेलेत. पण त्याची नावे ज्ञात नाहीत. अशा सर्व महात्म्यांना आमचे वंदन असो. एकात्मतास्तोत्राची अखेर त्यांच्या स्मरणाविना होऊच शकणार नाही.

अनुक्ता ये भक्ताः प्रभुचरणसंसक्तःरुदयाः । अविज्ञाता वीरा अधिसमरमुध्वस्तरिपवः ॥ 
समाजोधर्तारः सुहितकरविज्ञाननिपुणः । नमस्तेभ्यो भूयाद् सकलसुजनेभ्यः प्रतिदिनम् ॥ ३२ ॥ 

हे एकात्मतास्तोत्र जो श्रद्धेने म्हणेल तो राष्ट्रभक्त अखंड भारताचेच स्मरण करेल. यात संशय नाही.

इदमेकात्मतास्तोत्रं श्रद्धया यः सदा पठेत् । स राष्ट्रधर्मनिष्ठावान् अखण्डं भारतं स्मरेत् ॥ ३३ ॥ 

॥ भारत माता की जय ॥ 

थोर महात्मे होऊन गेले चरीत्र त्यांचे पाहा जरा । 
आपण त्यांचेसमान व्हावे हाच सापडे बोध खरा ॥

एकात्मता स्तोत्र http://music.cooltoad.com/music/song.php?id=197361 वरून अधोभारित करता येईल. ऐकण्यास छान वाटते. http://www.geetganga.org/ ह्या ठिकाणी संघ संबंधित तसेच इतर देशभक्तीपर गीते थेट ऐकता येतील. तसेच अधोभारित सुद्धा करता येतील. .

1 टिप्पणी:

Suhas म्हणाले...

khupach surekh .. dhanyavad